Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Friday, June 26, 2015

‘ती’ मैत्रीण...

      त्यादिवशी तिला भेटलो. भेट काही ठरवून नव्हती घेतली. काही योगायोग असतात आणि जुन्या, कित्येक वर्षं अधुऱ्या राहिलेल्या भेटी पूर्ण होतात, तसंच काहीसं. तसा तिला मी अगदी लहानापानापासुंच ओळखतो. दर दिवशी शाळेत जाताना, किंवा त्याबाजूने गेलो की ती दिसायची. इतर मित्र - मैत्रीणीसारखीच ती सुद्धा. पण मला आठवतयं, तिच्याशी कधी मी जास्त बोललोच नाही. जितका इतर मित्रांसोबत वागायचो, बोलायचो, खेळायचो तसा मी तिच्याशी कधी वागलोच नाही. पण एक मात्र खरं की तिचं एक सुप्त असं आकर्षण मला अगदी लहानपणापासुनच होतं आणि आजही आहे. पण मी ते कधी कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का? अगदी स्वत:ला ही मी ते जाणवू दिलं नव्हतं, का कुणास ठाऊक? 

        त्यादिवशी तिला भेटलो तो एक योगायोगच असावा. नेहमीच्याच रस्त्याने जात होतो आणि सहज बाजूला लक्ष्य गेलं. ती दिसली. तशीच, अगदी लहानपणी दिसायची तशीच. तिच्यात जास्त बदल झालाच नव्हता. काहीसं मनात ठरवून मी चालत तिच्यापाशी गेलो. माझ्यासमोरच होती ती. तिला पाहून एक उसनं स्मित द्यायचा प्रयत्न केला, ते बघून ती खुदकन हसली. काय बोलावे ते सुचेनाच. मला तसा बावचळलेला पाहून ती अजूनच हसायला लागली. खूप सारे स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहू लागले. कुठूनशी वाऱ्याची एक मंद झुळूक तिच्या स्मिताबरोबर माझ्या अंगावरून गेली. मी थोडासा शहारलो. काहीच न सुचल्याने मी तिथेच तिच्यासमोर  माडाच्या झाडाला टेकून बसलो. ती समोरच. दोघेही शांत. तिला इतक्या जवळून मी कधीच पाहिलं नव्हतं. ती खरंच अतिशय सुंदर दिसत होती. बाहेर चैत्राचं उन भाजून काढत होतं, पण ती बहरून गेल्यासारखी भासत होती. किती तरी वेळ मी फक्त तिच्याकडे तंद्री लागल्यासारखा पाहताच राहिलो, ते ही अगदी पहील्यांदाच. ती ही पाहत राहिली; बऱ्याच वेळाने मी बोलायला सुरुवात केली,
“कशी आहेस?”
“ठीक आहे. तू कसा आहेस? आणि आज इतक्या दिवसांनी इकडे कुठे वाट चुकलास?” तिने माझ्याकडे पाहत हसत विचारलं.
“काही नाही, सहजच. सुट्टी होती म्हणून गावी आलोय काही दिवसांसाठी.” मी उत्तरलो.
“बरं. बाकी काय? सगळं ठीक ना?”
“हो. सुरु आहे. ठीक चाललयं.”
पुन्हा दोघांत एक शांतता पसरली. एक रानपक्षी हेल देऊन गाऊ लागला. तिथून, तिच्यासामोरून मला उठावसं वाटत नव्हतं. पण अजून काय बोलू ते कळतच नव्हतं.
“इतक्या वर्षात आपण पहिल्यांदाच असं भेटतोय ना?” मी त्या शांततेत एक खडा टाकला; पुन्हा अनेक स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन वाहू लागले.
“हो. म्हणूनच मी विचारलं तुला की आज इकडे कुठे वाट चुकलास म्हणून.” तिच्या चेहऱ्यावर ते स्मित अजूनही विरत होतं. 
“नाही. तसं काही नाही. म्हणजे तुलाही आठवत असेल शाळेत जाताना नेहमी भेटायचो की आपण.” मी चाचरत काही तरी बोललो.
“भेटायचो नाही रे. फक्त एकमेकांना बघायचो. हां, एक दोन वेळा तू इथे मित्रांसोबत अभ्यासाला यायचास ते आठवतयं, पण तेव्हाही तू इथे मित्रांसोबतच असायचास. आपण तसे कधी भेटलो किंवा बोललोच नाही. मग शाळा संपल्यावर तू निघून गेलास.” ती.
“हो. तसंच काहीसं. तेव्हा वाटायचं तुझ्याशी खूप बोलावंस, पण का कुणास ठाऊक हिम्मत नाही व्हायची.” मी.
“आता तरी आहे का हिम्मत बोलायची? की...?” ती पुन्हा हसली.
“अगं, काहीही काय. बोलतोय ना तुझ्याशी आता.” मी हसत म्हणालो.
“काय रे, आपल्या मैत्रीणीशी बोलायला काय घाबरायचं? बोलायचं बिनधास्त.”
“घाबरत नाही गं. तुझ्याकडे येऊन बसून बोलावसं खूपदा वाटायचं पण माहीत नाही का? नाही जमलं कधी. तुझ्याबद्दल लहानपणापासूनच एक आकर्षण होतं मला. पण कधी जमलंच नाही तुझ्यापाशी येऊन तुझ्याशी बोलायला. जेव्हा जेव्हा तू दिसायचीस तेव्हा तेव्हा मनात अगदी समुद्र भरून यायचा. फार सुंदर दिसायचीस तू; म्हणजे आताही, आय मीन, आताही तू तशीच सुंदर दिसतेस. दर पावसाळ्यात मी तुला पाहायचो. चिंब होऊन जायचीस तू. बेभान होऊन नाचायलाच लागायाचीस. सगळे बंध तोडून तू सगळीकडे पसरलेली असायचीस. तेव्हा तुझ्याकडे नुसतं बघत राहावं असं वाटत राही. हिवाळ्यात अगदी उलट. पहाटे जेव्हा आम्ही शाळेला जायचो तेव्हा तू धुक्याची चादर पांघरून असायचीस, तुझ्या श्वासांतून उमटणारी बाष्पाची वलयं तुझ्या चेहऱ्याभोवती दाटून यायची, आठवतयं मला.” 
“बापरे! माय, माय! किती ते वर्णन. आई शप्पथ! इतकं कधी कुणी मला माझ्याबद्दल बोललंय असं आठवत नाही!” ती हसत हसत म्हणाली.
“बघितलंस, माहिती होतं की तू हसणार म्हणून मी कधी तुझ्याशी असं काही बोलायचो नाही.” मी थोडा रागवत म्हणालो.
“काय यार, मस्करी पण नाही का करायची? लगेच कसला रे फुगतोस? खरं सांगू मलाही नेहमी वाटायचं की तू माझ्यापाशी यावसं. आपण खूप साऱ्या गप्पा माराव्यात, या इथे बागडावं, गाणी गावीत. पण ते कधी तुला सांगू नाही शकले. तू इथेच या गावात राहिला असतास तर ते शक्यही झाले असते, कदाचित. पण प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप असतातच नाही का? मला बापडीला काय, मी आहे अशीच. मी ही हे सगळं सोडून कुठे जाणार ना? मग आहे. पण कधी कधी वाटत की तुझ्यासारखा कुणी तरी मित्र असावा. घटकाभर येऊन त्याने भेटावं, बोलावं, सुख - दु:खाच्या चार गोष्टी सांगाव्यात. वाऱ्यावर ताल धरून एक सुंदरसं गाणं गावं. बस्स, अजून काही नाही. आपल्या मैत्रीसाठी एखाद्याने एवढं तरी करावं ना रे? नाहीतरी इथे कोण असतं कुणाचं? ” ती स्तब्ध झाली.

“खरं सांगतो, मलाही कित्येकदा असं वाटलंय. अगदी अस्सच वाटलंय की पुन्हा तुला पावसात बेभान होऊन नाचताना बघावं आणि तुझ्यासोबत आपणही पावसात नाचावं, चिंब होऊन बागडावं. तुझ्या अंगणात पुन्हा येवून खेळावं, तुझ्यासोबत गाणी गावी. कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटेचं तुझं धुक्याने आच्छादून गेलेलं रूपं पाहत बसावं. खूप वाटतं असं. पण तुझ्याबद्दल मला नेहमीच एक आदर आहे. मी इतर मित्रांशी कसाही वागू शकतो, बोलू शकतो. पण तुझ्याशी तसं नाही करू शकत. असं वाटतं की अगदी लहानपणापासूनची आपली ही मैत्री अखेर पर्यंत तशीच राहावी; अभंग. त्या मैत्रीला कुठेही, कसलाही बांध नसावा. हा प्रवाह असाच निरंतर रहावा.” मी. 

“मैत्रीचं काय आहे? ती राहिली तर राहते. टीकवली तर टिकते, नाही तर जाते वाहून. पण कधी कधी उगाच ओढूनताणून टीकवण्यापेक्षा ती वाहीलेलीच बरी असते. मैत्री हे काही नातं नाहीय. त्यात कुणी कुणाला बांधील नसतं आणि नसावंच मुळी. मलाही असंच वाटतं आपल्याबद्दल. कधी कुठे भेटलो तर निदान एकमेकांची ओळख तरी विसरत नाही आपण. ओळखीचं, मैत्रीचं, जाणीवेचं एखादं स्मित पुरेसं आहे आपल्यात, आणि हे असंच असावं नाही का रे?” ती.

 मी पुढे काही बोललो नाही. ती ही शांतच राहिली. थोड्यावेळाने उठून मी तिचा निरोप घेतला.

“येत जा असा अधूनमधून. बरं वाटतं कुणी ओळखीचं भेटलं की.” 
ती पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणाली.
“हो. नक्की.” असं म्हणून मी जायला वळलो. तिच्या चेहऱ्यावरले तरंग पुन्हा विरत गेले. खूप दिवसांनी त्या दूरच्या मैत्रीणीला भेटून, तिच्याशी बोलून फार बरं वाटलं. 



'नदी’ माझी दूरची मैत्रीण.  





        नदीचं एक सुप्त आकर्षण मला कधीपासून तरी आहे. मी तसं कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का अगदी स्वत:लाही मी हे जाणवू दिलं नव्हतं. माझ्या गावात एक नदी आहे. कुठून रानावनातून, दऱ्या-खोऱ्यातून वाहत येते आणि समुद्रात विलीन होते. का कुणास ठाऊक कधी प्रवासात मला एखादी नदी दिसली की मन अगदी भरून जातं. समुद्र जीवाभावाचा मित्र असेल तर नदी ही मैत्रीण. इतके दिवस नव्हतं जाणवलं. ती सुद्धा माझ्याशी तशीच वागते, दूरच्या मैत्रीणीसारखी. काही दूरचे नातेवाईक असतात तशीच ही माझी दूरची मैत्रीण. पण दूरची असूनही अगदी जीवाभावाची. कधी भेटली तर ती जास्त बोलत नाहीत. कधी तरी, क्वचितच एखादं संयत, संथ आणि नितांत सुंदरसं स्मित झळकेल तिच्या चेहऱ्यावर. कधी चालताना, तर कधी प्रवासात बस-ट्रेन मधून ती जोवर दिसेल तोवर आमची सोबत. एखादं स्मित दोघांच्यात. बस्स! नंतर ती तिच्या वाटेला मी माझ्या वाटेला. निरोप असा घेत नाही आम्ही. माहीत असतं पुन्हा भेट होईलच. पण तोवर हुरहूर ही लागलेलीच असते जीवाला.

लहानपणापासून समुद्र माझा मित्र, सखा, सोबती, यार सगळं काही. आमच्या गावात समुद्रही अगदी तसा जवळच. पण समुद्रावर कधी जायला मिळायचं नाही, त्यामुळे कधी प्रवास करताना गाडीतून १-२ मिनिटासाठी दिसणारा समुद्र मी अधाशीपणे प्राशून घ्यायचो. लहानपणापासून समुद्र माझ्या सोबतीलाच. एका सच्च्या दोस्तासारखा. आयुष्यातल्या अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांचा तो जणू एक साक्षीदारच. सगळया सुख दु:खांत तो माझ्यासोबत. नंतर किती तरी वेळा मी त्याच्या किनारी जाऊन त्याच्याशी बोलत बसलोय. कितीतरी वेळा त्याच्या लाटांच्या तालावर गाणी गात बसलोय. कितीदा तरी किनाऱ्यावरल्या उष्ण वाळूत अंग टाकून आकाशातल्या चांदण्या मोजल्यात; पण नदीशी मी असा कधी वागलोच नाही. माझ्या गावात नदीही आहे. नदीच्याच बाजूला गाडीरस्ता. येणाऱ्या - जाणाऱ्यांची नेहमीची वाट. आम्ही देखिल शाळेत जाताना याच नदीच्या बाजूच्या रस्त्याने जायचो यायचो. प्रत्येक मोसमात नदीची वेगवेगळी रूपं दिसायची. पावसाळ्यात दुथडीभरून ती वाहायची. नदीचं पाणी काठ फोडून शेतमळ्यात शिरायचं. सगळा शेतमळा एखाद्या प्रचंड मोठया सरोवारासाराखा भासायचा. पावसाळ्यात नदीचं पाणी पुलावरून गेलं की शाळेला हमखास सुट्टी. श्रावणात एखाद्या माहेरवाशीणीसारखी बेभान होऊन नाचणारी, बागडणारी नदी शिशिरात गारठून जायची. आम्ही पहाटे शाळेत कुडकुडत जायचो तेव्हा पुलावरून दिसायचं; नदी धुक्याची चादर पांघरून शांत वाहायची. जणू पुन्हा सासरी जाणाऱ्या मुलीसारखी आतल्या आतच रडायची.                                    

लहानपणापासून मला पाण्याचा प्रवाह, डोह, समुद्र दिसला की त्यात स्वत:ला झोकून द्यावेसे वाटायचे. पोहायची भयंकर इच्छा असूनही घरच्यांच्या ओरडण्याने साध्या दारातल्या ओहोळातही जायला मनाई होती. नदीचा दुसरा काठ सहज दिसायचा. मला लहानपणी नेहमी वाटायचं की उडी मारली तर सहज पोहून नदीच्या दुसऱ्या काठावर जाईन. त्यावेळी त्या शांत, गूढ नदीच्या रुपाची मला कल्पना नव्हती. मला वाटायचं की असा कसा बुडेन नदी मला तरंगवत दुसऱ्या काठावर घेऊन जाईल. पण हां! असा प्रयत्न कधीच केला नाही. तुम्ही नदीची विविध रूपं लक्ष्य देऊन बघा, ती प्रत्येकवेळी वेगळीच भासते. पण मला सर्वात भावतं ते तिचं गूढ, शांत, रूप. पण तेव्हाची पाण्यात जायची ओढ आता नाही राहिली. हां, फक्त त्या प्रवाहाला, डोहाला, अथांग समुद्राला दुरून बघत राहतो. समुद्राची ओढ असली तरी नदीचं वेगळंच असं आकर्षण मनाला लागून आहे.                   

खरंच जितका मुक्तपणे मी समुद्राशी वावरतो, बोलतो तितका नदीशी कधीच नाही. मला आठवत नाही की, मी कधी तासनतास नदीच्या किनारी बसलोय. तिच्याशी भरभरून बोललोय. तिच्या काठावर बसून, वाऱ्याच्या आणि रानपक्ष्यांच्या साथीवर कधी गाणी गायलीत. तिच्यासाठी कधी ३-४ ओळी खरडल्या. नाही, कधीच नाही. ही अशी अबोल मैत्री गेली कित्येक वर्षे आमच्यात आहे. तिच्याविषयी नेहमीच एक आदर वाटत राहतो मला. त्यामुळेच असेल की, मी तिच्याशी तितक्या सलगीने नाही वागत. कधी जाऊन तिला मनातलं नाही सांगत. तिच्या काठावर तासन तास, तिला न्याहळत नाही बसत. पण वाटतं हेच ठीक आहे. 

प्रत्येकासमोर आपल्या आयुष्याचं पुस्तकं उघडून वाचण्यात काय अर्थ आहे? 
बसावं कधी निवांत एकमेकांसमोर, नुसतंच. 
काहीही न बोलता, उलगडावे मनातले बोल आपोआप. 
सुख-दु:खांच्या पलीकडे ही असावं काहीतरी बोलण्यासारखं. 
नसावी कोणतीच भावना हसवणारी, रडवणारी, मोहवणारी. 
असावी फक्त एक निरपेक्ष जाणीव. 
एकमेकांच्या अस्तित्वाची. एकामेकांच्या असण्याची. 



Sunday, August 5, 2012

If You Are Lonely When You Are Alone.....


If you are lonely when you are alone, you are in bad company...
 
एकाकीपणा, Loneliness  हा मनुष्याचा एक सर्वात मोठा शत्रु आहे. हा असा शत्रू आहे की तो कधी कधी स्वःताचाच घात करतो. प्रत्येक मनुष्य कधी ना कधी या एकाकीपणाचा शिकार होतोच. अशावेळी आपल्याल काहीच सुचत नाही. कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. म्युझिक, मुव्हीज आपली आवडती जागा किंबहुना आपली अतिशय आवडती व्यक्तीही ही अशावेळी आपल्याला नकोशी वाटते. मग अशावेळी तुम्ही काय करता? मी काय करायचो हे मला ठाउक नव्हतं पण त्यादिवशी एक चांगला उपाय सापडला..

दोन-चार महिन्यांपूर्वी भोपाळला कंपनीच्या कामानिमित्त गेलो होतो. भोपाळपासुन ८० कि.मी.वर असलेल्या सुजानपूर या एका गावात  एका  क्लायंटकडे जायचं होतं आणि तिकडलं काम झाल्यावर पुढे रतलामला अजुन एक क्लायंट होता. सुजानपूरमधलं काम त्याच दिवशी आटोपलं आणि रतलामला जाण्यासाठी सुजानपूर स्टेशनवर येवून ट्रेनची वाट बघत बसलो होतो. ट्रेनला यायला अजुन ३ तास होते. आता हे ३ तास कसे घालवायचे याच विचारात होतो. त्यात मी माझा लॅपटॉप पण सोबत आणला नव्हता त्यामुळे तर अजुनच कंठाळा येवू लागला. नशीब सोबत ब्लॅकबेरी फोन होता. त्यामुळे फेसबुक आणि ट्वीटरवर थोडा टीपी सुरुच होता. काही तरी लिहावं म्हणून नोटबुक काढलं पण काही केल्या एक शब्द ही सुचेना. उगाच मग एखादं नाव गिरवू लागलो; पण मनासारखं होतं नव्हतं. 

मे चा शेवटचा आठवडा होता. संध्याकाळच्या वेळी आभाळ विविध रंगांनी भरुन गेलं होतं. कुठून तरी काळे ढग पश्चिमेकडे जमा होत होते. आज कदाचित पाउस हजेरी लावेल असं मनोमन वाटत होतं. त्यात वारा ही अगदी सूसाट सुटला होता. पण नेहमीप्रमाणे ही संध्याकाळ मला खायला उठली होती. मी हे सगळं जाणून बुजुन टाळत होतो कारण ती संध्याकाळ पुन्हा एखादी अशीच आठवण उकरुन काढणार होती आणि त्या अनोळखी प्रदेशात तर मला ते नकोच होतं. कसाबसा मी मनाला सावरत होतो आणि इतक्यात ट्रेन आली. सुजानपूर ते रतलाम अजुन ४-५ तासांचा प्रवास होता. सुदैवाने एक विंडोसीट मिळाली आणि मी निर्धास्त झालो. ट्रेन सुटली तरी पश्चिमेकडलं ते आभाळ काही मला सोडत नव्हतं.सुर्य तर केव्हाचा मावळला होता पण ती संध्याकाळ अजुनही क्षितिजावर रेंगाळत होती. 
कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता आणि पुन्हा त्या संध्याकाळच्या क्षितिजावर आठवणींच एक-एक पान उलगडू लागलं. खूप एकाकी वाटू लागलं. मी डोळे मिटून घेतले आणि खिडकीवर डोकं टेकवलं. असं वाटू लागलं की आता या क्षणी कुणीतरी सोबत असावं आणि मी भराभर मनातलं बोलुन दाखवावं. त्यात माझ्या बाजुला एक गुज्जू फेमेली होती आणि त्यांचं अविरत चरणं आणि बोलण्याचा रवंथ सुरुच होता. एक अनामिक असा प्रचंड तणाव मनावर येवू लागला. रतलाम यायला अजुन बराच वेळ होता. मनातल्या आणि आजुबाजूच्या गोंधळामुळे तर झोप येण्याचा ही चान्स नव्हता. म्हणून मग शेवटी वैतागुन फोन घेतला आणि गाणी ऐकू लागलो. त्यात फोनचा मिडीया प्लेयर शफल मोडवर होता आणि तो ही नको ती दु:खी गाणी ऐकवू लागला. 
"कसे सरतिल सये" हे गाणं वाजवायची त्या फोनला काय गरज होती? :डःड असो. 

मी डोळे मिटून गाणी ऐकू लागलो. इंग्रजीत एक म्हण आहे ना कि,"Whenever you have any problem just sing a song, then you will realize that your voice is a lot more worse than your problem.." :D:D:D
 हे आठवून मग मी माझ्या आवाजात कधी काळी रेकॉर्ड केलेली दोन तीन गाणी ऐकली पण तरीही समधान होईना. अस्वस्थता गाण्याच्या रुपानेही सारखी घंघावत होती. आज मला कुणाशी तरी बोलायचं होतं. बरचं काही बोलायचं होतं.जे कधी कुणाला सांगितलं नव्हतं ते आज सांगायचं होतं. केव्हाचं मनात गाडुन ठेवलेलं एक-एक पान आज वाचायचं होतं. पण कुणाशी बोलणार? कुणाला सांगणार? काही व्यथा आपण नाही सांगू शकत कुणाला. काही दु:खं ही आपली आपल्यालाच पचवावी लागतात. अनघा नेहमी म्हणते की, "आपणच आपलं टीकाकार व्हायला हवं आणि त्याचप्रमाणे आपणच आपला स्व:ताचा एक चांगला मित्र ही व्हायला हवं." पण आज मला खरोखर कुणीतरी समोर हवं होतं. ज्याला मनातलं सारं काही सांगून टाकायचं होतं. काय करावं या विचारात असतानाच एक आयडीया सुचली. 

फोनचा म्युझिक प्लेयर बंद केला. 

ब्लॅकबेरीचं नेटवर्क रिमुव्ह केलं त्यामुळे आता कुणाचेही कॉल्स येणार नव्हते आणि मला डीस्टर्ब होणार नव्हता. 
हॅन्ड्स फ्री डीव्हाईस कानाला अडकवलं; ब्लॅकबेरीमधे हल्लीच इन्स्टॉल्ड केलेलं व्हॉईस रेकॉर्डर अ‍ॅप्लिकेशन ऑन केलं आणि बोलायला सुरुवात केली...... 

"हाय! आज मला तुला काही सांगायचं आहे.खूप दिवस तुझ्याशी बोलायचं होतं पण या ना त्या कारणाने राहुनच गेलं. खरं तर मी मुद्दामच तुला ते सांगितलं नाही आणि कदाचित तुला कधी सांगणारच नव्हतो पण आज राहवत नाहीय..." 


अशाप्रकारे बोलत राहिलो. किती तरी वेळ. जणु मी कुणाशी तरी फोनवर बोलतोय या अविर्भावात असल्याने आणि त्यात मी मराठीत तर कधी इंगिशमध्ये बोलत असल्याने आजुबाजूच्या लोकांचा काही त्रास होत नव्ह्ता. 

किती तरी वेळ मी बोलत होतो. बाहेरचा काळोख आता अधिकच गहिरा होत होता. आणि त्या काळोखाबरोबर एक एक आठवण ओठांवर येत होती. क्षणोक्षणी फार हलकं वाटत होतं. आज पहिल्यांदाच मी स्वःताशी इतका वेळ बोलत होतो. आज स्वःताला कुठून तरी शोधून आणलं होतं आणि माझ्यासमोर बसवून स्व:तालाच सगळं काही सांगत होतो. 

कधी त्या मजेशीर, खोडकर आठवणी सांगताना मोठ्याने हासत होतो तर कधी एखाद्या कटु आठ्वणी सांगताना आवाज खोलवर जात होता. 
कधी पाकळीवरल्या दवासारख्या जपलेल्या त्या आठवणी सांगताना शब्द संथ होत होते तर कधी उसळलेल्या लाटांसारखे माझे शब्द काही आठवणींचा मारा करत होते. 

भरभरुन मी स्व:ताशी बोलत होतो आणि नेहमीसारखं बोलताना माझे श्वास फुलत होते. एका विशिष्ट लयीत ट्रेन केव्हाची धावत होती आणि त्या ट्रेनचा आवाज नकळत माझ्या रेकॉर्डींगला बॅकग्राउंड स्कोर देण्याचा काम करत होता. आता बरंच काही मी बोललो होतो. खिडकीतून बाहेर पाहिलं तर दूर कुठे तरी अधुन-मधुन विजा चमकत होत्या.. रतलाम यायला अजुन एक तास बाकी होता. मी बोलणं आवरतं घेत होतो आणि बाहेरुन मृद्गंध दरवळू लागला. माझं मन पावसासाठी अधिर झालं आणि त्या मृद्गंधासरशी अजुन काही आठवणी ओठांवर तरळू लागल्या. पण मी स्वःताला आवरत घेतलं कारण मला ठाउक होतं की आता पावसाच्या सरी येतिल आणि जर पाउस आलाच तर मग त्या पावसाच्या आठवणी मला रोखता आल्या नसत्या. 

"आज खूप बोललो तुझ्याशी. मला ठाउक आहे  की तुला जाम पकायला झालं असेल, नाही...? But really thanks to listen to me..   आज खूप बरं वाटतयं. खूप हलकं वाटतयं.. थँक्स अगेन" 


असं बोलून मी माझं रेकॉर्डींग थांबवलं. तब्बल १ तास ५१ मि. मी बोललो होतो. खूप बरं वाटत होतं. फोनची बॅटरीही ड्रेन व्ह्यायला आली होती. रात्री साडे नउला रतलामला पोहचलो. बराच शोधा-शोध केल्यावर एक चांगलं हॉटेल सापडलं.( मायला ते हॉटेल डीसेंट नाही सापडलं कुठे :डःडः) खूप थकलो होतो आणि भूक ही लागली होती. रुमवर बॅग टाकली आणि बाहेर जेवायला गेलो. जेउन आलो. शॉवर घेतला आणि बेडवर पहुडलो. मघाशी रेकॉर्ड केलेली माझी बडबड ऐकावी म्हणुन फोन ऑन केला आणि ते ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळलंच नाही.
रात्री कसलसं स्वप्न पडलं होतं. पहाटे ते मी आठवू लागलो पण काहीच आठवेना. 


आता मला हल्ली असंच कधी भरुन आलं की मी हा उपाय वापरतो. लिहिण्यापेक्षा हे सोप्पं वाटतं. लिहिताना खूप विचार करावा लागतो.
शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. त्यात काही पर्सनल लिहायला गेलो तर कुणाच्या भावना दु़खावणार तर नाहीत ना याचीही काळजी घ्यावी लागते.त्यापेक्षा हे बरं वाटतं. कधी असं भरुन आलं ना की स्व:ताशीच असं बोलावं. आणि जेव्हा  स्वःताशीही काहीच बोलायला नसेल तेव्हा त्या रेकॉर्डींग्ज पुन्हा पुन्हा ऐकाव्यात. फार बरं वाटतं. माहीतीय??गाण्यापेक्षा आपला आवाज इथे फार सुन्दर लागतो. प्रत्येक सूर भावनेच्या तालावर अगदी चपखल बसतो. आणि हो बोलताना नेहमी जे मनात आहे ते स्पष्ट बोलावं. कसलीही तमा, भीती न बाळगता. 

असं
म्हणतात की स्व:ताशी बडबड करणारे वेडे असतात. पण खरं सांगतो हा वेडेपणा करुन बघा मनावरलं एखादं अनामिक ओझं कमी होतं......

- दीप्स

Thursday, April 26, 2012

वहाँ कौन हैं तेरा....

काही वेळा हे शब्द असे काही खेळतात ना की बस्स्स ! उगाच मनात इकडे तिकडे उड्या मारत फिरत असतात पण त्यांना पकडुन एक योग्य वाक्य करायचं म्हणजे नाकी नउ येतात.. 
हे असंच कित्येक दिवस चाललयं.. माझ्या डायरीमध्ये कित्ती तरी खाडाखोडी झाल्यात. जीमेलच्या ड्राफ्टमध्ये असे कित्येक परिच्छेद तसेच्या तसे पडून आहेत. पण नाही जमत... 
खरं तर माझं सगळं लिखाण हे असंच तिच्या डोळयांपासून सुरू होउन तिच्या ह्रद्यापर्यंत पोहचू पाहणारं... 
प्रत्येक शब्दात तिला ह्रद्यातुन मारलेली हाक.. 
प्रत्येक वाक्य जणू तिच्यासाठी गुंफलेला बकुळीच्या फुलांचा गजरा..( स्वारी, गजरा नाही ! तिला गजरा नाही आवडत. बरं मग गाजराचा हलवा :) ) 

आज कित्ती दिवसांनी तिला पाहिलं आणि इकडे तिकडे उड्यामारणारे शब्द आज अचानक कागदावर अलगद उतरु लागले.  बॅकग्राउंडला  " मर जायियां, तेरे बिन मर जायियां रे..." हे गाणं  आणि या जीवघेण्या संध्याकाळच्या वेळी तिच्या त्या पारिजातकी  आठवणी....
ती आजही तशीच पारिजातकाच्या अल्लड फुलासारखी. पहाटेच्या प्रसन्न वेळी रोमांरोमातुन भिनलेल्या सुगंधी जहरासारखी. पण सगळ्यात जहरी तिचे डोळे..  
ती माझ्या समोर होती, किती तरी वेळ, पण तिच्या त्या डोळ्यांत मला पाहता आलंच नाही... 
तिच्यापेक्षा मला तिच्या डोळ्यांनिच जास्त वेड लावलं होतं आणि ते या जन्मी तरी सुटणार नाही हे नक्की...
हे! तिच्या त्या टपोर्‍या डोळ्यांवर मी काही कविता पण केल्या होत्या... त्यातली एक..

तुझ्या डोळ्यांना सांगून ठेव
ते नेहमी मला वेड लावतात
तसा मी आहेच थोडा वेडा पण ,
ते चारचौघातही मला वेड्यात काढतात... 

आणि जेव्हा ती डोळ्यांत काजळ घालायची तेव्हा तर उफ्फ्फ्फ!  
मोकळे सोडलेले तिचे ते उसळलेल्या लाटांसारखे लहरी केस आणि अमावास्येच्या काळोखासारखे तिचे ते का़जळी डोळे. 
मी कितिदा तिला सांगायचो डोळ्यांतलं थोडं काजळ घे आणि गालावर एक ठिपका लाव, कुणाची नजर लागली तर,.... आणि मग त्यावर ही चार ओळी सुचल्या होत्या...

वारा उसळे असा भरारा,
तुझ्या केसांतुन वादळ लहरे.
नभि दाटति अवचित घन जसे,
तुझ्या डोळ्यांतले काजळ गहिरे... 

आता तिचे ते डोळे आठवत नाहीत, आठवते फक्त तिची ती संदिगध नजर.. थेट ह्रद्याला भिडणारी...
मला माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची, तू नेहमी ग्लेअर्स लावून का फिरतोस? "  
त्यावर माझं उत्तर असायचं "माझ्या डोळ्यांतली "ती" कुणाला दिसू नये म्हणून!"
********************************************************************************

त्यादिवशी बर्‍याच दिवसांनी आईच्या मांडीवर पहुडलो होतो.. ती माझ्या केसांतुन हात फिरवत होती... आणि समोर टीव्हीवर एक गाणं सुरु होतं;
वहाँ कौन हैं तेरा मुसाफिर जायेगा कहाँ....

ऑफिस, टार्गेट, रिपोर्ट्स, रिव्ह्युझ, मंथ एन्ड, ....... आणि मनातल्या त्या व्यथा..... सांगाव्या तरी कुणाला???   ह्रद्य भरुन जातं. कुठूनशी एक कळ ह्रद्यात येतें आणि बराच काळ ती कळ त्रास देत राहते. ह्रद्याच्या जवळचं असं कुणीच नसतं..

कळा ज्या लागल्या जीवा, मला का ईशवरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या...

माझं वर्क प्रोफाईल सेल्स/मार्केटींगमधलं असल्यानं मला वाटु लागतं की मी माझ्या फिलिंग्ज्सचं पण मार्केटींग करु पाहतोय, बदल्यात मी काय अचिव्ह करणार ????  आणि त्याचा रिपोर्ट कुणाला करणार?? आणि मला काय अ‍ॅवार्ड मिळणार ?? " द फिलिंग ऑफ द मंथ"   :D:D:D

काही दिवसांनी लक्ष्यात येतं की आता या यातनेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवाच... म्हणुन डॉक्टरकडे जातो.. सगळ्या तपासण्या झाल्यावर भुवया उंचावून आणि चेहर्‍यावर उसनं हसू  आणुन  ते माझ्या हातात माझ्या ह्रद्यांच्या स्पंदनांचा आलेख देतात... मी वाचतो

ECG = Emotionally Confused Graph... :D:D:D


ते गाणं, ऐकता ऐकता बरंच काही सांगुन गेलं...

बीत गये दिन, प्यार के पलछिन
सपना बनी वो रातें.
भूल गये वो, तू भी भुला दे
प्यार की वो मुलाकाते....
सब दूर अंधेरा, मुसाफिर जायेगा कहाँ....

मला खरंच ठाउक नव्हतं की मी कुठे चाललोय ते.. पण चालायच तर होतंच ना... माझ्यासाठी कूणी थांबलं नव्हतं... वाट मलाही शोधायची होतीच पण तिच्याशिवाय एकटं चालणं मनाला पटत नव्हतं...

एकदा तिने मला विचारलं होतं, " जर मी सगळ्यानां सोडुन तुझ्याकडे कायमची आले तर??"
मी उत्तरलो. " हजारवेळा विचार कर. एकदा माझ्याकडे आलिस तर मला सोडुन जाण्याचा विचारही तुझ्या मनात येणार नाही!"  ( मायला मी उत्तर जरा जास्तच भारी मारलं का राव? ती कधी आलीच नाही, ;)

पण मग मी एकटं चालायचं ठरवलं. वाट वेगळी केली.. फक्त, माझी वाट एकट्याची होती...  नेहमीसारखीच.

जो मिल गया गया उसिको मुकद्दर समझ लिया,
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया....

छे ! ही गाणी फक्त फेसबुकवर स्टेटस म्हणून छान वाटतात.. कारण कित्येकदा विसरायचं ठरवून ही तिला विसरणं जमत नाही...
मला तिला विसरायचं होतं पण ते शक्य नव्हतं.. एव्हाना ती माझ्या अस्तित्वाचा एक भाग झालीय आणि स्वःताच्या अस्तित्वापासुन दूर राहता येतं का कधी? 
फक्त तिला मनातुन काढायचं होतं.माझ्यासाठी हे नविन नव्हतं. असं कित्येकदा मी तिच्यापासुन दूर गेलो होतो आणि असं प्रत्येकवेळी तिने मला.......

वाट वेगळी केल्यावर मी चालु लागलो, अनेकदा मागे वळून पाहिलं... त्या नादात बर्‍याचवेळा धडपडून पडलो.. पण मागे वळून बघण्यात अर्थ नव्हता... मनात ठरवलं होतं " This time I'll honor my commitmeint "  
मग त्या गाण्यातल्या पुढच्या ओळी ह्रद्यावर घाला घालू लागल्या...

कोई भी तेरी राह न देखे
नैं बिछाये ना कोई.
दर्द से तेरे कोई ना तडपा
आँख किसी की ना रोई
कहे किसको तू मेरा.... मुसाफिर जायेगा कहाँ....

- दीप

Thursday, January 12, 2012

सायंकाळी एके वेळी...

गजबजलेला दिवस सरताना आणि निद्रेची रात्र पांघरताना, या दोन्ही वेळेंना जोडणारी एक प्रसन्न संध्याकाळ मला नेहमीच हवी हवीशी वाटते. आज बर्‍याच दिवसांनी अशी एक संध्याकाळ आली. बरं, आली तर ती एकटी थोडीच येणार होती. मागल्या सार्‍या संध्याकाळच्या आठवणी सोबत घेउन आली. घराच्या बाजुला असलेल्या रेल्वे ट्रॅकवरुन एक ट्रेन मोठ्याने हॉर्न देत धडधडत निघून गेली. वेगळं काही नाही. या ट्रॅकवरुन अशा अनेक ट्रेन्स दिवस रात्र धडधडत ये-जा करत असतात. पण आजच्या या संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर ही ट्रेनही माझ्या आठवणी धडधडत घेउन आल्यागत वाटतेयं. समोरच्याच झाडावर दाटीवाटीने जमलेले पक्षी. स्थलांतर करुन आलेले. दिवसभरच्या प्रवासाने थकलेले, दमलेले. त्यांच्या त्या किलबिल आवाजातही माझ्या अशाच दडलेल्या आठवणी. आणि पश्चिमेकडे मावळणारे ते सोनेरी आकाश. अक्षरशः सोनेरी! जाताना सूर्याने दिवसभर गोळा केलेले सोने सायंकाळी क्षितिजावर फेकून गेलाय.. लूटा! ज्यांच्या नशिबात आहे त्यांनी ते लूटा! पण मला फक्त लूटायच्या आहेत त्या सोनेरी आठवणी.

आयुष्यातली महत्त्वाची स्थित्यंतरे या अशा संध्यासमयीच माझ्या मनाच्या क्षितिजावर दाटीवाटीने जमा होतात. मग सुरु होतो आठवणीचा पाठ्शिवणीचा खेळ. त्या सोनेरी क्षितिजाच्या रेषेवर उलगडत जातं एक एक पान. शक्य नसतं, सगळ्या आठवणी एका संध्येला वाहून देणं आणि अशी संध्याकाळ पुन्हा पुन्हा येणं हे ही आजच्या गजबजत्या आयुष्यात कठीण होउन राहयलयं. मग जश्या आठवणी त्या संधीप्रकाशात उजळत जातिल तश्या त्या चेहर्‍यावर खुलत जातिल. कधी किंचीत स्मित, कधी गालांवर स्वार झालेले ओठ, कधी खोल गेलेले डोळे, तर कधी हसणारे डोळे तर कधी ओलावलेल्या पापण्या.... 
आठवणी चेहर्‍याच्या तर्‍हाच बदलून टाकतात नै! आणि संध्याकाळ ही ती केवढी? अगदीच लहान.. जेमतेम डोळ्यांत भरुन वाहुन जाईल इतकीच... 

संध्याकाळ जीवघेणी असते. उजेड आणि काळोख यांचा मध्य साधणारी ही संध्याकाळ ह्रद्यात खोलवर रुतत जाते. मग कधी अश्याच जेवाघेण्या संध्यासमयी फराझच्या डोळ्यातुन हे शब्द पाझरले असतिल...

हुई है शाम तो आँखों में बस गया फिर तू
कहाँ गया है मेरे शहर के मुसाफ़िर तू .....
  

शब्दांची माळ गुंफत, असेच शायर, कवी या उद्विग्न संध्याकाळी निरंतर फिरत असतात...
मी सुद्धा असाच मग या संध्येच्या प्रवासाचा एक यात्रिक होउ पाहतो. माझ्या जोडीला असते माझी उध्वस्त कविता आणि संध्येला वाहीलेले डोळे. मी ही शोध घेत राह्तो त्या हरवलेल्या नजरेचा. माझ्या उध्वस्त कवितेला कधी तुझ्या अस्तित्वाची छाया जरी मिळाली तरी मग ती कविता फूलु लागेल. विखुरलेल्या शब्दांना एक लिरीकल आयाम मिळू लागेल. तुझ्या डोळ्यातून पाझरणारे संध्येचे शब्द माझ्या ओठांनी टीपून घेईन, तुझा एखादा असाच कधीचा चोरटा स्पर्श माझ्या अंगावरुन शहारुन जाईल आणि मग माझी ही एक कविता अशीच तयार होईल...  

अशीच एक संध्याकाळ
माझ्या मनात साचलेली.
तुझ्या स्पर्शाची आठवण
पापणीआड दाटलेली...

तुझ्या या अशा चोरट्या स्पर्शाच्या आठवणीत मला लोटुन माहीत नाही ही संध्याकाळ आता मला कुठे घेउन जाईल. माझ्या क्षितिजावरली संध्याकाळ तुझ्या क्षितिजावर ही उमटेल का? कधी पुन्हा जर अशीच एखादी संध्याकाळ जर मिळाली ना तर मग मी तुला साद देईन, मनात सारे आकाश भरुन माझ्या क्षितिजाच्या रेषेवर निघून ये. उरात असलेले सारे कोंडलेले, गुदमरलेले श्वास माझ्या मिठीत रिते कर...निघून ये डोळ्यांत भरुन सार्‍या दु:खांचा पाउस आणि करुन टाक चिंब मला... ये घेउन तुझं ते घायाळ ह्रद्य !!

खायला उठलेल्या जगापासून, सर्वकाही सोडून एक कोकरु हळूच, धडधडते, कोवळे ह्रद्य एका सिंहाच्या हवाली करते,ते ही अशाच संधीप्रकाशात! आणि तो सिंह ही त्या कोकराच्या किलकिलत्या डोळ्यांत पाहुन अस्पष्टपणे उच्चारतो,
"And, so the Lion fell in love with Lamb..!"
आणि या त्याच्या वक्तव्यावर ते कोकरु स्वःताच्या वेडेपणावर हासत बोलते, 
"What a stupid Lamb!"
आणि मग त्या संधीप्रकाशात दोघेही विलिन होउन जातात. प्रेमाचा हा वेडेपणाही अशाच एका संध्येला भरात येतो.  त्याच्या आठवणीत उद्विग्न, झालेलं कोकरु मग त्या सांजगारव्यात गाउ लागतं...
   

I'hv died everyday waiting for you,
Darling don't be afraid I've loved you,
For a thousand years,
I'll love you for a thousand more years...
 

Saturday, December 31, 2011

असंच... काहीसं...

यावर्षातली ही शेवटची पोस्ट माझ्या आवडत्या जागी म्हणजेच सीसीडीमध्ये, माझी आवडती एसप्रेसो घेत  लिहितोय. माहित नाही पुर्ण करेन की नाही. हे लिहिण्याचं व्यसन सुरु ठेवलंच पाहिजे, कॉफीचं कमी केलं पाहिजे -;)

काही तरी लिहावं ही खूप दिवसापासूनची इच्छा.. बरेच दिवस ब्लॉगवर काहीच लिहिलं नाही., काही सुचतच नव्हतं. शब्द जसे दूर मला एकट्याला कुठेतरी सोडून गेल्यासारखे. परके झालेले. अनेकदा लिहायचा प्रयत्न केला,पण कधी अपूर्ण तर कधी खोडून टाकलं. हे नेहमी असंच होत राहीलं. पारिजात, नक्षत्र, कॉफी, पाउस, वारा, ढग, फुलपाखरं, हे माझे नेहमीचे शब्दही मला सोडून गेल्यासारखे, इतके दूर की एक ओळ ही सुचत नाही. माणसं सोडून गेल्याच्या दु:खापेक्षा माणसं तोडल्याचं शल्य नेहमी मनात रुतत गेलं. 
"दर्द का हद से गुजरना है , दवा हो जाना" हे गालिबचे शब्द अगदी माझ्या आत्म्यात भिनलेले. मग कधी कधी हा ही विचार मनात की; "तू ने भी तो तोडे है दिल अपनोंके, दर्द सिर्फ तेरा ही हमराज नहीं"

हे असं झालं ना की मन पिळवटून निघतं. चांगलं -वाईट, चूक - बरोबर, आयुष्यातले हे आलेख कधी व्यवस्थित बसतच नाहीत. हे सगळं एकदा व्यवस्थित केलं पाहिजे. हा सगळा अट्टाहास फक्त अस्तित्त्वाचा नाही तर अस्मितेचा आहे. पण स्व:ताची अस्मिता जपताना दुसर्‍याच्या अस्मितेला आणि अस्तित्त्वाला जराही धक्का लागता कामा नये याची खबरदारी मला घेतलीच पाहिजे.

जहाजे येतात जहाजे जातात
किनारा नेहमी स्तब्ध असतो
प्रत्येक भरकटलेल्या जहाजाला
आशेचा तो एक शब्द असतो...

कधीतरी या चार ओळी लिहिल्या होत्या, आणि आता त्या जाणवू लागल्या. मग मी जहाज की किनारा या संभ्रमात हेलकावे खात. पण मग जाणवू लागलं की हे दोन्ही रोल मला पार पाडायचेत. कधी स्तब्ध, शांत किनारा होउन भरकटलेल्या जहाजाला मला आश्रय द्यायचाय, तर कधी एखाद्या जहाजासारखं महासागरात हरवलेल्या दिशा शोधत भरकटायचयं. किनारा आणि जहाज यांचा निकटचा संबध. दोघेही एकमेकांना आसुसलेले. पण जहाजाच जन्मच मुळी महासागरात विहार करण्यासाठी झालेला, किनारा त्या जहाजाला थांबवू शकत नाही. हे किनार्‍याला समजायला हवं... मग काय ?काही नाही...

व्हावं कधी जहाज आणि धुंडाळाव्या नव्या दिशा.. तसंच
होउन कधी निश्चल किनारा द्यावी  जहाजास आशा....

माझ्या सर्व ब्लॉगवाचकांना आणि ब्लॉगर्स मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या खूप सार्‍या
शुभेच्छा....

आपलाच
दीपक, दीप्स, दिप्या .... :)


Saturday, June 11, 2011

सख्ख्या मैत्रीणीचं पत्र

प्रिय दीपक.,
तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! -:)
आज पहिल्यांदाच तुला पत्र लिहितेय. तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडुन ही एक भेटच समज ना. तसं पण माझ्याकडे आहे काय द्यायला तुला?
वाटलं तुझा वाढदिवस आहे तर जरा वेगळ्या पद्धतिने तुला विश करुया, सही ना?

बरेच दिवस मनात ठरवलं होतं की तुझ्यशी बोलायचं पण तू आजकाल इतका व्यस्त असतोस की..मग म्हटलं जाउ दे तुला पत्रच लिहुया..
त्यात आपण गेले कित्येक दिवस मनमोकळेपणाने बोललोच नाही..म्हणजे फक्त तू बोलत असतोस, माझं काम फक्त ऐकणं...
आज तुझा वाढदिवस ! मग व्हेअर इज द पार्टी मॅन! आज काय प्लॅन आहे? काही असो तू नंतर सांगशीलच म्हणा..

आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणजे तुझ्याबद्दलच बोलायचं आहे. किती वर्षे झाली रे आपण एकमेकांना ओळखतोय? लक्ष्यात नाहीए आता.
आठवतं ज्यादिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो किती भराभरा बोलत होतास तू! सगळं काही एका दमात सांगून संपवायची तुझी घाई.
लहानपणाच्या तुझ्या खोडी, घरातल्यांचा मार, शाळेतल्या गमतिजमति. शाळेतली ती तुझी मैत्रीण जिला सायकलवरुन तिच्या घरी सोडलं होतं. किशोरवयातलं पहिलं - वहिलं प्रेम!
मग ती दिवसातुन एकदा तरी दिसावी म्हणून तिच्या घरासमोरुन दिवसभर सायकलवरुन मारलेल्या चकरा.सहलीच्यावेळी तिला दिलेलं गुलाब... सारं काही भराभरा सांगत होतास आणि
मी शांतपणे ऐकत होते.
एक गोष्ट नोट केलिय का? बोलताना तुझे डोळे विलक्षण चमकतात. श्वास नेहमी फुलतात. प्रचंड अधिरता असते तुला एखादी गोष्ट सांगून संपवेपर्यंत.
कधी गमति जमति सांगताना तुझं ते खळाळून हसणं तर कधी आयुष्यातले कटु आठवणी सांगताना खोल गेलेला तुझा आवाज आणि निस्तेज डोळे!  सारं काही मी साठवून ठेवलयं, बंद करुन ठेवलयं कुठेतरी!

कॉलेजमध्ये असताना, तिने तुझ्या वाढदिवसादिवशी तुझ्यासाठी माँजिनीजमधून एक केक आणला होता, गिफ्ट म्हणून एक सुंदर  ग्रीटींग कार्ड आणि एक छोट्या बाहुलिचा स्टॅच्यु, तिचं रूप म्हणून ! किती खूश झाला होतास ना तू त्यादिवशी. तू सांगितलंस मला, "It was a first time in my life I cut a cake and got a gift on my birthday! Seems it is my first birthday ! Rather than a card she is the most beautiful gift i ever had!"
त्यावेळचे तुझ्या डोळ्यातले ते थेंब मला अजुनही आठवतात.. तुझ्या आयुष्यातले ते सगळ्यात हॅपनिंग डेज! जेव्हा तिच्याबरोबर तू आकाशाला गवसणी घालू पाहत होतास. तिच्या प्रत्येक भेटीनंतर मला सगळं काही सांगणं. या ना त्या
कारणाने ह्जारदा तिचं नावं कोरुन कोरुन सांगणं. मला ते सगळं आवडायचं. एखाद्या गोष्टीत  मनापासुन  गुंतुन जाणं मी खुपदा अनुभवलयं तुझ्याकडून आणि तुझं गुंतणं ही तसचं सहजा सहजी न सुटणारं! आजही तू तसाच आहेस! 
असो!

बरेच दिवस झाले आपण समुद्रावर गेलो नाही. वाळूत लोळलो नाही, किनार्‍यावर निजून मावळणारा सुर्य पाहिला नाही, संधीप्रकाशातली तुझी गाणी ऐकली नाहीत, अंधार पडल्यावर गार वारा अंगावर झेलत आकाशातले तारे मोजले नाहीत. बरंच काही मिस्ड करतोय ना आपण. 
परत जाउया एकदा. पुन्हा ते हरवलेलं विश्व शोधायला. मावळणारा सुर्य समुद्रात बुडेपर्यंत डोळे भरुन पाहताना मला तुला पाहायचयं आणि त्या खार्‍या वार्‍यासोबतची तुझी गाणी ऐकायची आहेत.

गेले काही दिवस तू शांत होतास. तू शांत असलास की मला फार भीती वाटते. तुझ्या आयुष्यातली बरीच वादळं अशीच शांतपणे तुला उध्वस्त करून गेल्याचं मी पाहिलयं, म्हणून रे! आणखि काही नाही. त्यात माझ्याशिवाय तू दुसर्‍या कुणाला काही सांगत नाहीस. नेहमी सगळं स्वःतामध्ये गाडून ठेवण्याची तुझी वृत्ती! गेली काही वर्षे तर तू चक्क माझ्याशीही अबोला धरुन होतास. तू फक्त मला समोर ठेवून बघत राहायचास. काही बोलायचा नाहीस. तुझ्या डोळ्यांतून ते सारं दिसायचं . तुझं गप्प राहणं मला नेहमी टोचायचं. तुला असं शांत पाहिलं ना की मला कसं तरीच व्हायचं. समुद्र नेहमी उधाणलेलाच छान दिसतो. तुझी अस्वस्थता मला ठावुक आहे. तुझ्या कविता, तुझे शब्दच बोलतात सारं काही. 

तुझ्या मनाचा ठावं घेणं कधी
जमणार नाही मला. नेहमीच चंचल! हसवता हसवता कधी रडवून जाशील ते नाही सांगता येणार. तसं पण हसवण्यापेक्षा रडवणं चांगलचं जमतं तुला. कितीही वादळातून उध्वस्त झालास तरी पुन्हा पुन्हा नव्या वादळात एकट्याने जाण्याची तुझी नशा! किनारे तुटले तरी पुन्हा ते बांधून काढण्याचा तुझा हव्यास!  हे सगळं कुणाच्या प्राक्तनातून सुटलं नाही रे! तू एकटाच याला अपवाद नाहीस; प्रत्येकाला अशा  प्रसंगातून जावंच लागतं. जे तुला स्विकारतिल जे तुला नाकारतिल ते ही सगळे  एकाच नावेतिल प्रवासी. मग त्यांच्याबाबत तू इतका कठोर का होतोस? तुझी कठोरता मला ठाउक आहे. एकवेळ  पाषाणाला पाझर फुटेल पण तुझ्या कठोरतेला नाही. पण ही कठोरता तुझ्या आयुष्यात कुठुन आणि कशी आली? तू नव्हतास असा, अ‍ॅक्च्युअली तू नाहीस असा. या कठोरतेचं कारण मला ठाउक आहे. ते घाव तूच सोसले होतेस आणि ज्यांनी ते दिले ते दुसरे कोणी नव्हते तुझे जवळचेच, तुला आपलं म्हणणारे, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारे, तुझे मित्र, तुझे नातेवाईक या सगळ्यांनिच तुला इतकं कठोर केलयं.
पण मला वाटतं जे झालं ते झालं, हे सगळं विसरुन जा. या कठोरतेचा नाश कर आणि पुढे चालू लाग. मला
माहित आहे तुझ्याबाबत ते इतक्यात शक्य नाही. पण प्रयत्न कर मी आहे तुझ्यासोबत.

तुझ्या आयुष्यात आजवर अनेक माणसं आली आणि गेली. काहींना तू तोडून गेलास तर काहींना तुला तोडलं. हे सुरुच राहणार. हे होतचं असतं त्याशिवाय माणसं कळत नाही आणि आपल्याला ही जीवन जगण्याचा अनुभव येतो, आपणही स्वःताला ओळखू लागतो. आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. माणसं येत राहतिल आणि जात राहतिल. प्रत्येकवेळी जगण्याचा तुला ते एक वेगळा अनुभव देत राहतिल. अपण कुठे चुकलो हे शोधणं फार गरजेचं आहे, नाही का? तू सुद्धा चूकलास! अनेकदा. ठीक आहे! आयुष्य आहे हे  आणि माणसं चूकणारचं! पण काही मित्र खूप स्पेशल असतात रे ! त्यांना जपून ठेव. काही माणसं पुन्हा मिळत नाहीत. ते तुला हर्ट करतिल, तुला काही बोलतिल पण ते सगळे आपले मित्र आहेत आणि ते नाही बोलणार तर अजुन कोण?
उगाच मनाला लावून घेउ नको. माणसं
जोडणं सोप्पं आहे, त्यांना तोडणं तर त्याहुन ही सोप्पं आहे पण सगळ्यात कठीण आहे ते त्यांना जपून ठेवणं.जे तुला अजुन शिकायचं आहे. तुला माणसं टीकवता येत नाहीत. तुझा ईगो तुला थोडा जपायला हवा. असो. हे तुला मी संगणार नव्हते पण आज नाही राहवलं.

आठवतं त्या दिवशी नीशा काय बोलली, " D, you are just like a Teddy Bear ! Everyone around you likes you but nobody loves you! "
तिचं ते वाक्य तू किती दिवस तरी मनात ठेवून होतास. का माहित का मलाही  तिचं ते वाक्य काहिसं पटलं. नंतर तू बरचं काही बोललास माझ्याशी स्वःतबद्दल आणि तिच्या त्या वाक्याचे निकष तुझ्या आयुष्यातल्या प्रसंगावर कसे खरे उतरत होते हे मला पटवून देउ लागलास.पण तुझं तिला ते प्रत्युत्तर मला आवडलं, " So what Neesha, At least everyone likes me !"  
जाउ दे ! इतकं काही मनाला लावून घेण्यासारखं नाही बोलली ती. सोड ना यार काय फरक पडतो! It's damn life dude !

चल! मला वाटतं पत्र फारचं लांबलयं.  मी का तुला  उगाच लेक्चर देतेय! आज तुझा वाढदिवस ( मी का पुन्हा पुन्हा तुला हे सांगतेय!) जस्ट  एंजॉय इट ! बरेच दिवस तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून
हा पत्रप्रपंच आणि काही नाही!

तसं पण पुन्हा तुला वेळ नाही मिळणार तू तुझ्या नेहमीच्या आयुष्यात बिझी होणार. तुला आज काल वेळच नसतो माझ्यासाठी. तू तुझा तो पकाव लॅपटॉप आणि तुझा आय पॉड ! असो. पण मला माहित आहे की तू मला तुझ्यापासून कधी दुर नाही करणार. 

चल आता आवरतं घेते. तुझ्याबद्दल बोलायचं तर हा कागद कमी पडतोय( अ‍ॅक्चुअली माझे हात दुखले रे लिहून ;) ) पुन्हा बोलु कधीतरी निवांतपणे समुद्राच्या किनार्‍यावर, वाळूत निजून,
गाणी
गात आकाशातल्या चांदण्या मोजत.

तुला तुझ्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा! आणखि काय बोलू? आणि हो आता लग्नाचा विषय जरा सिरिअसली घे !

You know something, love sucks mate ! And 28 years are enough to understand that love sucks badly !
Get a nice girl, get married and have a best life !!


तुझी सख्खी मैत्रीण,
तुझी डायरी. :)

Sunday, February 13, 2011

फ्रॉम द ओल्ड डायरी...

त्यादिवशी अ‍ॅप्सशी ( अपर्णा ) चॅटवर बोलताना डायरीची आठवण झाली. डायरी कधी काळी लिहायचो, काहीतरी खरडायचो..म्हणजे नेहमी नाही हां. रोजनिशी वैगरे तसला प्रकार नाही. बस्स कधी असाच कंठाळा आला की काहितरी खरडत बसायचं. बरं ती डायरी सर्वसमावेशक असायची. म्हणजे त्यात माझं मनातलं खरडणं, क्लायंटसचे अ‍ॅडरेसेस, फोन नंबर. क्वेरीज, ऑफीसच्य मिटींग्जच्या नोट्स सारं काही. म्हणजे ती डायरी कुणाच्या समोर उघडू पण शकत नसे.. आजकाल मी डायरी वापरत नाही, लॅपटॉप आल्यापासून. आता डायरीची जागा लॅपटॉपने घेतली. यातही बरचं काय काय आहे. पण नशीब वेगवेगळ्या कप्प्यात ठेवता येतं. त्यामूळे लॅपटॉप हवा तिथे कुणाच्याही समोर ओपन करून माझं काम करता येतं. आणि खरं सांगतो लॅपटॉपवर जितक्या पटपट सुचत ना, तितकं डायरीवर नाही सुचायचं..
तर डायरी.. आज संध्याकाळी घरी आल्यावर मम्मीच्या मागे लागून लागून तिला शोधायला लावली. डायरी शोधता शोधता अजुन दोन डायर्‍या सापडल्या. त्या डायरीला बघताच असचं पटकन काळजात थोडसं दुखलं. डायरी हातात घेतली, मम्मीच्या शिव्यांसकट. डायरीवरली धूळ हलकेच पुसली. असचं कुणीतरी खूप वर्षानी आपल्याला भेटावं आणि आपल्याला त्या व्यक्तीने स्पर्श करावा, मायेचा हात केसांवरुन फिरवावा तसं जाणवलं. डायरी उघडली, पहिल्या पानवर माझं नाव, त्याखाली माझा त्यावेळचा सेल नंबर आणि माझा रेडीफमेलाचा  ई मेल आयडी dparulekar@rediffmail.com आईशप्पथ! मी हा आय डी विसरुनच गेलो होतो.. 

हलकेच पानं उलटु लागलो आणि आपोआप मन मागे मागे जाउ लागले. काय काय लिहिलं होतं त्या डायरीत. कुणाकुणाच्या कविता, गाणी.. कुणाकुणांची नावं.. कैच्या कै होतं सगळं. त्यावरुन एक किस्सा आठ्वला. ४ वर्षांपूर्वी मी नेट फोर मध्ये असताना माझ्या टीममधल्या एका मुलाला माझी डायरी दिली आणि बोललो अरे इथे बघ जरा, इन्वेंचर सिक्युरिटीज चा  नंबर आहे त्याला फोन कर आणि पेमेंट स्टेट्स विचार.. थोड्यावेळाने तो आला, " सर राँग नंबर आहे!" 
"काय? राँग नंबर कसा असेल? अरे मी नेहमी याच नंबरवर बोलतो तिथे.. पुन्हा ट्राय कर !" 
तो परत गेला आणि थोड्या वेळाने परत आला, " सर! राँग नंबर आहे, ती बाई ओरडते मला सारखी!" " बाई??? कोण बाई??"  (हा तर अर्जुनचा नंबर आहे मी मनात पुटपुटलो) अरे , तू कुणाल कॉल करतोयस? 
"सर ह्याच नंबरवर पल्लवी मॅडमना" 
"आयचा घोव तुझ्या! साल्या इथे अर्जुन लिहिलय ते दिसत नाही तुला, पल्लवी बरोबर दिसली..!!" 
"तुझाच टीममेट ना तो!" कूणी तरी मध्येच खेकसलं.. 
त्या डायरीमधे मला सवय होती (अजूनही आहे) कंठाळा आला की मुलींची नावं, जी मला आवडतात ती मी वेगवेगळ्या फाँट्समध्ये काढायचो, त्यात जास्त नक्षत्रांची नावं असायची म्हणजे उत्तरा, पूर्वा, जेष्ठा, रोहिणी वैगरे..वैगरे... कधी त्यात मैत्रीणींची नावं जसं या पल्लवीचं होतं.. असो.

टीसीएस मध्यी झालेल्या एका मिटींगची मिनीटस आहेत. वेल, मिनीट्सच्या शेवटी मी त्या टीसीएस च्या मुलीचं नाव लिहीलं होतं,मौसुमी. आणि तिचा सेल नंबर आणि पर्सनल आयडीपण.. हि एक चांगली मैत्रीण होती म्हणजे आता कुठे आहे माहित नाही..
जागोजागी रिहानाचं नाव पण कोरलयं.. वेल माझी फेव्ह सिंगर आहे हां !
ओह! हो!! कधी काळी तबला शिकायला जात होतो.. त्या क्लासमधले नोट्स आहेत.. 
तालः त्रिताल, मात्रा: १६, भागः ४ ( ४*४) , ३ टाळ्या, एक खाली.. २,५,१३ या मात्रांवर टाळी. ९ व्या मात्रेवर खाली.. हे हे हे.. 
( बायदवे त्या क्लासमधे गाणं शिकवणारी एक मुलगी सहीच होती.. अर्पिता की काय नाव तिचं.. मला गाणं शिकायचा मोह आवरला नव्हता.. असो :) नंतर पनवेला राहायला आल्यावर तबला बंद झाला)
 
नंतर दुसरी डायरी उघडली यात पहिली ३-४ पाने खरडली होती. लेखाचं नाव होतं "संध्याकाळची संध्या" वेल, शाळेत असताना एका मुलीवर जरा जास्तच सिरिअस झालो होतो.शाळेतल्या त्या आठवणी खरडल्या होत्या.वाचून अगदी हसायलाच आलं.काय काय लिहिईलं होतं मी तिच्याबद्दल. हे हे हे !! 
नतंर काही पानांवर कवी ग्रेस यांच्या काही कविता उतरवल्या होत्या.
पुढल्या पानावर अजुन एक लेख" Forgiving But Never Forgets!" 
नको ! हा लेख वाचावासा नाही वाटला, फक्त नजर फिरवली आणि पुढे वळलो. 
पुढे खोडलेले, अर्धवट परिच्छेद दिसले. कदाचित पुढे काही सुचलं नसेल किंवा भरकटलो असेन म्हणून अर्ध्यावरच सोडून दिलेले.
प्रत्येक पानावर नावं आहेत कोरलेली (खर्‍या नक्षत्रांची). 
एका पानावर मी माझ्या मित्रांची नावं लिहिली आहेत. तेजस, सिरीष्,समीर खान्,बन्या, गोकूळ्.,अमोल्,योगेश्,विजय... का लिहिली होती ते आठवत होतो, जाउ दे आठवत नाही...
"माझे प्रश्न फारसे वेगळी नाहीत फक्त त्यांचे संदर्भ वेगळे आहेत." या वाक्याने सुरु केलेला आणि अर्ध्यावरच सोडलेला एक उतारा सापडला.तो अर्ध्यावर का सोडला हे कळलं वरच्या वाक्याने सुरु होउन तो ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत पोचला होता म्हणून त्याला आवरला...:) 
बाजुलाच CHELSEA, ACHILLES  आणि TROY असं कोरलंय.
LUFTHANSA,VENOM, OSCAR  हे पण वेगवेगळ्या फाँट्समध्ये.
मी पार्ल्याला राहायला होता तेव्हा टेरेसवरुन नेहमी लँड आणि टेक ऑफ होणारी विमानं पाहायचो.तो कसला तरी छंदच होता अणि मग वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या लोगोज आणि प्लेन्स काढायचो. LUFTHANSA आणि QANTAS कांगारु एकदम फेव्हरिट.त्या पहिल्या डायरीत बरीच प्लेन्स सापडली..  
"कधी कधी हे जगणं नकोसं वाटतं, एकच क्षणात सारं संपवून टाकावसं वाटतं" अम्म्म फ्रस्ट्रेट असेन... :) 
२५ व्या बर्थडेच्या वेळी लिहिलेला "वळणं" नावाचा लेख आहे. यात स्व:ताची जरा जास्तच स्तुती केलीय मी...... 
२६.१२.२००९ला ( पहिल्यांदा मी एखाद्या लेखाला तारिख टाकली होती ) त्या वर्षाचा आढावा घेणारी २-३ पाने दिसली.. वाचून सगळं डोळ्यांसमोरुन झर्र्कन निघून गेलं.पूढे माझ्या काही  चारोळ्या.. वेल या डायरीत फक्त लेख आणि कविताच आहेत म्हणजे ही डायरी फक्त मी खरडण्यासाठी वापरत असे.. 

ट्युलिपमध्ये जॉईन झाल्यापासून मी नेहमीच्या नोट्ससाठीपण डायरी हा प्रकार वापरत नव्हतो, जे काही आहे ते सगळं नोट्पॅडवरच टायपतो.. एकदा बॉस भडकला होता, जब लॅपटॉप खराब हो जाएगा तो क्या करेगा?? 
अरे काळ्या जीभेच्या जरा चांगलं बोलत जा की जरा! पण तो बोलला ते पटलं. मागल्या कंपनीत असताना लक्ष्मीपुजनाच्या वेळी भटजीनी वाट्लेल्या लक्ष्मीमातेचं चित्र असलेलीं चोपडी सापडली. पहिल्याच पानावर कसलं तरी लक्ष्मी यंत्र की काय आहे.असो सध्या हीच ऑफीशिअल डायरी म्हणून वापरत होतो. दोन दिवसांपूर्वी ऑफीसमध्ये माझ्या नावाचं एक जाडजूड पर्सल आलं. DOW CORNING या क्लायंट्सकडून आलं होतं. काय असेल त्यात म्हणुन ओपन केलं ४ डायर्‍या होत्या.. स्वःताला एक ठेवून बाकीच्या टीममधल्या ३ लोकांना दिल्या.
ती डाव कॉर्निंगची डायरी इतकी मस्त आहे की, ऑफीशिअल नोट्स लिहून खराब करावीशी नाही वाटतं.. नक्षत्रांनो मी येतोय... 
अशी डायरीची मज्जा मज्जा!  
आताची डायरी म्हणजे माझा लॅपटॉप आणि त्यात असलेलं डी नावाचं फोल्डर. आणि हो जीमेलचा ड्राफ्टबॉक्स पण!!
चला जपून ठेवतो. परत कधी कंठाळा आला की वाचायला काढेन..

Monday, December 20, 2010

स्पर्शांचे आलेख !


स्पर्श! 
खुप काही सांगतो ना? जेव्हा बोलुन बोलुन थकतो. शब्द संपतात. डोळेही  सांगुन सांगुन थकतात तेव्हा एक स्पर्शच सगळं काम करुन जातो ना? 
म्हणजे बघ ना! आपण एखाद्यावर प्रेम करतो. बर्‍याचदा बोलण्यातुन, लिहिण्यातुन, नेहमीच्या वागण्यातुन आपण ते जाणिव करुन देण्याचा प्रयत्न करतो. काहींना ते कळतही, काहींना कळत नाही आणि काहींना कळत असुनही वळत नाही आणि काहींना कळुन घ्यायचचं नसतं. मग अशावेळी एक नाजुकसा स्पर्श सारं काही सांगुन जातो. अनुभवलेयत कधी हे स्पर्शशब्द? फार वेगळं, काहीसं, कुठेतरी नेउन सोडणारं! एका क्षणात भावनांची जाणिव करुन देणारे स्पर्श! 

स्पर्श तरसणारे, बरसणारे, शहारणारे, मोहवणारे...  स्पर्शांची जादुच काही वेगळी असते. लहानपणी आईचा मांडीवर किंवा कुशीत शिरल्यावर, तिचा पाठीवरुन थोपटणारा हात कधी झोपेत घेउन जायचा कळायचे देखिल नाही. मग कधी रागाने मारलेला धपाटाही, जोरात बसला तरी तितकाच प्रिय! कौतुकाने घेतलेला एक पापा, गालगुच्चा, दृष्ट काढताना कडाकडा मोडलेली बोटे, राग ओसरल्यावर छातीशी घट्ट धरलेली तिची मिठी हे सगळं तिच्या शब्दातुन इतक्या सहज समजलं नसतं ना? म्हणुन मग स्पर्श! 

आईसारखा बाबाचाही हात. खरखरीत, ट्णक असला तरी जेव्हा तो मायेने फिरायचा तेव्हा त्यातल खरखरीतपणा कुठ्ल्या कुठे गायब व्हायचा. काटेरीपणा निघुन जायचा आणि मग रसाळ फणसातल्या गर्‍यांसारखा गोड वाटायचा!
वयाबरोबर मन आणि शरीरही बदलु लागतं आणि स्पर्शही बदलु लागतात. पण खरं सांगतो आई-बाबांचा स्पर्श तसाच राहतो.

आपल्या आयुष्यात कुणीतरी मन चोरुन नेणारं येतं. आपण तिच्याबरोबर नेहमी बोलतो, ती सुद्धा नेहमी बोलत राहते. बडबड, गप्पा, गाणी, नेहमीच्याच.पण कधी कधी हे सगळं पुरेसं नाही होतं. शब्द समजतात, पण त्या शब्दांमागच्या  भावना स्पर्शांशिवाय नाही समजत! 
बोलता बोलता एकदा तिचा हात हातात घ्यावा. बोटांत बोटे घट्ट गुंतवावी! त्या स्पर्शाबरोबर तिला आपल्या विश्वात घेउन जावं. तसाच तिचा हात घट्ट धरुन. ती ही मग सारं काही विसरुन त्या स्पर्शावर स्वार होउन मुक्त विहार करु लागते.

कधी कधी ती गोड दिसते. तशी ती नेहमीच गोड दिसते! ती समोर बसलेली असते. तिच्या चेहर्‍यावर एक वेगळीच लहर असते. ती बोलत राहते, हसत राहते, आपण सारं जग विसरुन तिच्या त्या बोलण्यात, हसण्यात स्वत:ला हरवून टाकतो. मग तिला वाटतं की तुमचं लक्ष्य नाहीए तिच्या बोलण्याकडे मग ती सारखी हात लावुन, कधी एक टपली देउन तुम्हाला तिच्याकडे बघायला सांगते. कधी अनुभवलाय तो जाणिवेचा स्पर्श?

कधी कधी ती नाराज असते. उदास होते. दु:खी होते. अश्रुंनी तिचे डोळे भिजतात. मग आपसुकच आपले हात तिच्या गालांवर जातात. आणि ते ओघळणारे अश्रु  जमिनीवर पडायच्या आधीच आपल्या  बोटात मुरुन जातात. कधी कधी हे अश्रु आपण  नुसत्या बोलण्यानेही पुसु शकतो पण ते स्पर्शांनी पुसण्याची गोष्टच काही न्यारी असते. त्या स्पर्शात तिच्या मनात एक जाणिव निर्माण होते की आहे कुणी तरी आपलं, आपले अश्रु पुसणारं!

कधी कधी ती धुंद होते. बरसणार्‍या पावसाच्या सरींचा स्पर्श अंगावर झेलते. झोंबणार्‍या वार्‍याने ती शहारते. धुंद होउन, स्वैर होउन त्या पावसाशी आणि वार्‍याशी खेळू लागते. तिच्या शरीराची होणारी लाही लाही पावसाच्या सरी शीतल करतात. गार वारा त्यावर अलगद फुंकरही घालतो. पण तिच्या तप्त मनाला गारवा फक्त तो एक स्पर्शच देतो. तिच्यासोबत आपणही भिजावं, धुंद व्हावं, आणि मग ती थंडीने कुड्कुडायला लागल्यावर तिला आपल्या बाहुत बंधिस्त करावं. ती थरथरुन आपल्या मिठीत शिरते. तिच्या सर्वांगावर ओघळणार्‍या पावसाच्या सरींनी ती चिंब होते. त्यावेळी तिच्या डोळ्यात बघावं. लाजेने आरक्त झालेल्या तिच्या गालांवरील पावसाचे थेंब टीपून घ्यावेत्.लाजुन ती मिठीत अजुनच घट्ट शिरते. तिच्या मानेवरुन ओघळणार्‍या थेंबाना टीपून घ्यावे. आता तिचं तप्त मन कुठेतरी गार होत असतं. ती हळूच तिचे उष्ण श्वास कानाजवळून नेते आणि छातीवर विसावते. गरम पाण्याचा झरा फुटावा तसे तिच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी आपल्या छातीवरुन वाहु लागते. ते सुखाश्रु असतात! पाउस अजुन कोसळायला लागतो. विजा तळपायला लागतात,ढग गडगडायला लागतात. उधाणलेल्या समुद्राच्या किनारी, भर पावसात, उधाणलेली मने घेउन आपण उभे असतो. ढगांच्या गडगटाने ती घाबरुन आपल्याला घट्ट धरते. त्याचबरोबर तिला वेढलेले आपले हातही अजुनच घट्ट होतात. घाबरलेल्या सश्याच्या पिल्लासारखी ती धापा टाकु लागते. तिच्या श्वासांचा वेग वाढतो. अशावेळी तिच्या हनुवटीला स्पर्श करुन तिचा चेहरा आपण समोर धरतो. तिची नजर कावरीबावरी असते. तिच्या चेहर्‍यावरुन पावसाचे थेंब ओघळत असतात. दोन्ही हातांच्या ओंजळीत तो चेहरा भरुन, डोळे बंद करुन तिच्या ओठांवर विसावलेले थेंब प्राशुन घ्यावेत. त्याचवेळी पावसाला अजुन जोर येतो, वारा भरकटल्यासारखा वाहु लागतो. समुद्र जोरदार गर्जना करत लाटांचा मारा करतो! अनुभवलाय कधी हा भिजलेला स्पर्श?

कधी कधी एक दुरावा निर्माण होतो. गैरसमजाची अनामिक दरी तयार होते. ती दरी दोघांना पार करायची असते, कारण दोघांना माहित असतं की आपण एकमेकांशिवाय नाही जगु शकत. पण कधी कधी दरी इतकी खोल होते की एकमेकांचे घट्ट धरलेले हात सुटतात. न बोलताच, न बघताच, न जाणताच आपण एकमेकांपासुन दुर होतो. पण जास्त वेळ  दुर नाही राहु शकत. ही समज - गैरसमजाची दरी बुझवून टाकायलाच हवी. खुप दिवसांच्या विरहानंतर आपण एकमेकांना भेटतो. एकमेकांच्या नजरते आरपार बघतो. पटकन जाणवतं की एकमेकांना खुप मिस्ड केलयं आपण, कारण एकमेकांच्या डोळ्यांमध्ये आपलीच प्रतिबिंब दिसतात. अशावेळी काही बोलायचं नसतं. सगळे गैरसमज मिटलेले असतात. न बोलताच, कोणतंही एक्स्प्लेनेशन न देता. ते सारं काही नजरेतुन सेटल्ड होतं. खुपवेळ आपण एकमेकांना बघत उभे असतो. एकमेकांच्या स्पर्शाला तरसलेले असतो. तिच्या गालावरुन अलगद, हिमनदीसारखे संथ वाहणारे गोठलेले पाणी न राहवुन आपण पुसायला जातो आणि तिच्या गालांवरुन हात फिरवतो. आपल्या पापण्यांच्या कडाही ओल्या होतात पण शक्यतो पाणी कोसळत नाही. ती पटकन आपल्या हातावर हात ठेवते आणि विवश होउन तिला मिठीत घेतो. आता तिच्या अश्रुंचा बांध फुटतो आणि एका मोठ्या आत्मविश्वासाने ती रडु लागते.
"अ‍ॅम सॉरी, मी नाही रे राहु शकत तुझ्याशिवाय, प्लीझ मला पुन्हा सोडुन नको जाउस!" तिच्या या शब्दानी आपण अधिकच व्याकुळ होतो आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतो.
" अ‍ॅम सॉरी टू! नाही जाणार पुन्हा तुला सोडुन कूठे! मी ही नाही जगु शकत गं तुझ्याशिवाय!" 
तो चंद्र विझेपर्यंत आणि ती शांत निजेपर्यंत आपण असेच एकमेकांच्या मिठीत पडुन राहतो! अनुभवलायं कधी हा विरहानंतरच्या मिलनाचा स्पर्श?

Saturday, December 11, 2010

एकदा मला रडायचयं !

मला आठवत नाही, लास्ट टाईम मी कधी रडलो होतो ते? 
रडणं म्हणजे?? अश्रुनी डोळ्यांना भिजवलं नाही, गालावरुन पाणी घरंगळत ह्रदयावरुन गेलं नाही! 
"छे! पुरुषासारखा पुरुष तू आणि रडतोस काय?" असं कुणी तरी म्हटलं! 
का? पुरुषानी कधी रडुच नए? मग त्यांना अश्रु तरी का दयावे देवाने? 

पण मला खरंच आठवत नाही की मी लास्ट टाईम कधी रडलो होतो ते! 
कधी कधी वाटतं की माझे अश्रुच गोठुन गेलेत.त्यांचे हिमनग झालेत. किती रडावसं वाटलं तरी अश्रु बाहेर पडत नाहीत! ते ही माझ्यासारखेच कठोर, पाषाण झालेले! पण खरं सांगतो मला खुप रडावसं वाटतयं. डोळे ओसंडुन जातिल इतकं रडायचं आहे! 

रडायला मला जागाही नाही सापडत. माणसांच्या; प्रेमळ माणसांच्या, मायेच्या माणसांच्या, वैतागलेल्या, रुसलेल्या, चिडलेल्या, रागावलेल्या, हसणार्‍या, गाणार्‍या, माणसांच्या दुनियेत मी कुठे माझे अश्रु वाहु? 

"अश्रु मौल्यवान असतात सखे, ते असे ओसंडुन वाया घालवु नकोस, ते मातीत मिसळुन जातिल! सगळ्याच आसवांची मातीत मिसळल्यावर फुलं होत नाहीत!"  

मी तिला नेहमी सांगायचो. त्यावेळी खरं तर मला तिचा हेवा वाटायचा. मला का नाही येत असं रडता? मला नेहमी वाटायचं की मी माझे अश्रु गोठवुन कुणाचे तरी अश्रु पुसतोय. पण नाही! खरं तर मी माझेच अश्रु पुसायचो त्यांच्या  डोळ्यांतुन! पण तरीही माझा हा अट्टाहास आहे की कधी त्यांनी ही त्यांचे अश्रु माझ्या डोळ्यातुन पुसावेत! 
का, माझ्या अश्रुंना काहीच किंम्मत नाही? की ते दिसत नाहीत म्हणुन त्यांना जाणवत नाहीत? 
अश्रु म्हणजे फक्त पाणीचं ना गं? 
नाही! नुसतं पाणी नाही! खारं पाणी, सुख दु;खाचं मिश्रीत पाणी! 

कधी ह्रदय भरुन आलं, की बरसणारं पाणी! पण या पाण्याने कुणी सुखावतं का गं? दुसर्‍याच्या डोळ्यात स्वःतासाठी अश्रु बघण्यात एक अपुर्व आनंद असतो, आनंदापेक्षा एक धीर असतो त्या अश्रुंत! खांडेकरानी कुठेतरी लिहिलंए! खरं आहे ना ते? कुणी तरी आपल्यासाठी रडतयं ही भावना किती सुखास्पद असते ना? खोटं वाटतं तुला? असेलही कदाचित! 

तुला कधी वाटलं का मी रडावं तुझ्यासाठी? तुझ्या विरहाने व्याकुळ होउन, धावत येवुन तुला छातीशी घट्ट धरुन ठेवावं, मी नाही गं जगु शकत तुझ्याशिवाय असं म्हणुन माझ्या अश्रुनी तुला न्हाउ घालावं! आईच्या कुशीत रडायचो तसं? 
मग तु ही भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत मला तसंच म्हणावं, "मी ही नाही रे राहु शकत तुझ्याशिवाय!"
दोघांचे काठोकाठ भरलेले डोळे! खार्‍या पाण्याने डबडबलेले! त्या अश्रुंतुन आरपार आपण एकमेकांना बघावे! कुणी कुणाचे अश्रु पुसु नयेत. ते तसेच वाहु देत. अश्रु संपेपर्यंत, डोळे कोरडे होईपर्यंत रडत राहावे! 

मला खरंच खुप रडायचयं गं! ह्रदयातला सारा भार, सार्‍या वेदना, वाहुन घालवायच्या आहेत. मी असं ऐकलयं की रडल्याने सार्‍या वेदना, ह्रदयातल्या वेदना अश्रुंबरोबर वाहुन जातात. खरं आहे का ते?
बघं इतका विवश झालोय तरी एखादा थेंबही, थेंब तर सोड पापण्यांच्या कडाही ओल्या होत नाहीत!



एकदा मला रडायचयं,
पाण्यासारखं वाहायचयं,
तुझ्या डोळ्यातुन वाहताना,
तुला माझ्या डोळ्यातुन वाहताना पाहायचयं!
कधी हे अश्रु असेच रडवतात,
बांध फुटला तरी, 
गालांवर ओघळत नाहीत, 
बाष्पासारखे हवेत विरुन जातात!
गाल तसेच कोरडे राहतात!
कोरडे डोळे,
कोरडे गाल,
कोरडे ह्रदय,
कोरडा मी! तू मात्र काठोकाठ भरलेली!

Monday, December 6, 2010

हात !

लहानपणापासुन म्हणजे पाचवी - सहावीपासुन असेल कदाचित मला एक स्वप्न नेहमी सतावते. त्या स्वप्नाने आजतागायत माझा पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी गेली एक दोन वर्षे मला ते स्वप्न पडले नव्हते. पण हल्ली ते स्वप्न बर्‍याचदा पडतं. महिन्यातुन एक दोनदा तरी पडतच पडत. मी लहान असताना हे स्वप्न एका रात्री मला पडलं होतं मी अक्षरशः ओरडतच उठलो होतो. 

स्वप्नात एक तुडुंब, दुथडी भरुन वाहणारी नदी, आमच्या गावातलीच. कर्ली नदी. 
नदीचं पात्र बरचं मोठं. भर पावसात मी त्या नदीच्या काठावर एकटाच उभा आहे. इतका लहान असुन मला मम्मीने सोडलं कसं त्या नदीपर्यंत? किंवा मी तिथे कसा पोचलो हे मला कळत नव्हतं. (या आधी मी या नदीतुन ३-४ वेळा होडीतुन प्रवास केला होता.त्यामुळे या नदीचं आकर्षण मला भारीच होतं) पण मी ते सारं विसरुन त्या दुथडीभरुन वाहणार्‍या नदीकडे डोळेभरुन पाहत होतो. त्या नदीच्या पैलतीरीही नजर पोचत नव्हती इतकं त्या नदीचं पात्र विशाल होतं नदीला पुर आला होता आणि भयंकर आला होता. नदीचा प्रचंड प्रवाह माझ्याच दिशेने झेपावत येत होता. मी घाबरुन परत जायला वळतो इतक्यात कुणीतरी माझा पाय धरतं आणि मला नदीत ओढतं.मी माझा पाय सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न करतो पण तो कुणीतरी घट्ट पकडुन ठेवलाय आणि मला त्या भरलेल्या नदीत ओढतयं. माझे सारे प्रयत्न फोल ठरतात आणि मी त्या भरलेल्या नदीच्या पात्रात खेचला जातो. गटांगळ्या खातो. नदीचं पाणी माझ्या नाकातोंडात जातं, माझा  श्वास कोंडला जातो. मला पोहता येत नाही ( मला अजुनही पोहता येत नाही!:( कोकणात अख्खं बालपण काढुनही मला अजुनही पोहता येत नाही. असो.) पण काहीवेळाने मी शांत होतो. कदाचित मी मेलोय असं वाटतं. 
पण थोड्यावेळाने मी पुन्हा वर येतो आणि  खुप प्रयासाने काठावर पोचायचा प्रयत्न करतो. कसेबसे हात मारत, पोहण्याचा प्रयत्न करत मी काठावर पोचायचा प्रयत्न करतो. आता काठावर मला कुणाचा तरी हात दिसतो आणि माझा पाय ओढणारा तो पाण्यातला हात मला बाय बाय करतो आणि काठावरचा हात लवकर पोचण्याचा इशारा करतो. पण मी त्या काठावरच्या हातापर्यंत पोचतच नाही आणि पुन्हा मी मरतो की काय या विचाराने माझी झोप उडते. आणि मी खाडकन उठतो. 




लहानपणी पडलेलं हे स्वप्न मला आजही सतावत राहतं. अगदी परवाच्या रात्रीच पडलं होतं.
वेल, त्या स्वप्नाचा अर्थ आता कुठे माझ्या लक्षात येतोय. 
ते पाणी, ती दुथडी भरुन वाहणारी नदी म्हणजे माझं जीवन, आयुष्य असावं आणि माझा पाय ओढणारा तो हात म्हणजे काही प्रलोभने, भावना, मोह असावा. पण मी स्वत:हुन त्यात जात नाही कुणीतरी मला ओढतं. किंवा मी त्या नदीच्या रुपाने भारावुन जावून स्वःताच जातो की काय? ते कळत नाही. एकावेळी मी नदीत बुडल्यावर मरुन जातो असं वाटतं आणि काही क्षणात परत वर येतो. आता कळत की मी त्या नदीत अडकुन पडलोय आणि वेळीच बाहेर नाही पडलो तर बुडुन मरुन जाईन जीव वाचवायच्या प्रयत्नात मी हातपाय मारत वर येतो.  काठावरचा हात मला त्याच्याकडे बोलावतोय आणि पाण्यातला हात मला बाय बाय करतो. त्या काठावरचा हात कुणाचा ते मला आता कळुन चुकलयं. 
तो हात तिचाच. तिने अनेकवेळा मला असं वाचवलयं.जेव्हा जेव्हा मी असाच वाहत गेलोय, भावनांच्या पुरात भरकटत गेलो, आयुष्यातल्या काही बिकट परिस्थितीत तिने कसलिही पर्वा न करत मला वेळोवेळी मदत केलीय.प्रत्येकवेळी माझ्या भावनांना, माझ्या विचारांना तिने योग्य दिशा दिली. पण मी त्या स्वप्नात त्या काठावरच्या हातापर्यंत कधी पोचलोच नाही, तरीही त्या काठावरल्या हाताच्या अस्तित्त्वाने मला जगायची नेहमी उमेद मिळते आणि मी पुन्हा हातपाय मारत त्या काठावरल्या हातापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो!
लहानपणी स्वप्नात दिसणारा तो हात आज कुठे मला कळला आणि स्पष्ट दिसला आणि त्या स्वप्नाची भीती कायमची माझ्या मनातुन निघुन गेली !