Showing posts with label गड. Show all posts
Showing posts with label गड. Show all posts

Saturday, August 16, 2014

वारी कोहोजगडाची...

"तो दिसतोय न? हं! तोच कोहोज किल्ला! 
आणि ही समोरची पायवाट. इथुनच जायचयं आपल्याला. पुढे एक तलाव आहे. तलावाच्या काठानेच जायचयं. मॅप आहे माझ्याकडे. माझ्या अंदाजाप्रमाणे २-३ तास लागतिल वर जायला. आणि उतरायला २ तास पुरे. येउ आपण खाली ३-४ च्या दरम्यान.
आता किती वाजलेत? आयला! ११:३० वाजलेत. चला, चला लवकर चला." 
असं म्हणुन आम्ही कोहोज किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. पण सकाळी ११:३० वाजता, इतक्या उशिरा ट्रेक सुरु करण्याचे कारण? त्यासाठी थोडं मागे जाउ. जास्त नाही ३-४ तास मागे जाउ. 


                  त्याचं झालं काय की ट्रेक ठरला. मेंबर्स पण ठरले आणि धुंडीराज सोडुन सगळे वेळेवर पण आले. शनीवारी सकाळी ७ वाजता प्लाझा, दादरला भेटायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे मी पनवेलहुन, आनंद डोंबिवलीहुन, सचिन पवईहुन, राजिव काका ठाण्याहून, अनघा दादरलाच राहते आणि धुंडीराजला वाटेत जोगेश्वरी हायवेवरुन उचलायचे ठरले. आम्ही सगळे दादरला जमलो तेव्हा धुंडीला कॉल केला तेव्हा तो उठला होता. त्याला सांगितलं १५-२० मि. पोचतो आम्ही. त्याप्रमाणे अनघाची नवी कोरी स्कोडा घेउन आम्ही दादरहुन वेस्टर्न हायवेवर सुटलो. राजीव काका ड्राईव्ह करत होते. त्यांना सांगितलं की पालघरला पोचल्यावर मनोर - वाडा रोड आपल्याला पकडायचा आहे त्याच मार्गावर कोहोज किल्ल्याच्या पायथ्याचे गाव वाघोटे आहे. पण माझंच काहीतरी चुकलं; पण त्याआधी आम्ही ७:३० जोगेश्वरी हायवेला पोचलो तरी धुंडीराजचा पत्ता नव्हता. कॉल करुन करुन थकलो. येतो रे, आलोच, असं सांगुन पठ्ठा ८ ला आला. झालं! त्यानंतर ट्रेकमध्ये पुढे जे काही झालं ते सगळं धुंडीराज मुळेच झालं असं बोलुन बोलुन त्याला पिडलं. 

        तो आल्या आल्या राजीव काकांनी गाडी हायवेवर सुसाट सोडली. काका ड्राईव्ह करु लागले की आम्ही निर्धास्त होतो आणि आमच्या चकाट्यांना उत येतो. आम्हाला माहीत असतं की काका डेस्टीनेशनला आमच्या गप्पांमध्ये सामिल होउनही बरोब्बर वेळेत पोचवतात.पण यावेळी माझंच चुकलं. म्हणजे मी काकाना म्हणालो की मला रस्ता माहीत आहे. पालघरच्या आधी वाडाला जायला जो मनोर-वाडा एग्झिट आहे तोच घ्यायचा. एरव्ही काका चुकले नसते किंवा त्यानी आधी रोड मॅप पाहिला असता तरी ते चुकले नसते आणि चुकायचा प्रश्नच नव्ह्ता सरळ सरळ हायवे वरुन पालघरच्या आधी मनोर-वाडा फाटा गाठायचा होता. एक तर धुंडीराजमुळे आधीच उशिर झाला होता. :D 

          तर हायवेवर असतानाच ९ च्या सुमारास पोटात कवळे ओरडु लागले. मग काका त्यांना माहित असलेल्या हायवेवर असलेल्या महागड्या इडलीवाल्याच्या (कामताच्या)  हाटेलात घेउन गेले. तिथे मस्त फ्रेश वैगरे झालो आणि ब्रेकफास्ट करुन पुन्हा पालघरच्या दिशेने निघालो. पुन्हा गाडी आणि आमच्या गप्पा सुसाट सुटल्या. बराच वेळ झाला तरी पालघर येत नव्हते. मी आजुबाजुला  साईनबोर्डस पाहत होतो, अचानक एक साईनबोर्ड वाचला आणि मला धडकीच भरली.  "डहाणु स्थानका कडे" " महालक्ष्मी मंदीर" हा बोर्ड वाचल्यावर डोळेच फिरले. आम्ही गप्पांच्या नादात डहाणुला पोचलो होतो. ताबडतोब मागे फिरण्यासाठी यु टर्न शोधु लागलो. तो पण २-३ कि.मी. वर सापडला.(केजरीवालला कसा काय सापडतो लगेच काय माहीत)  तिथुन काकांनी पुन्हा गाडी दामटवली. लोकांना विचारत विचारत आम्ही मनोर-वाडा या रस्त्यावर आलो तिथुन टोल भरुन वाघोटे या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात गाडी लावली. ११:०० वाजले. अजिबात वेळ न दवडता आम्ही गडाच्या दिशेने चालु लागलो आणि हा सगळा उशिर एकट्या धुंडीराजमुळे झाला. :D

        नकाशाप्रमाणे पहीली खूण म्हणजे दीलच्या आकाराचं तळं होतं. ते शोधत शोधत आम्ही चालू लागलो आणि ते सापडलं. पुन्हा चालत चालत दुसर्‍या खुणेपाशी म्हणजे पाझर तलावापाशी आलो आणि तलावापाशी येताच हबकुनच गेलो. डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा प्रचंड, शांत तलाव बघुन फार प्रसन्न वाटलं. पाउस नव्हता पण गारव्यामुळे वातातवरण आल्हाददायक होते. काळे बाळे ढग मुक्तपणे विहार करत होते. मग आमच्या फोटोग्राफीला उत आला आणि आम्ही तिथे जरा जास्तच रमलो. 






          घड्याळ्याकडे बघत काका चला चला म्हणुन मागे लागले तसे आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. पुढे शेतातुन चिखल तुडवत गडाच्या पायथ्याच्या रानवाटेजवळ आलो. तिथुन माहीती असल्याप्रमाणे पायवाटेने वर चढायचे होते. रान तुडवत, गप्पा हाकत आम्ही चालु लागलो. बराच वेळ झाला तरी वाट संपत नव्हती. वाट चुकलो तर नाही ना असं वाटु लागलं. एकतर इथे कुठे मार्किंग्ज पण नव्हत्या. आम्ही चालु लागलो आणि किमान  तासभर चालल्यावर लक्ष्यात आलं की आपण चुकलोय, कारण चढ कुठेच लागला नव्हता. किती तरी वेळ रानातच चालत होतो. एका ठीकाणी वाटेला दोन फाटे फुटले होते. एक वाट उजवीकडे तर दुसरी वाट सरळ जात होती. आता जायचं कुठे यावर आमची चर्चा सुरु झाली. एक वाजायला आला होता. पाउस नसला तरी दमटपणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. ज्या ठीकाणी वाटेला फाटे फुटले होते तिथुन उजव्या बाजुला गेलो तर तो मघासचा तलावाच्या समोर असलेला कातळ दिसु लागला. ट्रेकक्षितिजच्या नकाशाप्रमाणे गडावर एक मंदीर आहे, तर त्या कातळाच्या माथ्यावर मंदिरासारखी शेड दिसू लागली. म्हणून धुंडी आणि आका वाट शोधायला गेले. आम्ही पुन्हा नकाशा नीट बघू लागलो. काहीवेळाने ते दोघे परत आले, पुढे वाटच नव्हती. काही वेळ चर्चा करुन आम्ही मागे फिरलो आणि समोरच्या सरळ वाटेने जायचे ठरवले. खूप उशीर झाला होता, वाट समजत नव्हती, गडाची काही खूण दिसत नव्हती आणि घामाने निथळून गेलो होतो. मघापासुन वाटत होतं की  कुणीतरी वाटेत भेटाव शेतकरी किंवा गुराखी निदान त्यांना वाट विचारता आली असती, पण कुणीच नव्हतं.हे सगळं काही धुंडीमुळेच झालं होतं. :D


महाचर्चा :D






        त्या वाटेवरुन चालताना कुठे मार्किंग्ज आहेत का ते पाहत होतो आणि अचानक कसला तरी आवाज ऐकू आला. मला वाटलं कुणी तरी ताटली वाजवत येतं होतं. आम्ही सावध झालो. झाडा झुडुपातुन कुणीतरी येतं होतं आणि  घंटेचा आवाज. काहीच कळत नव्हतं. आम्ही सावधपणे चालू लागलो आणि समोरुन काही बकर्‍या म्यँ म्यँ करत आल्या. बकर्‍या आलया म्हणजे कुणीतरी असणार असा विचार करुन आम्ही पुढे चालु लागलो आणि अचानक उजवीकडुन एक आज्जीबाई समोर आल्या. त्यांना बघुन थोडं हायसं वाटलं. त्यांना विचारलं गडावर जायची वाट कुठे? आणि आज्जीबाईनी आम्हाला वाट दाखवली. ज्या वाटेवरुन आज्जीबाई आल्या होत्या तीच वाट गडावर जात होती. पण ती पायवाट आम्हाला बिलकुल दिसलीच नसती आणि आम्ही पुन्हा सरळ वाटेने चालत कुठच्या कुठे पोचलो असतो. आज्जीबाई अगदी देवासारख्या त्या वाटेवर भेटल्या. आजीबाईंचे आभार मानुन आम्ही त्या वाटेवरुन चालायला लागलो तेव्हा दीड वाजले  होते .




      आता थोडी हुशारी आली आणि काही वेळातच एका मोठ्या दगडापाशी आलो इथे मार्किंग होती. व्वा रे ! मार्किंग करणार्‍यांनो. मग आम्ही आता त्या वाटेने चालु लागलो. आता खरा चढ सुरु झाला. मोठमोठ्या दगडांमधुन वाट जात होती. पण आताही तेच इतका वेळ चाललो पण गड  किंवा गडाची एखादी खूण काहीच दिसत नव्हते. चालून चालून पायांची चाळण झाली होती. तरी बाकीचे सगळे काटक आणि मी जड असल्याने मलाच उशीर होत होता. हॉल्ट घेत घेत मी चालत होतो. अडीच वाजायला आले तरी गड दिसतच नव्हता आणि माझी सटकली. म्हटलं मरु दे तो ट्रेक चला जाउया परत. पहिल्यांदाच मी एखाद्या ट्रेकला वैतागलो होतो. इतकावेळ पायपीट करुनही गड दिसत नव्हता त्यामुळे अजुन सटकली होती. एरव्ही एखाद्या ट्रेकला निदान गडाचा बुरुज, किंवा झेंडा किंवा अन्य काहीतरी दिसत जेणेकरुन समजतं की आपण बरोबर चालतोय आणि काही वेळात तिथे पोहचू. पण इथे चारी बाजुला फक्त माजलेलं रान आणि मोठाले दगड-धोंडे. मी वैतागलो. म्हणालो मरु दे तो ट्रेक चला परतुया. पण बाकीचे म्हणाले नाही, पूर्ण करुया त्यात अनघाही एकदम इरेला पेटली. मग पुन्हा एकदा आई भवानीचं नामस्मरण करत मी चालायला सुरुवात केली. आणि हो! हे सगळं काही धुंडीमुळेच झालं. :D




        आता पाउस सुरु झाला आणि गड पुर्ण धुक्यात गायब झाला. काहीवेळाने चढुन एका मोकळ्या पठारावर आलो आणि धुक्याच्या पडद्याला छेदुन गडावरली पहीली खूण म्हणजे मंदीर दिसलं आणि हायसं वाटलं. तिथल्याच एका दगडावर बसलो. इतकावेळ तंगडतोड करुन शेवटी गडावर पोचलो तर. थोडं सटर फटर खाउन घेतलं आणि आता गड फिरायची घाई होउ लागली कारण ३ वाजले होते आणि वर यायला लागलेला वेळ लक्ष्यात घेता काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते आणि पुन्हा वाट चुकलो तर मग काही विचारायलाच नको.






            आम्ही रिमझिम पावसात धुक्यातून वाट काढत त्या मंदिरापाशी येउन पोचलो आणि गड फिरायला सुरुवात केली. गडावर विशेष काही बघण्यासारखं नाही. पण मला जे बघायचं होतं ते म्हणजे तो गडाच्या माथ्यावर असलेला निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा पुतळा. तो पुतळा म्हणजे निसर्गाचं एक आश्चर्यच आहे. कधी वाडा - मनोर रस्त्यावरुन जात असाल तर  उजवीकडे गडावर हा पुतळा दिसतो. रिओ मधल्या ख्रिस्ताच्या पुतळ्यासारखा हा देखिल आपले बाहु पसरुन उभा आहे. पण वेळेअभावी वर जाता आले नाही आणि पाउस ही सुरु झाला. तितक्यात त्या पुतळ्याच्या वाटेवरुन एक ग्रुप खाली उतरताना दिसला. मग आम्ही तिथेच फोटोग्राफी करायला सुरुवात केली.








     काही वेळ भटकून ४ वाजताच काकानी परत फिरायचा इशारा दिला. आता घाई घाई करुन आम्ही गड उतरायला लागलो. पण नेहमीचा अनुभव आहे एखादा गड चढताना जितका वेळ लागतो तितकाच उतरताना देखिल लागतो. त्यात वाट निसरडी असल्याने आमच्या लीड स्ट्रायकर अनघाने ४-५ गोल मारले. :ड कसे बसे त्या रानातुन वाट काढत, शेतातला चिखल तुडवत एकदाचे पाझर तलावापाशी आलो तेव्हा साडे पाच - सहा  वाजले होते. तिथे पायातले बूट काढले आणि पाण्यात पाय बुडवून बसुन राहिलो. पुन्हा आवरुन जायला निघालो आणि गाडीपाशी येउन वेस्टर्न एक्सप्रेसवरुन  वाटेत धुंडीराजला टाकून दादरला पोचलो तेव्हा सात - साडेसात वाजले होते. नाही म्हणायला एक भन्नाट ट्रेक झाला होता. पहिल्यापासुन चुकलेली वाट आणि त्यामुळे झालेली  दमछाक, वैताग, पाउस. आणि हे सगळं कुणामुळे?? तर धुंडीराजमुळे. :D :P
 
एकदा केल्यावर पुन्हा कधीही न करण्याच्या ट्रेक मध्ये राजमाची, माहुली बरोबर कोहोजगडाची एंट्री झाली..



काही इतर छायाचित्रे :












- दीपक परुळेकर  

Thursday, September 9, 2010

तांदुळवाडी ट्रेक


मागच्या रवीवारी २२ ऑगस्ट २०१० ला तांदुळ्वाडी ट्रेक झाला.. नेहमीप्रमाणेच भन्नाट, उसाटलेला, खादाडीने युक्त आणि गोलमय... हा ट्रेक अनुजाने प्लॅन केला होता..अनुजा, मी, सुहास आणि देवेंद्र ( अरे सुरेश! ) असे आणि अनुजाकडुन येणारे तेजस्वी,हिताक्षी आणि तिचा भाउ प्रथमेश अशी टीम ठरली होती.. ऐनवळी सुहासला ताप चढला, तो येण्याच्या प्रयत्नात होता पण ताप त्याला जाउ देइना. तरीही बरं वाटलं तर सकाळी जॉईन करेन म्हणुन त्याने सांगितले. माझाही मुड थोडासा ऑफ होता... त्यामुळे शनीवारी सकाळी मी ही नाही येत म्हणुन अनुजाला कळवले..त्यामुळे एकंदरीत ट्रेक रद्द होणार अशी चिन्हे दिसत होती.. मी शनीवारी हाफ डे असल्याने जरा लेटच निघालो. ४ वाजता अनुजाचा फोन आला त्यावेळी मी माझ्या मित्राच्या गाडीतुन चाललो होतो..तो मला कांजुरमार्गला सोडणार होता... आणि त्यानंतर कांजुरमार्ग ते ठाणे, ठाणे ते पनवेल ( माझ्या घरी जाउन ) पनवेलहुन साडे सहाची पनवेल - डहाणु ट्रेन मी कशी पकडली ते माझं मलाच माहित.


त्यारात्री मी अनुजाच्या घरी थांबलो होतो. रात्री मस्तपैकी खादाडी झाली.  मच्छी, ऑम्लेट, सुहासच्या वाट्याची भाजी, वरण, भात ,चपाती, आणि सुक्या मच्छीचं लोणचं.. वॉव ! इट वॉज जस्ट ग्रेट... रात्री सुहाने समस केला कि त्याला यायला नाही जमणार..
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही साडे सहाला अनुजाच्या घरुन निघालो. देवेंद्र बोईसरहुन येणार होता.. तेजस्वी आणि हिताक्षी सफाळ्यालाच भेटणार होते... सकाळी उपमा आणि इडलीच्या पिठाच्या डब्याच्या गोंधळामुळे अनुजाने बनवलेला उपमा जरा जास्तच चिकट झाला होता त्यामुळे सकाळचा अनुजाच्या हातचा नाश्ता मिळाला नाही, मग आम्ही बाहेरच खायचे ठरवलं. पालघर स्टेशनला काही टोस्ट सँड्विचेस घेतले आणि सफाळ्याला उतरलो. देवेंद्र सेम ट्रेनमध्येच होता. तेजस्वी आणि हिताक्षी येईपर्यंत आम्ही आमचा नाश्ता उरकला. काही वेळाने तेजस्वी आली आणि मग हिताक्षीही आली...


तांदुळवाडी किल्ल्यावर जाताना सफाळ्याहुन बस पकडुन तांदुळ्वाडीला उतरुन मग चालत जायचे.. यावेळी हिताक्षी आणि प्रथमेश यांनी दुसर्‍या मार्गाने जायचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही चालत चालत गप्पा मारत निघालो.. किती तरी वर्षानी मी शेतातुन चिखल तुडवत चाललो होतो.मध्येच दिसणार्‍या ओढ्यामध्ये पाणी उडवत, चिखल तुडवत आम्ही वाट काढत होतो.. मध्येच एक तळे लागले.. तिथे फोटोसेशन झाले.. आता पुढची वाट जंगलातली होती... वाट सरळ असल्याने थकवा जाणवत नव्हता.. पण पावसामुळे डास माजले होते आणि वाढलेल्या जंगलामुळे अंगाला खाजही सुटली होती.. वाटेत चिखलही बराच होता.. त्यातुन कशीबशी वाट काढत गोल होणार नाही याची काळजी घेत चाललो होतो... पण एका ठिकाणी अशाच चिखलात माझा पाय सटकला आणि धाडकन कोसळलो... आजुबाजुच्या परिसरातील लोकांना आणि जनावरांना भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले असतिल... हे हे हे!!






चालता चालता एका छोट्या धबधब्याजवळ ब्रेक घ्यायला थांबलो.. मी मोसंबी आणली होती..आणि देवेंद्र ने फाईव्ह स्टार चॉकलेट्स सगळ्यांना वाटले.. चॉकलेट खाता खाता अचानक मला ती टीव्ही वरील रमेश आणि सुरेश यांची फाईव्ह स्टारची अ‍ॅड आठवली.. आणि मी चॉकलेट खाता खाता देवेंद्रला बोललो, " अरे सुरेश???? कैसा है तु?? " आणि अशा प्रकारे देवेंद्रचं सुरेशच्या नावाने बारसं झालं ...त्यानंतर त्याला  फार पीडला... प्रथमेश झाडा - फुलांचे, फुलपाखरांचे आणि किड्या - मुंग्या आणि भुंग्यांचे फोटो काढण्यात दंग होता.... त्याला आम्ही ही आहोत फोटो काढायला याची आठवण करुन द्यावी लागली तेव्हा त्याने कूठे आमचा एक फोटो काढला... काही वेळाने आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या पठारावर आलो...तिथे पुन्हा चकली आणिस भाकरवडीचा ब्रेक झाला.. त्या पठारावरुन समोरचं विहंगम दृश्य डोळ्यांत साठवून आम्ही तिथेच टेकलो...

ब्रेक झाल्यावर गड चढायला सुरुवात केली... चढाई तितकीशी कठीण नाही पण काही पावसामुळे दगडांवरुन चढताना सांभाळून चढत होतो... तेजस्वी आणि हिताक्षी भराभर चढत होते.. अर्धी चढण झाल्यावर पुन्हा एकदा टेकलो.. कड्याच्या खाली दरीत उतरणारे ढग अलगद मनातही उतरत होते.. हलका हलका पाउस बरसत होता आणि भिजलेल्या मनावर चिंब शहारे आणत होता.. काय रोमँटिक लोकेशन होते यार !!!!!

पुढची चढणही तशीच होती..पावसामुळे खडक स्लीपी झाले होते.. चढताना अनुजा एका दगडावर घसरली... पण परत वर आली... पुढे पायवाटेने वर चढताना सांभाळून चालावे लागत होते कारण पायवाट अगदी चिंचोळी होती आणि उजव्या बाजुला खोल दरी.... शेवटी सारे जण गडावर पोचलो.. वातावरण ढ्गाळ होते.. पण पावसाची काही चिन्हे दिसत नव्हती..गडावर असलेल्या पाण्याच्या टाकांजवळ पोचतो तोपर्यंत पोटातले कावळे खाव्.खाव खाव म्हणुन ओरडायला लागले होते.. तिथेच एक मोक्याची जागा बघुन आम्ही आमच्या शिदोर्‍या सोडल्या... आणि सर्व खादाडीप्रिय लोकांना जळवण्यासाठी काही स्नॅप घेतले... सुरेशने आम्रखंड पुरी, आणली होती. तेजस्वीने भुर्जी, अनुजाने मुगाची भाजी आणि या स्नॅप्समधे दिसतय ना ते बरेच काही आम्ही सर्वांनी स्वाहा केले...

डेझर्ट म्हणुन मी माँजिनिजचे केक आणले होते आणि देवेंद्रनेही केक आणला होता... वा वा वा काय जेवण झाले!! मजा आला!! चाबुक !! जेवण झाल्यावर गार हवा आता डोळ्यांवर झापड आणत होती.. अनुजा आणि हिताक्षी तिथेच खडकावर पहुडल्या.. मी थोडा पुढे आडवा झालो... प्रथमेश, तेजस्वी आणि देवेंद्र फिरत होते...

अगदी गाढ झोप लागली... सर्व काही विसरुन मी त्या मोकळ्या आभाळाच्या छायेत पसरलो होतो... आजुबाजुची शांतता फक्त ऐकण्याच्या प्रयत्न करत होतो..बर्‍याच दिवसांनी इतकी छान झोप लागली होती.... काही वेळाने जाग आली तेव्हा बाजुला प्रथमेश, देवेंद्र आणि तेजस्वी बसले होते.. मी उठुन बसलो..


समोरची खोल दरी.... कुठच्या तरी गावाच्या तळाशी जाउन संपणारी, जंगलाने वेढलेली, झर्‍यांनी भिजलेली, वेली-फुलांनी नटलेली....दरीत डोकावताना माझ्या मनातही डोकावुन बघत होतो... मनही असंच खोल.... दरी सारखं..पण अथांग .. कुठल्याही गावाचा तळ नाही...,  सुख - दु:खानी वेढलेलं, आठवणींनी भिजलेलं... एकवेळ दरीचा तळ सापडेल पण मनाचा तळ सापडणं थोडसं मुश्किलच नाही का??? अशा नीरव जागी गोंगाटलेल्या  मनाची चलबिचल अधिकच तीव्र होते..सारे बंध तुटल्याचा भास होतो, किती तरी वेळ दाबुन ठेवलेली सारी दु:खं उफाळून वर येतात  आणि मग त्या सार्‍या सुख - दु:खासोबत आणि आठवणींसोबत मनाला समोरच्या खोल दरीत झोकुन द्यावसं वाटतं.......मी त्या सुटलेल्या मनाला खाली झोकुन देतो ही...... पण हे तितकसं सोप्पं नाही... मी झोकुन दिलेल्या मनाला एक गिरकी घ्यायला लावतो..पंख पसरलेलं माझं मन त्या आठवणींच्या दरीत विहार करु लागतं...  इतका विहार करुनही मन भरत नाही, अजुन उडावंस वाटतं...पण मनाच्या मनाविरुद्द जाउन मी त्याला परत वर बोलावतो.. काळोख पडल्यावरही खेळात दंग असलेल्या आपल्या मुलाला आई जशी बोलावत राहते तसं ....हिरमुसलेलं होउन मन परत येतं...मी त्याला समजावतो..."ट्रेक अभी बाकी है दोस्त!!!!"


तिथे आम्ही असंच गप्पा मारत बसलो होत. काही वेळाने हिताक्षीही आली.. अनुजा मात्र झोपुनच होती.. काही वेळाने तिला उठवलं पण तिच्या चेहर्‍यावरची झोप काही उडत नव्हती...आणि आम्ही पुढे चालु लागलो.... गडाच्या दुसर्‍या टोकावर असलेल्या पठारावर आलो... तिथे पुन्हा एकदा सारेजण टेकले.. झोप काही डोळ्यावरुन जात नव्हती.. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे पडत होता.. उन सावलीच्या खेळामुळे झोपेची वाट लागली होती..

त्यात प्रथमेष कुठे तरी गायब झाला.. आम्हाला वाटलं की तो परत किड्या - मुंग्यांचे फोटो मारायला गेला असेल.. आता गड उतरायचं  होतं.. पण प्रथमेषचा कुठे पत्ता नव्हता.. मग तेजस्वीने त्याला शोधुन आणला.. पठठा दुसरीकडे एका कुंडाच्या बाजुला जाउन झोपला होता.....


मग आम्ही तिथुन गडाचा निरोप घेतला आणि उतरायला सुरुवत केली.. उतरताना अनुजाने एक गोल केला त्यामुळे आमची मॅच ड्रॉ झाली.... गड उतरताना आलेल्या रस्त्याने खूपच चिखल होता म्हणुन तांदुळवाडीच्या दिशेने उतरलो...तांदुळवाडीत उतरल्यावर अनुजाच्या एका मित्राच्या घरी आम्ही थांबलो... त्यांच्या विहीरीवर हात पाय धूवुन फ्रेश झालो... अनुजाच्या त्या मित्राची बायको ही अनुजाचे वर्गमैत्रीण होती.. तिच्या आग्रहास्तव आम्ही नही - हो करत चहाला थांबलो.. ( खरं तर चहाची जबरदस्त हुक्की आली होती ) पण पोपट झाला तिने आम्हाला सरबतावर भागवलं, पहिल्यांदा वाटलं कि नंतर चहा येईल पण नाही आला.. शेवटी चालत चालत आम्ही एस.टी.स्टॉपवर पोचलो आणि तिथे एका दुकानावर मस्तपैकी चहा मारला सॉरी घेतला किंवा प्यायलो... तेजस्वीने उरलेले ब्रेड आणि केक काढले आणि चहात बुडवून खायला सुरुवात केली.... एस्.टी.ची वाट बघण्यापेक्षा आम्ही टमटममधे बसुन सफाळ्याला पोचलो... एकमेकांचे निरोप घेतले पुढच्या ट्रेकपर्यंत.......

Monday, August 16, 2010

किल्ले सुधागड ..

  सुधागडचा ट्रेक हा आतापर्यंतचा थ्रीलिंग ट्रेक होता.. भर पावसात किल्ला सर करताना, फिरताना आणि तो उतरताना भारी कसरती झाल्या.. मराठी ब्लॉगर्स चा विसापुरच्या ट्रेकमध्ये सुहास्,अनुजा यांच्याशी ओळख झाली होती..विसापुरच्या  ट्रेकबद्दल आपण रोहनच्या ब्लॉगवर वाचलेस असेल.. त्यानंतर बझवर रोहनने सुधागडला जातोय म्हणुन लिहिले, त्याला रिप्लाय म्हणुन मी बोललो की अरे मी सुद्धा पुढच्या रविवारी म्हणजे १-०८-२०१० ला प्लॅन करतोय असे लिहिले.. त्यानंतर अनुजा बोलली की ती सुद्धा येतेय, मग सुहासही तयार झाला.. झाले तर मग आम्ही ३० जुलैला रात्री निघायचे ठरले... हे सगळे दोन दिवस बझ्झ्वरच अपडेट होत होतं, म्हणजे कसं जायचे, कितिजण येणार वैगरे.. आता पर्यंत आम्ही चौघेचजण होतो.. मी, अनुजा,सुहास आणि माझा एक मित्र महेश ज्याच्या गाडीने आम्ही जाणार होतो...नंतर अनुजाने सांगितले की तिच्याकडुन अजुन ५ जण येणार आहेत पण जायच्या दोन दिवस आधी त्यातले ४ जण कॅन्सल झाले.. मग मी, अनुजा,तिचा मित्र आशु, सुहास आणि महेश एवढेचजण तयार झालो... जायच्या आधी अनुजाने गडावर जेवण बनवायच्या प्लॅन केला होता. दाल खिचडी किंवा कोंबडी रस्सा.आयडीया थ्रीलींग होती ,पण नंतर काहीजण कॅन्सल झाल्यामुळे गडभोजनाचा प्लॅन रद्द करण्यात आला...


 


सुधागड तसा फारसा लांब नाही मुंबईहुन पाली आणि पालीहुन जेमतेम १०-१२ किमी वर हा गड आहे.. शनीवारी रात्री निघायचे ठरले.. मला शनीवारी हाफ डे असतो, अनुजा, आशु आणि सुहास असे आम्ही संध्याकाळी अंधेरीला भेटायचे ठरवले...रात्री थोडं लेटच निघायचे होतं. अनुजा ५.३० ला ऑफिसवरुन सुटणार होती आणि मला हाफ डे असल्याने मी ऑफिसमध्येच बसलो होतो.. बाहेर हलकासा पाउस होता. काम नसल्याने मी अनुजासोबत चॅटवर अंताक्षरी खेळत बसलो होतो... आणि त्याचबरोबर किशोरी  ताईंचा तीन ताल मधील तराणा ऐकत होतो....सव्वा पाच ला अनुजाचा टेकस्ट आला की मी निघतेय तु ६.०० वाजता अंधेरी स्टेशनला पोच. ट्रॅफिकमुळे मला पोहचायला थोडा उशीरच झाला... तोवर आमची एस्.एम्.एस अंताक्षरी सुरुच होती...आशु आणि सुहास येइपर्यंत आम्ही स्टेशनवर गप्पा मारत बसलो...काही वेळाने आशु आला आणि सुहासपण आला.. महेश काही कामानिमित्त कांदिवलीला गेला होता..आणि त्याला यायला थोडा उशीर होणार होता तोवर आपण खादाडी करुन घ्यावी असं ठरवलं.. त्यासाठी अनुजा ने आरफाचं नाव सुचवलं ( आरफाच्या खादाडीबद्द्ल अनुजाने वेगळी पोस्ट टाकली आहे ती इथे वाचु शकता ). जेवण तुडुंब झाल्यावर आम्ही चालत स्टेशनच्या दिशेने आलो.. महेश अजुनही कांदिवलीलाच होता आणि त्याला यायला अजुन थोडा वेळ लागणार होता... काही वेळाने साल्याचा फोनच लागेना तेव्हा हा टांग देतोय की काय असं वाटायला लागलं कारण आम्ही त्याच्याच गाडीतुन जाणार होतो... मी ही शंका बोलुन दाखवल्यावर तर बाकीच्यांनी माझा हनुमान करायचा ठरवलं आधीच माझ्या हनुवटीला काय तरी छोटीसी पुळी आली होती आणि हनुवटी थोडीशी सुजली होती....काही वेळाने महेशचा फोन आला आणि त्याने आम्हाला अंधेरी ईस्टच्या विनायक मंदीराच्या इथे थांबायला सांगितले. तिथेही साला लेटच आला... पण शेवटी आला... आम्ही पालीच्या दिशेने कुच केले.. गप्पा मारत्.गाणी ऐकत्,गुणगुणत आम्ही निघालो होतो..

पनवेल नंतर तुफान पाउस कोसळु लागला.. भर पावसात ड्राईव्ह करत आम्ही पालीला पोचलो तेव्हा दोन - तीन वाजले असावेत... मग पालीच्या बल्लाळेश्वराच्या भक्त निवार्‍यात आसरा मागायला गेलो पण जागा नाही मिळाली. मग गाडी एका दुकानाच्यासमोर लावून आम्ही गाडीतच झोपी गेलो...पाउस कोसळतच होता... सकाळी साडे पाचच्या दरम्यान मला जाग आली. गाडीच्या खिडकिवर एक गावातला मुलगा टकटक करत होता.. मी वैतागुन खिडकीची काच खाली केली. बोललो, "काय आहे? "
" साहेब तुम्हाला माहीत आहे ना पुढचा टायर पंक्चर आही तो!"
तो असं बोलताच आमची झोपच उडाली...भर पावसात आम्ही तो टायर बदली केला त्यानंतर एका गॅरेजमध्ये जाउन तो पंक्चरही काढला.. या सगळ्यात तास - दोन तास् वाया गेले... मग सकाळचहा नास्ता आटपुन क्षणाचाही विलंब न लावता आम्ही पाछापुरच्या दिशेने कुच केले..बराच वेळ झाला तरी गड नजरेत येत नव्ह्ता त्यात धुकंही बरच होत... ठाकरवाडीला पोहचता पोहचता गड दिसु लागला... हिरवागार, वरुन धुक्याने आच्छादलेला, आणि उमाळे फुटावे तसे पांढरेशुभ्र धबधबे खाली कोसळत होते.. डोळ्याचं पारणं फेडणारे ते दृश्य आम्ही कॅमेर्‍यात बंदिस्त केले आणि ठाकरवाडीला पोचलो. शाळेजवळ गाडी पार्क केली.. आणि वाट विचारत विचारत गडाच्या दिशेने चालु लागलो...




चढण तशी कठीण नाही.. आम्ही गप्पा मारत वर चढत होतो.. सुधागड करायचा दुसरा हेतु म्हणजे मला तेलाबैलाचं दर्शन  घ्यायचं होतं पण शेवटपर्यंत दिसलाच नाही. कदाचित आम्ही दुसर्‍याबाजुला गेलोच नाही...रानातुन वाट काढत आणि दिशादर्शक बाणांचा मागोवा घेत आम्ही गडाच्या दरवाज्याशी पोचलो... वर चढताच अनुजा नावाच्या चोराला चोर दरवाजा दिसला मग त्या चोर दरवाज्यातुन शिरुन आम्ही दुसर्‍या वाटेला बाहेर आलो.. आणि पुन्हा त्याच दरवाज्यातुन वर चढलो. चोर दरवाज्याचा तो अनुभव थ्रीलींग होता...मला आणि सुहासला सोडुन ( आमच्या गुटगुटीतपणामुळे )बाकिच्यांना त्या चोर दरवाज्यातुन जायला यायला काही विशेष अडचण नाही जाणवली.






काही वेळाने पाउस सुरु झाला.. आणि चांगलाच कोसळु लागला.. गडाच्या त्या हिरव्यागार माथ्यावर आम्ही अक्षरशः ढगात विहार करत होतो... तिथुन हलावेसे वाटतच नव्हते.. काही वेळाने आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो.पाउस थांबायचें नाव घेत नव्ह्ता.. चालत चालत आम्ही गडावर असलेल्या पंत सचिव वाड्यावर आलो... तिथे आधी पासुनच काही भटक्यांचा बॅग्स होत्या.. एका शेगडीवर असलेल्या टोपात जेवण बनवले होते.. ते काय होते ते अनुजा ( माउच्या पावलांनी ) जाउन चेक करुन आलीच.. खिचडी होती कदाचित.. मग आम्ही सुद्दा आमचं जेवण उरकायचं ठरवलं त्यासाठी अनुजाने ठेपले आणले होते. लोणच्याबरोबर ठेपले आणि केळ्यांचे चिप्स असा बरगच्च जेवणाचा कार्यक्रम आट्पुन आम्ही निघलो...





पुढे महादरवाजा बघायचा होता...वाटेत भोराई देवीचे दर्शन घेतले आणि निघलो..मंदीरासमोरची दीपमाळ फारच सुंदर होती... बराच वेळ हुडकुनही महदरवाज्याचा रस्ता सापडत नव्हता.. पण महादरवाजा बघितल्याशिवाय जायचंच नाही असं ठरलं होतं नाही तर त्या ट्रेकचा उपयोगच काय??? शेवटी दगडांच्या पायर्‍या दिसायला लागल्या. वाटे अजुन काही भटके सापडले. काही वेळाने आम्ही महादरवाज्यापाशी पोचलो आणि ट्रेक सार्थकी लागला असं वाटलं. आमची गाडी ठाकरवाडीत होती आणि जर आम्ही महादरवाज्याने उतरलो तर धोंडसे गावात पोचणार होतो. पण पुन्हा उलटं जाण्याऐवजी आम्ही धोंडसे गावात उतरुन मग ठाकरवाडीला जाउ असे ठरले. आणि इथेच फसलो..



पण प्रॅक्टिकली ट्रेकचा हाच पॅच थ्रीलिंग होता.. उतरताना गडाच्या पायर्‍यावरुन पाणी अगदी फोर्सफुली वाहत होते त्यामुळे ते दगड गुळगुळीत झाले होते त्यामुळे प्रत्येक पाउल सांभाळुन टाकावे लागत होते... तरीही दोन वेळा मी गोल केलाच... पहीला गोल एकदम सही होता.. मी एका दगडावरुन बसुन हळूच उतरत होतो आणि माझा पाय घसरला. धाड धुड माझ्या तंगड्या वर झाल्या आणि मी त्या खडकांमधे आदळलो. नशीब पाठीवर बॅग होती त्यामुळे जास्त लागलं नाही... मी कसाबसा उठलो आणि पुन्हा सांभाळून चालु लागलो... काही वेळाने अगदी सहज चालताना एका दगडावर पाय ठेवला आणि पुन्हा सटकलो यावेळी उजव्या हातावरच पडलो. हात मजबुत दुखावला. माझ्यामागे अनुजा होती,तीने मला पटकन सावरलं नाहीतर मी सरळ खाली असलेल्या दुसर्‍या कातळावर आदळलोच असतो. ( विशेष म्हणजे हा अनुजाचा पहिलाच ट्रेक होता जिथे तिने एकही गोल नाही केला ) आजचा दिवस काही खरं नव्हतं एका मागुन एक दोन गोल झाले होते... उतरता उतरता एक गोष्ट जाणवत होती की गेला एक - दिड तास आम्ही चालत होतो पण बेस काही सापडत नव्हता... इतर ट्रेकर्स ग्रुप सोबत होतेच.. पण एका ठिकाणी येउन आम्ही थबकलो कारण पुढे रस्ताच नव्ह्ता..आणि तो पाण्याचा प्रवाह पुढे धबधब्यात कन्व्हर्ट झाला होता.. जो ट्रेकर्सचा ग्रुप सोबत होता त्यांच्यातले काहीजण पुढे गेले होते. ते नक्की कोणत्या मार्गाने गेले तेच समजत नव्हते त्यामुळे चुकामुक झाली आम्ही रस्ता शोधत होतो शेवटी आरोळ्यांना प्रतिसाद मिळाला आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो... काही वेळाने खाली उतरलो आणि बघतो तर बरेच जण होते आणि नदीतुन मार्ग काढण्याच्या प्रयत्नात होते. मग आम्हीही त्यांच्याबरोबर नदी पार केली... चालता चालता मला राहुन राहुन वाटत होते की आपण रस्ता चुकलोय.. तरीही नदीच्या एका बाजुने आम्ही चालत होतो.. काही वेळाने लक्षात आलं की आपल्याला नदीच्या दुसर्‍या बाजुला जायचयं.मग काय चला रिव्हर क्रॉसिंग.. एकमेकांच्या हातात हात गुंफुन आम्ही नदी पार केली. प्रवाह बराच होता पण सावरत सावरत आम्ही नदी पार केली.. फार मजा आली..मग त्या बाजुने चालताना मला आम्ही जिथुन गड चढायला सुरु केला होता तो स्पॉट दिसला आणि मग सगळं लक्षात्त आलं.. ( खरं तर आम्ही पहिल्यांदा नदी पार केली त्या ऐवजी आम्हाला नदीच्या त्याच बाजुने किनार्यावरुन जायचे होते, पण वाट चुकल्याने आम्हाला दोन वेळा नदी पार करावी लागली ) त्याच परत पुढे गेल्यावर काही मुले पोहत होती... त्यांना ठाकरवाडीचा रस्ता विचारल्यावर त्यांनी रस्ता दाखवला.. म्हणजे आम्हाला पुन्हा नदी पार करायची होती.. चला परत कंबरभर पाण्याच्या प्रवाहात आम्ही पुन्हा नदी पार केली.ऑस्स्सम !! नथिंग लाईक इट! काय हवं आयुष्यात अजुन???

काही वेळाने नदीवर छोटा पुल दिसला... काही क्षण गडाला पुन्हा डोळ्यात भरुन घेतले आणि चालु लागलो..समोर एक गुराखी दिसला त्यांना ठकरवाडीचा रस्ता विचारला तर तो बोलला की समोरुन चालत गेलात तर १ तासात पोहचाल. आम्ही आता धोंडसे गावात पोहचलो होतो. म्हणजे आमची गाडी जिथे होती तिच्या अगदी विरुद्द दिशेस.. मग स्थानिकांकडुन माहीती घेउन आम्ही धोंडसे गावातुन एस्.टी. पकडुन एकवीस गणपतीच्या स्टॉपवर उतरुन मग पुन्हा ठाकरवाडीला एस्.टींए जायचे असे ठरले.. काही वेळाने आम्ही तिथे पोहचलो. इथुन पाली फक्त ४ किमी होते आणि ठाकरवाडी १० किमी. आम्ही महेशला एका बाईकवरुन पुढे जाउन गाडी आणण्यास पाठवले आणि आम्ही तिथेच टेकलो..महेशला जाउन बराच वेळ झाला होता... ठाकरवाडीची शेवटची बस जाउन परत पालीला गेली तरीही हा आला नाही.. आता बराच वेळ झाला होता तरीही महेशचा काही पत्ता नव्हता. आता हळूहळू काळोख पडु लागला आणि आमची काळजी अधिकच वाढु लागली.. याला इतका वेळ का लागावा??? आम्ही वैतागलो होतो.. मग ठरवलं की रिक्षा करुन आपण ठकरवाडीला जायचं पण रिक्षावाले २०० - ३०० च्याखाली ऐकेनात. त्यात महेशचे दोन्ही सेल बंद होते..आम्ही गेलो आणि हा झर्रकन निघुन गेला आणि त्याला आम्ही सापडलो नाही मग पुन्हा चुकामुक... वळणावरुन येणारी प्रत्येक गाडी आम्हाला आमचीच गाडी दिसत होती... आशु आणि मी वळणावर जाउन उभे होतो... आता ९ वाजायला आले होते. काहीच कळत नव्हत काय करायचे ते... शेवटी एक स्विफ्ट थांबली त्यात ५-६ जण तरुण बसले होते.. त्यांआ आम्ही झालेला प्रकार सांगितला.. ते सर्वजण नशेत होते, प्रोबॅबली डोपर्स.. त्यातला एकजण बोलला की तुमच्यापैकी कुणीतरी एकाला पाठवा आमच्याबरोबर आम्ही बघुन येतो.मी तयार झालो. मुलं ठिक दिसत नव्हती पण सोड ना यार!! आम्हाला महेशची काळजी वाटत होती. अनुजाने मला बाजुला घेउन शंका बोलुन दाखवली, पण अजुन काही उपाय नव्हता मी त्यांच्या गाडीत बसणार इतक्यात समोरच्या वळणावरुन एक गाडीचे प्रखर हेडलाईटस आमच्या डोळ्यावर पडले आणि ओळखिचा हॉर्न कानावर पडताच आमच्या जिवात जिव आला... हो आमचीच गाडी होती ती... आम्ही सारेजण गाडीत बसलो.. महेश फार टेन्सड वाटत होता.. (आम्ही त्याला काहीच विचारले नाही असे आधीच ठरले होते).आता नॉनस्टॉप मुंबई !!  पण काहीवेळाने अनुजाने त्याला विचारलं की काय झालं रे ? इतका उशीर का झाला.???  त्यावर महेशने त्याची कहाणी ( झालेला सगळा प्रकार) सांगितली... महेश ज्या बाईकवाल्यासोबत गेला होता तो बाईकवाला ठाकरवाडीला नाही तर नांदगावला जाणारा होता.. त्याने महेशला मुख्य रस्त्यावर न सोडता नांदगावला नेउन सोडले जो गाव ठाकरवाडीपसुन ६ - ७ किमी होता.. नांदगावातुन उलट चालत येउन परत मुख्य रस्त्यावरुन चालुन त्याला पाछापुरहुन ठाकरवाडीला जावे लागले.. बरे, काळोख पडत होता आणि हा त्या निर्जन रस्त्यावरुन एकटाच चालत होता. आजुबाजुला मानसांचा मगमुसही नव्ह्ता त्यामुळे तो घाबरला होता.. वाटेत एका गावात त्याने विचारल्यावर त्या लोकांनीही त्याला घाबरवले की अरे आता तु नाही पोचणार, पुढे जंगल आहे, स्मशान आहे वैगरे वैगरे.. तरीही चालत चालत बिचारा रडवेला होउन कसाबसा ठकरबाडीला पोचला आणि तिथुन गाडी घेउन १० मि. परत आला.. चालुन चालुन त्याचे पाय गळ्यात आले होते आणि त्याला गाडीही नीट चालवता येत नव्हती, मग आशुने गाडीचा ताबा घेतला... बराच वेळ झाला होता... अनुजा आणि आशुला पालघरला पोचायचे होते, सुहासला सकाळी ३.०० वाजता ऑफीसला पोचायचे होते, सगळा प्रॉब्लेम झाला होता... मग आशु,अनु, आणि महेशला मी माझ्या घरी राहायला सांगितले, सुहासला कसंही करुन ऑफिसला पोचायचे होते. साडे दहा - अकरा वाजता आम्ही हाय - वे वर एकवीरा मध्ये डीनर आटपला आणि पनवेलच्या दिशेने निघालो... सुहासला पनवेल स्टेशनवर सोडले, त्याच्या नशीबाने त्याला शेवटची लोकल मिळाली...मग रात्री मस्तपैकी झोपुन सकाळी आम्ही आपापल्या ऑफिसच्या दिशेने निघालो पुन्हा एकदा आठवडाभर कॉर्पोरेट विश्वाचा ट्रेक सर करण्यास........

नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते, महाराजानी त्यासाठी सुधागडची पाहणी केली पण महराजांनी रायगडाची राजधानी म्हणुन निवड केली - सौजन्य अनुजा सावे....

Monday, June 28, 2010

राजमाची ट्रेक .....


२० जुनला राजमाची ट्रेक करुन आलो. ही माझी तीसरी ट्रेक. याआधी मागच्या वर्षी लोहगड आणि या वर्षी जानेवारीत सिंह्गड करुन आलो होतो. प्रत्येक ट्रेकमध्ये एक थ्रीलिंग असते. भटकण्याच छंद हा मला पहिल्यापासुनच आहे. पण किल्ल्यांची खरी ओळख मला रोहन, पंकज यासारख्या ट्रेकर्सच्या ब्लॉग्जमुळे झाली आणि कधी तरी आपणही हे सर्व वैभव याची डोळा पाहायचं,अनुभवायचं हे मनाशी पक्कं केलं. ट्रेक करायची तर एकट्याने शक्य नसतं. त्याची आवड असणारे, निसर्गाशी एकरुप होणारे, हिरव्या गवतावर लोळण घेणारे, तासंतास सुर्यास्तात हरवून जाणारे,नदीच्या पाण्यात डुंबणारे,  आणि हो या सार्‍या सह्यपर्वतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारे चार - पाच मित्र हवे होते. माझ्या दुर्दैवाने माझ्या तिन्ही ट्रेकमध्ये मला असे कोणी सापडले नाही. ते ट्रेक म्हणजे पिकनिक समजुन आले होते. आणि इतक चालुन त्यांचा दम निघाल्यामुळे त्या सगळ्यानी प्रत्येकवेळी माझा उद्धार केला. मला या लोकांची किव यायची. यांना कसं काहीच वाटत नाही. इतकी मेहनत करुन जेव्हा आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहचतो, तेव्हा ते सारं वैभव पाहुन छाती कशी अभिमानाने फुलुन आली पाहिजे. पण नंतर मला जाणवलं की मी चुकिच्या लोकांबरोबर फिरत होतो.असो. पण राजमाची ट्रेक महेश आणि मी फार एन्जॉय केला.

फ्रायडेला मी आणि महेश जी टॉकवर चॅट करत होतो. बोलता - बोलता ट्रेकचा विषय निघाला आणि आम्ही राजमाचीला जायचं प्लॅन केला. महेश त्याची सुमो व्हीक्टा घेउन येणार होता. मग एवढी मोठी गाडी काढणार तर त्याप्रमाणे पंटर पण हवेत. मग महेशने त्याच्या काही मित्रांना बोलावले. मागच्या ट्रेकचा अनुभव होता म्हणुन मी माझ्या जुन्या ग्रुपमधल्या कुणालाही बोलावले नाही. रात्री दीड वाजता महेश आणि बाकिच्यांनी मला पनवेलहुन पिक अप केले. महेश, अमोल, महेंद्र आणि मी दहावीपर्यंत एकाच शाळेत होतो. बाकीचे सारे महेंद्र आणि महेशचे मित्र होते. रात्री २/ २.३० वाजता आम्ही लोणावळ्याला पोहचलो. लोणावळ्याहुन राजमाचीला जाता येतं एवढं माहेत होतं पण नक्की कसं जायचे ते माहीत नव्हतं. एका दुकानावर थांबुन मस्तपैकी चहा मारला आणि त्या दुकानवाल्याला राजमाचीला कसं जायचे याची माहीत घेतली. त्याप्रमाणे आम्ही तुंगार्लीच्या दिशेने निघालो. रात्रीचे ३.०० वाजले होते. सारा परीसर शांत झोपला होता. काळोखात आजुबाजुचे काही दिसत नव्हते. जोवर रस्ता दिसत होता तोवर महेश गाडी हाकत होता. मी ही कन्फुज्ड झालो होतो. बराच वेळ कच्या रस्त्यातुन ड्राईव्ह केल्यावर पुढे काहीच कळेना म्हणुन एका बंगलोच्या इथे गाडी उभी केली. एक वॉचमन तिथे होता. पुढे बसलेल्या विशालने त्याला विचारले " दादा, राजामाचीला कसं जायचे?"
"कूठं ??"
" राजामाची.... राजामाचीला कसं जायचं? "
'' राजामाची???? राजामाची न्हायी... राजमाची... राजमाचीला जायचयं का?"
" हो ...हो .. राजमाची,.......! " 
" तुम्ही चुकिच्या रस्त्याने आलात.... तुम्ही परत मेन रोडला जा. तिथुन राईट्ला वळा आणि आर्.पी.टी.एस. कंपनीच्याइथुन खाली उतरा.. तो सरळ रोड राजमाचीला जातो. इथुनही जाता येईल पन  पोहचेपर्यंत तीन साडे तीन तास लागतील. "

त्याचे आभार मानुन आम्ही परत फिरलो... मेन रोडला आलो. आणि त्या आर्.पी.टी.एस. च्या इथुन खाली उतरलो. रस्ता अतिशय खराब होता. मध्येच एक ट्रक रस्त्यात असलेल्या एका झाडामध्ये फसला होता. आम्ही त्या कच्च्या रस्त्यातुन पुढे निघालो. रात्रीच्या काळोखात आजुबाजुला कहीच दिसत नव्ह्ते. आम्ही ड्राईव्ह करत करत कोणत्यातरी गावात पोहचलो.. आता परत कन्फुज्ड... !!! कुठे जायचे तेच कळत नव्हते.. परत मागे आलो. आणि परत एका हॉटेलच्या सि़क्युरिटी गार्डला झोपेतुन उठवलं.. रस्ता सापडत नाही म्हणुन मी आणि महेश टेन्समध्ये होतो. तर बाकीचे सारे आमच्या नावाने आरडा ओरड करत होते....मला साल्यांचा राग येत होता... त्या गार्डने सांगितले की, रस्ता बरोबर आहे, फक्त गावातुन पुढे गेल्यावर राईट मारुन जा, म्हणजे पोचाल.... काळोख असल्याने काहीच दिसत नव्हते... आणि बाकीचे सारे ( जे पिकनिक समजुन ट्रेकला आले होते) बीअर हवी म्हणुन ओरडत होते.... शेवटी परत फिरायचे ठरले.. पहाटेला परत या रोडने यायचे असं ठरले.. आम्ही परत मेन रोडला त्या चहाच्या दुकानापाशी आलो.. रात्रभर आम्ही रस्ता शोधत फिरत होतो.. आता सकाळचे ५.३० वाजले होते. दुकाने अद्याप उघडली नव्हती आणि रात्री रस्त्यावर असणार्‍या भुर्जी पाव, चहाच्या टपर्‍या आता बंद झाल्या होत्या... एका टपरीवर महेशने मॅगी ऑर्डर केली... मी काही खाल्लं नाही... बाकीचे लोक बीअरच्या शोधात होते... मला अजुनही या लोकांचा राग येत होता... एवढ्या सकाळी कुठे मिळणार यांना... मी त्यांना समजावले, की पहिल्यांदा आपण किल्ल्यावरुन जाउन येवुया मग निघताना जे काही करायचे ते करा.... पण माझं आणि महेशचे एकणारे कुणी नव्हते.... त्यातल्य एकाने गाडीचा ताबा घेतला आणि गाडी लोणावळा मारकेट्च्या रस्त्यावर एक जॉनी वाकर नावाचा वाईन शॉप आहे तिथे उभी केली.. का ? तर म्हणे ते दुकान सकाळी ७.०० वाजत ओपन होईल.... माज डोकं सणकलं होतं... काय हरामखोर आणि नीच लोक आहेत... महेशने मला थांबवलं.... शेवटी तिथल्या एका स्थानिक माणसांच्या मदतीने त्यांनी बीअरची सोय केली... आणि आम्ही परत तुंगार्लीच्या दिशेने निघालो...

रस्ता बराच खराब होता.. पाउस नव्हता.. नाहीतर पावसात रस्त्याची हालत अजुन खराब झाली असती.. आमच्याकदे सुमो विक्टा होती... महेशने छान ड्राईव्ह करत गाडी कशीबशी काढली.. परत चुकायलो नको म्हणुन आम्ही रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येकाला पुढची वाट विचारत होतो....काही वेळाने आम्ही तुंगार्ली धरणाच्याइथे आलो. समोर राज्माची दिसत होता.. एका बाजुला संपुर्ण कातळाची भिंत लांबच्या लांब पसरली होती... तिथेच काही फोटो घेतेले.... मला आता राहवत नव्हतं कधी एकदा किल्यावर पोहचतो असं झालं होतं... पुढे गाडी जाईल कि नाही याची शंका होती, तसचं डिजेलचा काही अंदाज नव्हता.. म्हणुन आम्ही गाडी एका घराजवळ पार्क केली आणि तिथुन चालत जायचे ठरले.... अजुन किती चालायचे हे मलाही माहित नव्हते.. आम्ही जिथुन चालायला सुरुवात केली तिथुन दोन- अडीच तास लागले आम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी पोह्चायला... मी आणि महेश सोडुन बाकिच्यांची पहिलीच ट्रेक होती.. आम्ही चालत होतो.... अमोल, महेंद्र आणि बाकेचे सारे जण माझा उद्दार करत चालत होते... काही जणांनी किल्ल्याला दुरुनच नमस्कार करायचे ठरवले.. मी ऐकणार नव्हतो.. मी सगळ्यांना स्पष्टपणे सांगितले... कुणी येवो अगर न येवो मी जाणार.... महेशही माझ्याबरोबर तयार होता.... आम्ही पढे चालत होतो... बाकीचे दंगा मस्ती करत ..बीअर पीत.. ओरड मारत चालत होते...मी महेशला बोललो साल्या कूठुन आणलं यांना... सगळ्या ट्रेकची मजा घालवली....बाकिच्यांना मी ओळखतही नव्हतो.. पण महेंद्रला एकाच बीअरमध्ये चढली होती कारण तो माझ्याशी बराच वाद घालत होता... त्यात अमोल न पीता त्याला साथ देत होता.... दोघांनीही अक्षरशः मला पीड पीड पीडले.... कुठुन मला दुर्बुद्धी झाली आणि यांना ट्रेकवर घेउन आलो असं मला वाटत होतं..... रस्ता चांगला होता.. एका मो़कळ्या जागेवर आल्यावर राजमाची स्पष्ट दिसत होता.. पण तिथपर्यंत पोहचायचे म्हणजे समोर दिसणारी दरी क्रॉस् करुन अजुन चालावे लागणार हे दिसत होते.. पण आता मागे फिरणे शक्य नव्ह्ते किंवा मनाला पटतही नव्हते.. आम्ही चालु लागलो... वाट चांगली होती.. पावुस नसल्याची खंत सारखी लागत होती... रानातुन चालत चालत आता आम्ही किल्ल्याच्या जवळ आलो होतो... ज्या ठिकानी उभे होतो तिथुन तुंगार्ली धरण दिसत होते... म्हणजे परत जाताना आम्हाला किती चालत जावे लागणार याची जाणिव झाली होती... आता समोरची खोल दरी दिसत होती... समोर रिकामा धबधबा होता..... तिथे काही फोटो घेउन आम्ही निघालो.... पायथ्याशी आल्यावर एका दुकानात बिस्किटे आणि लिंबु सरबत घेतला.... पाहिलं तर काही बाईकस्वार किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाईक घेउन आले होते... ... एव्हाना जी मुले काहीवेळापुर्वी परत जाण्याच्या गोष्टी करत होते ते ऑलरेडी किल्यावर पोहचले होते... महेशने त्यातल्या एकाला फोन केला तर तो किल्ल्याच्या माथ्यावर पोहचुन झेंडा फडकवत होता... काय विचित्र पोरं होती ही.... मग मी, महेश, अमोल आणि महेंद्रने चढाई सुरु केली... पावसामुळे काही भाग स्लिपी झाला होता... अर्ध्यावर चढलो.. महेश आणि महेंद्र पुढे गेले.. चढताना प्रॉपर असं आधाराला काही नाही त्यात हवा विरुदध दिशेने ढकलत होती...
मध्येच अमोल बोलला, " साल्या, तु मला मरवणार आहेस.. तुला माहीत आहे मला चक्कर आणि फीट्स येतात..शाळेत मी दोन - तीनदा असाच पडलो. होतो.. "
मला पटकन आठवलं.. हा यार!!! आता जर हा इथे पडला तर सगली बोंब.. आणि याच्या फिटस मी शाळेत असतान अनुभवल्या होत्या... मी त्याला तिथेच बसायला सांगितले आणि बोललो तु अजुन वर येवु नकोस.. मी जाउन य्तो.. तोवर तु इथेच थांब किंवा खाली जाउन बस्.....अस.म म्हणुन मी पुढे जात होतो... पण पुढे चढण्यासाठी फार अवघड वाटत होतं.. दोन तीन दगडातल्या पायर्‍या पण तिथुन पाणी वाहत होतं आणि बरचं स्लिपी होतं.. खाली पाहिलं तर माझं डोकंही गरगरायला लागलं...कारण बाजुला धरायला कसलाच आधार नाही आणि जर सटकलो तर डायरेक्ट खाली.... तरी मी खाली न बघता चढलो आणि व्हयचे तेच झाले माझा पाय घसरला.. मी घाबरलो .. पण स्वतःला सावरलं... माझी छाती धडधडायला लागली... अमोल मला हसु लागला..," काय राजे??? फाटली???"
मी काहीच बोललो नाही... थोडावेळ बसलो.... समोरु एक वाट दिसत होती.. ती ही तशीच... कसलाही आधार नाही.... त्याच वाटेवरुन एक बाई ' मरा मरा मरा मरा मरा ...." करत चालली होती.... आता काय करायचं... किल्ल्यावर जाणे अटळ होते... नाहीतर सारे रात्रीचं जागरण, इतकं चालणं सारं काही व्यर्थ होतं. अमोल त्याच दगडातल्या पायर्‍यावरुन बूट काढुन चढला... मी ही प्रयत्न केला पण माझे पाय थरथरायला लागले.. अमोल पुढे गेला.... शेवटी मनाचा धीर केला.... समोरच्या वाटेवरुन जी बाई काही वेळापुर्वी गेली होती तिथुन जायचे... उठलो, नजर समोर ठेवली.. खाली बघायचच नाही.. आणि सरळ चालत गेलो... वारा खाली ढकलत होता पण न थांबता गेलो... आणि झापकन वर चढलो...जसा गडावर गेलो... मोठ्याने ओरडलो....  "हर हर महादेव ! "समोर दिसणारं दृश्य बघुन भान हरपून गेले.... दुरवर नजर जाईल तिथे लांबच्या लांब पसरलेले डोंगर, चारी बाजुनी धुक्याने बुडालेले.... एका बाजुला समोर एक काळा सुळका दिसत होता.. कदाचित ढाक बहीरी असावा...  समोर श्रीवर्धन आणि मनरंजन हे बालेकिल्ले दिसत होते...मी एकटाच्या तिथल्या एका खडकावर आडवा झालो... पावसाच्या बारीक सरी पडत होत्या पण मोठा पाउस पडण्याची चिन्ह दिसत नव्हती... मी ती सारी शांतता स्वतःमध्ये सामावुन घेत होतो.... काही वेळाने उठुन किल्ल्याच्या माथ्यावर जायला चालु लागलो... किल्ला पुर्ण बघायला मिळाला नाही.. माथ्यावर जाउन काही फोटो काढले आणि परत जायला निघालो.... ते सारं वैभव डोळ्यात साठवुन....


निघायच्यावेळी काही मुले परत पुढे गेली होती.. आता बरचं चालायचं आहे हे ठावूक होतं.. त्यात कुणीही काही खाल्लं नव्हतं.... वाटेत जाताना जिथे करवंद दिसतील तिथेच त्यांचा फडशा पाडला.... परतीच्या वाटेवर बरेच ट्रेकर्स येताना दिसत होते.. काही बाईकवरुन येत होते... काही वेळाने तर कळसच झाला. एक माणुस चक्क टाटा सुमो घेउन किल्ल्यापर्यंत आला.. त्याला बघुन बाकिच्यांनी मला आणि महेशला परत शिव्या घालाययला सुरुवात केली.. पण जर आपल्याला गाडीने किल्ल्यापर्यंत जायचे होते तर मग ट्रेकिंगला अर्थ काय होता??? पण यांना बोलुन काही फायदा नव्हता.. ते आपलीच पुंगी वाजवत होते.... आता दीड वाजला होता आणि आमच्या पोटात आग पडली होती. ती थोडीशी करवंदांनी भागवली होती...आम्ही लवकरात लवकर पोहचायच्या प्रयत्नात होतो.. पण रस्ता संपतच नव्हता..... काही वेळाने समोरुन एक फोक्स वॅगन टॉरेग येताना दिसली... मी विचार केला आयला हमव्ही असली असती तर डायरेक्ट गडावरच पार्क केली असती....  पाय अक्षरशः गळ्यात आले होते.. काही ठिकाणी बसत बसत, आम्ही कसेबसे परत तुंगार्लीला पोहचलो... गाडी बघितली आणि जिवात जीव आला. अगोदर पोहचलेले गाडी खोलुन आडवे तिडवे पडले होते... आता जेवून डायरेक्ट घरी..... निघताना मी आणि महेश पुढच्या ट्रेकची प्लॅनिंग करत होतो... आणि ठरवले.. साला कुणी नाही आला तरी चालेल आपण दोघंच जायचे... बाकीच आम्हाला हसत होते आणि आम्ही त्यांना...... दुर्दैवाने काही चांगले फोटोज माझ्याकडुन डिलिट झाले....