Showing posts with label रंगभूमी. Show all posts
Showing posts with label रंगभूमी. Show all posts

Tuesday, March 15, 2011

मी शारुक मांजरसुंभेकर!



कधी नव्हे ते नाटक बघायला गेलो. मी नाटकं जास्त बघत नाही, स्वःताच दिवसभर इतकी करत असतो मग अजुन काय बघायाची. :)

तर त्या दिवशी संगित मानापमान बघायला जायचं ठरलं होतं. ज्योति सोबत होती. दुपारी दादरला भेटल्यावर पोरीचा मुड पालटला, काय तर म्हणे ते नाटक बघून तू पण सुरु होशील गायला, एक वेळ ते  संगित नाटक सहन करेन पण तुला कोण सहन करणार असा पवित्रा, त्यात सुहासपण कॅन्सल झाला. मग बोलली की ठाण्याला गडकरीमध्ये " मी शारुक मांजरसुंभेकर" लागलयं सिद्ध्याचं ते बघुया. ठीक आहे म्हणून मी तयार झालो आणि मग आनंद काळे ( आका ) ला पण यायला सांगितलं. सही रे सही नंतर हे दुसरं नाटक मी बघत होतो. आमच्या मालवणातली दशावतार बघुन एक दशक लोटलयं.

नाटक छान आहे! सिद्ध्या चित्रपटाच्या पडद्यावर जितका जिवंत वाटत नाही तितका तो स्टेजवर वाटतो. इन फॅक्ट कोणताही अ‍ॅक्टर स्टेजवरच जिवंत होतो. जास्त काही माहित नाही स्टेजवरचं पण त्या दिवशी त्या नाटकात तो खरचं भावला. 
 
मांजरसुंभा या गावातुन मुंबईत सुपरस्टार  बनण्यासाठी आलेल्या दत्ताजी मांजरसुंभेकर उर्फ दत्तू उर्फ शारुख  आणि त्याच्या स्ट्रगलिंगवर आधारलेले ते एक कथानक आहे. महेश मांजरेकरचे दिग्दर्श्न अफलातुन आहे. ज्या पद्धतिने नाटक पुढे सरकत जाते आणि क्लायमॅक्स येतं तेव्हा किंचित हादरायला होतं. तोपर्यंत प्रेक्षक सिद्ध्याच्या स्वप्नांबरोबर आणि त्याच्या प्रत्येक आठवणींबरोबर कधी जीव तोडून हसतात तर कधी हसता हसता त्याच्या काळीज फाडणार्‍या हालाखिच्या आठवणींनी डोळ्याच्या किंचीत ओल्या झालेल्या कडा  पुसतात. या नाटकाचं कथानक राजा आणि प्रधान पुढे सरकवतात. ते सिद्ध्याच्या बरोबर असतात आणि सिद्ध्या त्यांना आपली कहाणी मस्तपैकी हसत हसत, जोक्स मारत कथन करत असतो. पण गाव सोडताना आईच्या आठवणी, घरात कुणी कमावता न उरल्याने बहीणीवर आलेली जबाबदारी आणि तिचं अकाली मरण कथन करताना त्याची अ‍ॅक्टींग हेलावून टाकते. आयरनी ऑफ लाईफचे त्याचे डायलॉग जीवघेणे वाटतात....





आउट ऑफ ऑर्डर असलेल्या टेलिफोनवरुन आपल्या गावच्या प्रेयसीबरोबर गप्पा मारणारा दत्तू जेव्हा तिला त्याची कविता ऐकवतो ती कविताही छान आहे. 
" मी तुझ्यापासुन कधीच दूर होणार नाही गं! बर्फ कभी बर्फ घीसनेवाली मशीनसे अलग हो सकता है क्या??"  कैच्याकै! पण लॉजिक आवडलं आपल्याला!! 

नाटकातलं नेपथ्य पण सहीच आहे. काही दृश्ये जिवंत दाखवण्यासाठी एका स्क्रीनवर तशी योजना केली आहे, म्हणजे लोकल ट्रेनच्या सीन च्यावेळी त्या स्क्रीनवर धावणारी लोकल ट्रेन दिसते. 
एका दृश्यात अमिताभ बच्चनच्यामागे आपली अ‍ॅक्टींग दाखवत धावणारा सिद्धु स्टेजवरुन गायब झाल्यावर स्क्रीनमध्ये 
अमिताभबरोबर दिसतो; तसं काहीसं ते प्रत्यक्ष्यात बघण्यातच मजा आहे.

नाटकात लोकांना हसवण्यासाठी आजकालच्या शिव्यांचा राजरोसपणे वापर केला गेला आहे. त्यामुळे नाटक  रेटेड होते असं मला वाटत नाही. या रोजच्याच शिव्या; सी, एफ आणि इतर बर्‍याच अक्षरांनी सुरु होणार्‍या. काही डबल मिनींग विनोदही भरपूर वापरले आहेत पण ते त्या प्रसंगानुरुपच वापरले गेले आहेत. पीक अवरच्या वेळी लोकलच्या सेकंड क्लासच्या खचाखच भरलेल्या डब्यात काय हाल होतात हे आपल्या सर्वांनाच ठाउक आहेत. या परिस्थितित काही डबल मिनिंगवाले डायलॉग्स तर हसवण्याची हद्दचं संपवतात. मानतो थोडेसे तसे आहेत पण त्यावेळेपुरते ठीक आहेत. बाकी नाटक छान आहे. 

सिद्धुचं काम मस्तच! कधी मांजरसुंभ्याला गेलो तर तिकडच्या उस्मानभायची चाय मारायची जाम इच्छा आहे ! बाकी एकदा बघुन पैसा वसुल नाटक आहे! बघाच! 

अरे हो नाटक एका बहारदार लावणीने सुरु होते, ती मुलगी जाम आवडली मला! काय नाचली ती ! व्वा व्वा!! :) :)