Sunday, February 10, 2013

नावात काय आहे???? -----> ठेवलेलं नाव :)


"हाय शोना, काय करतेस?"
" काही नाही रे! काम, काम आणि काम सुरु आहे..."
"ओह्ह! कित्ती काम करते माझी छकुली. जेवलीस का वेळेवर?"
" नाही रे! जेवेन आता. तू जेवलास का?
"माझं जाउ दे ग राणी! मी जेवेन, पण तू ते काम बाजुला ठेव आणि जेउन घे बरं लवकर."
" हो! नक्की. आता जेवायलाच जाते."
"ह्म्म शहाणी माझी बबडी!"
"मग, किती वाजता निघणार ऑफिसमधून? संध्याकाळी भेटशील ना सोनुली!"
"हो! भेटुया. मी निघताना कॉल करते मग तू ये."
"ओके चिक्कू. पण नक्की भेट हां का, अ‍ॅम मिस्सिंग यू सो मच!
"ओके. मिस्सिंग यू टू चिक्कुड्या.. :)  ए, हॅल्लो! तुला एक विचारु का?"
"हो! विचार ना बब्बू, काय विचारायचयं??"
" When was the last time you called me with my real name?"
"What?"
"तू मला नेहमी, शोना, राणी, छकुली, चिक्कू, पेरु, बबडी, छबडी अशा नावाने हाक मारतोस. नाही! मला आवडत नाही असं नाही पण तुला माझं खरं नाव आठवतं तरी का?"
"म्हणजे काय? आणि तुला मी अशा नावानी हाक मारलेली आवडत नाही का?"
"तसं नाही अरे! पण तू मला माझं नाव घेउन हाक मारलीस की अजुन बरं वाटतं.."
'ओके. अगं लग्नानंतर मी तुला तुझ्या खर्‍या नावानेच हाक मारणार ना.घरात तर तुला बबडी, छ्बडी, चिक्कू, पेरु असं नाही ना हाक मारणार. मग लग्नानंतर तूच म्हणशील हल्ली ना तुझं प्रेमच नाही राहीलं माझ्यावर.लग्नाआधी कसा मला नेहमी राणी, शोना, छकुली, बाहुली म्हणायचा..."
" हे हे हे :)"
"हे हे हे ! चला आता जेउन घ्या वेळेवर. संध्याकाळी भेटुया. बाय, बाय शोनुली!
" तू सुधरणार नाहीस ! :) बाय. बाय. शोनुल्या..."

हा संवाद काल्पनिक आहे. नसला तरी काही फरक नाही पडत ;)  पण या संवादावरुन मी आठवू लागलो की खरंच मी नेहमी कुणाला ना कुणाला त्याच्या खर्‍या नावावरुन हाक मारतच नाही. वरील सांवादात नवीन असे काही नाही पण मला पटकन जाणवलं की माझे असे किती मित्र-मैत्रिणी, माझ्या आजुबाजूचे लोक, माझे नातेवाईक, यांची पण अशीच नाव असतिल का??? आणि एकेकाचं दुसरं नाव माझ्या मनःपटलावर उमटत गेलं आणि पुन्हा जुन्या आठवणीत हुंदडायला लागलो...
___________________________________________________________ 

आमच्या कोकणात ना सवयच आहे की कुणाचं नाव म्हणून कोण सरळ घेणारचं नाहीत. त्यात मालवण पट्ट्यात तर ही सवय नाही प्रथाच आहे. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या नावाचं एक दुसरंच नाव असतं. आणि ते नाव एखाद्या व्यक्तिला चिडवण्याकरता किंवा आपल्या उच्चारांच्या सोयीनुसार शॉर्ट्फॉर्म्स बनवले जातात. 


सुरुवात माझ्या घरापासुनच. माझं सगळं बालपण गावीच गेलं. आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या कोकणात तर फक्त चिडवण्यासाठी म्हणूनच एकमेकांच्या नावाची वाट लावली जाते. पण त्या चिडवण्यात सुद्धा एक मायेचा ओलावा असतो. अगदी शहाळ्यातल्या मलईसारखा..
माझ्या आज्जीचं खरं नाव तारामती असलं तरी प्रेमाने सगळी तिला 'आवशी' अशीच हाक मारतात. गावातले जुने लोक तिला तिच्या स्थूलपणामुळे "जाडुली" अशी हाक मारतात. माझ्या आईचं माहेरचं नाव रजनी. पण सगळे तिला 'रज्जू', 'रज्ज्या', आणि भावंडात ती मोठी असल्याने तिला 'बायो' अशी हाक मारली जाते. माझ्या मामाने लहानपणी खेळता खेळता एकदा गोटी गिळली होती. खेळायच्या गोटीला आमच्याकडे 'गुट्टी' म्हणतात. म्हणून मग सगळे त्याला 'गुट्टी' म्हणुन चिडवायचे. मग तो सगळ्यांवर भडकायचा. आता ते आठवून मला सिंघम मधला ''ए गोट्या!" वाला सीन आठवतोय. त्यावेळी, वाड्यातली जी जुनी, जाणकार, आजोबा मंडळी होती त्यांचीही नावं अशीच होती.
तुकारामला हाक मारताना, "ए तुकल्या!"
लाडू नावाच्या व्यक्तिला हाक मारताना."ए लाडक्या!" 
सहदेवला, "ए सादल्या!"
काळूला, "ए काळग्या!"
अर्जुनला,"ए अर्ज्या!"
श्रीधरला, "ए शिरग्या!"
त्याचप्रमाणे साबाजीला "साबल्या", भदूला " भदग्या", फटूला " फडग्या" अशी नावांची प्रेममय वाट लावली जायची... 


आम्ही लहानगे पण यात कमी नव्हतो. मला लहानपणापासुनच सगळे "दिपू" म्हणून हाक मारायचे, पण जर मी कुणाची कळ काढली, कुणाला काही चिडवलं की त्याबदल्यात माझ्या नावाची "दिपड्या-फिपड्या", 'ढिपाळ' (म्हणजे मातीचं ढेकळ.) अशी वाट लावली जायची. अर्थात मी सुद्धा दुसर्‍यांच्या नावाची वाट लावण्यात किंवा त्यांना नवीन नावं देण्यात मागे नव्हतो.
आमच्या पोरांमध्ये असलेल्यांपैकी, ज्ञानेश्वरला "ज्ञानी" आणि जर त्याने कळ काढली तर त्याच्या तिर्थरुपांच्या नावावरुन "डमरु" चिडवण्यात येई. त्याच्या वडीलांचे नाव 'शंकर' होते.
दुसरा सतिश. हा आमच्यात जाडजुड होता.याला नेहमी 'सतल्या' अशी हाक मारली जायची आणि जर का कळीला आला तर त्याच्या वडलांच्या पोटाच्या घेरावरुन त्याला "पोटल्या", "पोटली बाबा की" असं चिडवलं जायचं.
किरणला "किरण्या" आणि त्याच्या मोठ्या डोळ्यांमुळे "बटर" किंवा "शंभरचे गुलुप" ( १०० W चा बल्ब.)
प्रविणचा शॉर्टफॉर्म 'पम्या' असा होता पण तो 'पम्या' वरुन 'कोम्या' आणि कोम्यावरुन "कोंब्या" झाला. (कोंबा - कोंबडा )
पांडुरंगला पांडग्या,
रामदासला मात्र डाबू का चिडवाचे हे मला अजुन माहीत नाही पण त्याला डाबू म्हटलं की तो मारायलाच धावायचा.
समीरला "बच्ची" ( हा तोच "माझ्या शाळे"तला समीर ज्याचे दात पडले होते.)
संतोष ला त्याच्या तिरक्या डोळ्यांमुळे "तिरश्या".
सुनिलला सुनल्या. याच्या लहान भावाशी माझं कधीच पटायचं नाही. अतिशय गलिच्छ मुलगा! नेहमी तोंडात शिव्या असायच्या आणि म्हणूनच की याचे गाल, गालगुंडांमूळे नेहमी फुगलेले असायचे.
एकदा माझ्या कळीला आला आणि मी त्याला त्याच्या गालगुंडानी सुजलेल्या गालांकडे बघून "पाववाला" म्हणुन नाव ठेवलं. साल्याने मला घाल घाल शिव्या घातल्या पण त्यानंतर सगळे त्याला "पाववाला" म्हणूनच चिडवायचे. 
प्रशांतचे केस लहानपणापासुनच पांढरे होते. साहजिकच त्याला "ए म्हातार्‍या" असं म्हणायचे. 
तर अशी ही आमची टीम होती. आम्ही सगळे एकत्रच देवळात जमायचो, खेळायचो, मारामार्‍या करायचो, एकमेकांना चिडवायचो पण त्या सगळ्या दुसर्‍या नावांत एक वेगळीच दुनिया होती. लहानपणी एकमेकांची कळ काढल्यामुळे चिडवायचो पण आता असं एकमेकांना हाक मारली की अचानक ते जुने दिवस डोळ्यांसमोरुन तरळून जातात..

शाळेत जायला लागलो आणि मग अजुन नवे मित्र भेटत गेले. त्यांची नावे आणि त्यांना ठेवलेली नावे वाढत गेली.
नयन  - नयन्या, बाबलो
वासुदेव - वासू
अमोल - अमल्या, म्हातार्‍या,
शांताराम - आबा, शंतुल्या, ( हा गावच्या पोलीस पाटलाचा मुलगा. श्रीमंतीत वाढलेला. गोरा गोरापान नुसता. क्रिकेट खेळताना बॉलच्या मागे धावताना हळूहळू धावायचा. रन्स घेतानापणब जिथे सहज दोन मिळतिल तिथे एकच रन घ्यायचा. त्यामुळे वैतागुन् मी त्याला म्हणायचो, " आबा मेल्या तुझी पावलां काय "सितेची पावलां" आसत? मेल्या जोरात धाव मरे! ( सितेची पावलां - सितेची नाजुक पाउले.)
बाबाजी - लांबनाक्या, याचे नाक लांब होते पण आमच्या सामंत बाई नेहमी म्हणायच्या "मेल्या बाबाजी तुझा नाक काय सुंदर चाफेकळी सारखा आसा! जरा शिरा मार त्याच्यावर!"
योगेश - आजो
गुरुनाथ - गुरग्या
प्रशांत - विठोबा. ( काळा रंग )
राकेश - राकस
अशी मित्रांची दुसरी नावं होती. या नावांत एक मज्जा होती. त्यावेळी फक्त चिडवाचिडवीच होती. कुरघोड्या होत्या. पण यामध्ये एक आपुलकी होती जी आता जाणवतेय.
शाळा संपली आणि मुंबईला आलो. इथेही ज्या चाळीत राहायचो तिथे मोस्ट ऑफ कोकणातलेच होते त्यामुळे इथे ही काही नविन नावं ऐकायला मिळाली. ज्यांच्याकडे राहायला होतो ते माझ्या आईचे काका होते. त्यांचा मुलगा माझा मामा लागायचा पण वयात जास्त फरक नसल्याने मी त्याला त्याच्या प्रचलित नावाने "बन्या" म्हणून हाक मारायचो. त्याची आई त्याला लाडाने 'बाबू" आणि रागाने "भाड्या, भडव्या" म्हणायची. मग चाळीतली पोरं त्याला "ए भाड्या बाबू!" अशी हाक मारायचे. इथे मला एक नवीन मित्र मिळाला. याचं नाव अमर. हा गोविंदाच जबरद्स्त फॅन. त्याच्यामुळे मला पण गोविंदाच्या सिनेमाचा नाद लागला.( गोविंदावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिणार मी हां का. ) त्याला सगळे जण "भाई" म्हणायचे. मी अमरवरुन, अंबर केलं. अंबर वरुन अंबरनाथ केलं. 
मोकळ्या वेळेत तो, मी आणि पप्या म्हणुन एकजण होता. आम्ही तिघे व्हरांड्यात बसुन सगळ्यांची खेचाखेची करायचो. चाळीतल्या एका खोलीत १०-१२ भैय्या राहत होते. त्यातल्या एकाच नाव होतं 'मिठाईलाल.' त्यावेळी 'लगान' चे प्रोमोज टी.व्ही. वर लागायचे त्यात ते गाणं आहे," ओ मितवा, ओ मितवा तुझ को क्या डर हैं रे!" हे गाणं मी आणि भाई नेहमी गुणगुणायचो. एकदा आम्ही बाहेर बसलो होतो आणि काही केल्या ते गाणं आम्हाला आठवेना. अगदी ओठांवर होतं पण शब्दच आठवत नव्हते. आणि का आठवत नाही म्हणून आम्ही दोघे डेस्परेट झालो होतो. ते गाणं आठ्वायचा प्रयत्न करत होतो. 
इतक्यात कुणी तरी ओरडलं, "का हो मिठवा, का करी?"
बस्स्स! मिठवावरुन आम्हाला लगेच आठवलं, "अरे, ते ओ मितवा होतं." आणि आम्ही पोट धरुन हसायला लागलो.
मग नेहमी मिठाईलाल समोर आला की आम्हाला ते गाणं आठ्वायचं आणि आम्ही गायचो," ओ मिठवा, ओ मिठवा तुझ को क्या डर हैं रे !!! "
चाळीतल्या पोरांची नावं बंट्या, पप्या, बबल्या, मामा अशीच होती.  

बालपणी माझी शाळा पहिली, दुसरी आणि चवथी मुंबईत, घाटकोपरला झाली होती. त्यामुळे तिथे असताना काही मित्र जमले होते. दहावी संपवून मुंबईला आलो तेव्हा कधी कधी घाटकोपरला राहायला जायचो. आता घाटकोपरच्या मित्रांची नावं ही बदलली होती.
घाटकोपरला राहायचो तो एरिया 'जागृतिनगर" होता. ही एक झोपडपट्टीच होती पण सगळ्यांची घरं पक्की होती. अगदीच झोपड्या नव्हत्या.
आमच्या घरातल्यामध्ये माझा जो काका लागायचा त्याचं नाव होतं "बाबुराव"; पण हा अतिशय काळा होता म्हणून त्याला सगळे "ए लिक्या" अशी हाक मारयचे. त्यात क्रिकेट तर मस्तच खेळायचा. घाटकोपरच्या त्या एरियात क्रिकेटच्या मॅचेस असल्या की याचा नंबर पहिला असायचा आणि त्याच्या तूफान बॅटींगमुळे आणि काळ्या रंगामुळे काही काळ तो "लारा" म्हणून प्रसिद्ध होता.
माझा लहानपणी शाळेतला मित्र दिनेश आता 'दिन्याभाय' आणि 'च्याय' म्हणून प्रसिद्ध झाला होता.
याच्या छोट्या भावाने डॉक्टर डॉक्टर खेळताना कुणाला तरी खरे खुरे इंजेक्शन टोचले होते तेव्हा पासुन तो 'डॉक्टर' झाला होता.
माझा आतेभाउ सचिनला सगळेजण "बुआ" म्हणायचे. का ते माहीत नाही.
एकाचं नाव "वजडी" होतं. :D 
एक मुलगा, त्याचे मधले दात पडले होते म्हणुन त्याला सगळे "दाता" म्हणायचे.
एका मुलीला सगळेजण "ढेकूण" ही म्हणायचे,
मच्छींद्रला "मच्छ्या"
त्याचबरोबर भुलेस्वर, मदारी, बाप्पल, काळ्या, चिक्या, गोट्या अशी कितीतरी दुसरं नावं असलेले मित्र होते. आणि मला त्यांची खरी नावं ही आठवत नाहीत. त्यांना कधी त्यांच्या ख-या नावाने हाक मारलीच नाही.  

कॉलेजमध्ये असताना, आमच्या क्लासमधला एक मुलगा नेहमी कंप्युटर लॅबमध्ये चिकटलेला असायचा. त्याला सगळे "व्हायरस" / "किडा" म्हणायचे.
भरत पालशेतकर ला सगळे भरत पांडे म्हणायचे मी ही त्याला पांडे म्हणून हाक मारायचो. तो एकदा मला बोलला अरे माझं नाव पांडे नाही रे पालशेतकर आहे. 
एकाचं नाव होतं अजगर! तो वर्गात आला की सगळे जण "फुस्स्स! फुस्स्स! फुस्स!" असा फुत्कार सोडायचे. वर्गात प्रोफेसर असले तरीही.
गिरी ला 'चिरीमीरी' म्हणायचे आणि सगळ्यात वाट माझ्या नावाची लावली होती. मला सगळे दीपक - चिपक म्हणायचे.
आणि वर्गात चिडवण्याचा एक प्रकार होता.एकाने सुरु केलं की एकामागे एक सगळे बोलायचे. जसं चिपक... चिपक... चिपक... चिपक  असं वर्गात घुमायचं. आणि प्रोफेसर शिकवताना चीप वैगरे असा शब्द आला की त्या शब्दाला धरुन चीप्...चीपक ... चपक करायचे. मेल्याहुन मेल्यासारखं व्हायचं. पण नंतर काही वाटायचं नाही. फक्त टीपी आणि मज्जा. 
:D 

जॉबला लागल्यावर अजुन नवीन मित्र आणि त्यांची नवीन नावं. 

तेजसला आम्ही म्हणजे मी, प्रियांका आणि शितल 'बगळ्या' म्हणून हाक मारायचो. शितलच्या घरी पाळलेले कुत्रे होते. आणि स्विटी नावाची जी कुत्री होती तिच्यावर हिचा खूप जीव होता. शितलला कधी कॉल केला आणि जर ती घरी असली तर मागुन कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा. मग तिला आम्ही "भॉ भॉ!" नाव ठेवलं. 

हरप्रीत चंडोक नावाची एक पंजाबन आमची मॅनेजर होती. तिला आम्ही सगळे हरप्रीत बिनडोक म्हणायचो. :D 
बिचारीला काही कळायचं नाही. 

व्हीएसएनएल मध्ये असताना. मी, तेजस, अभिजीत, चंद्राहास, बालाजी, धोंडे, असे सगळे एकाच टीममध्ये होतो. आणि आमच्यात एक ४०-५० तला गृहस्थ होता. त्याची सगळेजण म्हाताऱ्या म्हणून टींगल उडवायचे.
अरे यार ! राम वैद्य हे एक अफलातून कॅरॅक्टर होते. मी जेव्हा Iqiara Telecom मध्ये होतो तेव्हा ओळख झाली. याला सिगरेट्चा खूप नाद होता. दर १५-२० मि. याला सिगरेट लागायची. त्याच्या तब्येतिकडे बघून वाटायचे की हा असाच सिगरेटचा धूर बनून स्वाहा होईल.
मी व्हीएसएनएल मध्ये त्याला घेउन आलो. याला एक वाईट सवय होती आपलं ते पुढे पुढे करायची. एक तर चष्मिस, त्यात एक डोळा थोडा तिरकस होता. डो़क्यावर थोडे बहूत केस होते. शरीर फक्त हाडांचा सापळा आणि हे सगळं असूनही नुसता फूकत राहायचा. एकदा आमच्या एका मॅनेजर ने त्याला सिगरेट फुकताना पाहिलं आणि तो म्हणाला," साले राम! सिगरेट तो ऐसे फूंक रहा हैं जैसे सिगार पी रहा हो!  स्टायल मारना बंद कर ! साले डाकू माणसिंग!" आणि बस्स तेव्हापासुन तो आमच्यासाठी 'डाकू माणसिंग' झाला.

Net4 India मध्ये असताना मी, समीर खान आणि तेजस अशी आमची गट्टी जमली होती. सगळ्यांची मस्करी उडवणे हा आमचा नेहमीचा उद्योग होता. आमच्या ऑफिसमध्ये देवजी नावाचा प्युन होता. तो नेहमी अस्पष्ट आणि अर्धचं बोलायचा. काय बोलायचा ते धड कळायचंच नाही. तेजस सांगायचा "अबे देवजी के अ‍ॅक्सेंटसे तो लगता है की ये अरेबिक बोल रहा हैं." 
त्यात एकदा एक नवीन मुलगी आमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली. तिचं आड नाव होतं चांगे. हिचं नुकतंच लग्न झालं होतं. अगदी केबीसी टाईप होती. ( केबीसी - कमळा, बकुळा, चंपा. इती. पियू मॅडम ) तर ही जेव्हा जॉईन झाली तेव्हा नेहमीप्रमाणे एच.आर.कडुन सगळ्या एम्प्लॉइजना मेल गेलं. संध्याकाळी फावल्या वेळात समीर माझ्या डेस्कवर आला आणि मला विचारु लागला, "अबे यार ये चेंज कौन हैं?"  
मला काही कळलं नाही मी म्हटलं, " कौन चेंज?"
"अबे वो ही! कोई नयी जॉईन हु ई हैं ना 
शिला चेंज!"
"चेंज??? मी परत  ते मेल ओपन केलं आणि वाचु लागलो. आणि वाचता वाचता फुटलोच.
"अबे वो चेंज नही हैं वो चांगे हैं!
 
नंतर तिला आम्ही चेंज अशीच हाक मारायचो. चिडवायला तिला नेहमी विचारायचो, " अगं तुझ्याकडे १०० चे चेंज आहे का?" :D
चंगेजखान, चेंगराचेंगरी, चेक रिपब्लिक, चांगभलं अश्या कित्येक नावांनी तिला चिडवायचो.
 

अशी अजुन कित्ती तरी अनेक नावं, खर्‍या नावांपेक्षा वेगळी. कधी चिडवण्यासाठी, कधी सोयीनुसार शॉर्ट्फॉर्म्स तर कधी असंच प्रेम म्हणून..
माझी एक मैत्रीण मला पहिल्यांदा दिपू म्हणून हाक मारायची. तिला नंतर कळलं की मला सगळेच जण दिपू म्हणतात मग तिने 'दीप' म्हणायला सुरुवात केली. परत तिला कळलं की अजुन कुणीतरी मला दीप म्हणतं मग तिने एक वेगळचं नाव शोधून काढलं आणि माझं पुन्हा बारसं करुन त्या नावाने हाक मारते. 
मी विचारलं तू असं का करते?  तर बोलली तुला ज्या नावाने सगळे हाक मारतात त्या नावाने मी हाक मारणार नाही. "यू आर डीफरन्ट फॉर मी!" 
उगाच मला जरा भाव चढला. असो.  :) 
तर या नावांची ना एक वेगळीच गम्मत असते आपल्या आयुष्यात! खर्‍या नावापेक्षा या दुसर्‍या नावांच एक वलय सतत त्या व्यक्तीभोवती असतं. ते दुसरं नाव त्या व्यक्तिचं एकंदर कॅरॅक्टर डीफाईन करतं असं मला वाटतं. आणि मला अजुनही सवय आहे की माझ्या मित्र-मैत्रीणींना मी काही तरी एखादं वेगळं नाव ठेवतोच आणि हक्काने त्यांना तशी हाक मारतो. इंजिनिअरींगला माझ्यासोबत असलेला एक मित्र नंतर पोलीस खात्यात नोकरीला लागला. त्याला मी 'हवालदार' अशी हाक मारतो. फोनच्या डीरेक्टरीमध्ये ही त्याचं; त्याचंच असं नाही बहुतेक टोपण नावंच सेव्ह असतात.
सपा, साबा, योमु, सेनापती,सुझे, स्नेल अशी नावं माझ्या सेल फोनमध्ये दिसतील. :)

शेक्सपीयर ने म्हटलयं, "नावात काय आहे?"
खरंच नावात काही नाही. जे काही आहे ते सगळं या दुसर्‍या ठेवलेल्या नावात आहे. तेव्हा बघा आठवून तुमच्या भोवती, आजुबाजुला अशा वेगळ्या, विचित्र नावांची यादी सापडते का ते ...
आणि ती यादी सापडली की हळुहळू त्या एका एका नावाच्या आठ्वणी कशा मनात फेर धरुन नाचू लागतात त्या.. :) :) :) 


- दीप्स  

Sunday, February 3, 2013

बालक पालक


बालक पालक
शेवटी काल एकदाचा हा सिनेमा पाहिला. प्रदर्शनाच्या अगोदरपासुनच या सिनेमाची उत्सुकता होती. टी.व्ही., फेसबुक, ट्विटरवर येणार्‍या प्रोमोझ यावरुन तर ही उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. त्यात रवी जाधवचं डिरेक्शन होते त्यामुळे काही तरी वेगळंच असणार यात शंकाच नव्हती. सिनेमाचे रिव्ह्युज पण बेस्ट येत होते. पण चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याबद्दल सगळीकडेच बोलु जाउ लागलं. सगळीकडे हाउसफुल्लचे बोर्ड लटकू लागले.घराघरातं, लहान - मोठ्यांच्या तोंडात बीपी, बीपी ऐकू येउ लागलं. भारतमाता या सिनेमागृहात तर तिकिटांवरुन एकाचा नाहक बळी ही गेला. तर  असा हा बीपी शेवटी पाहिलाच. पण जेव्हा सामान्य प्रेक्षकही एखाद्या सिनेमाविषयी खूप बोलू लागतात तेव्हा या सिनेमात कुठे तरी नक्की गडबड आहे असं मला वाटु लागतं.

चित्रपटगृह तर हाउसफुल्ल होते. सिनेमा सुरु होतो. एक बाप आपल्या ११-१२ वर्षाच्या मुलाला  तो अभ्यास करत नाही आपल्या रुममध्येच बसुन काही तरी करत असतो म्हणून बडवत असतो. त्याला मारता मारता, ओरडता ओरडता त्याला त्या मुलाकडे असलेल्या पॉर्न डिव्हीडीज सापडतात आणि तो स्तब्धच होतो. त्याला कळतच नाही की काय बोलावं ते. तो वैतागतो आणि मुलाला अजुनच मारायला सुरुवात करतो. हा सीन नोट करुन ठेवा.  
मग तो फ्रस्टट्रेट होउन रुममधून बाहेर येतो. त्याची बायको रुमच्या बाहेरच असते. मुलाला असं मारणं तिला अजिबात आवडलेलं नसतं. ती त्याबद्दल त्याला विचारते तेव्हा तो बायकोला त्या डीव्हीडीज दाखवतो आणि आपल्या मुलाच्या पराक्रमाबद्दल सांगतो. तिला पहिल्यांदा विश्वासच बसत नाही. तो खूप वैतागलेला असतो. हे सगळं इतक्या लहान वयात या मुलांना कुठुन मिळतं? यांच्या शाळेतच चौकशी केली पाहिजे.... 

शाळा! शाळा म्हटल्यावर तिला सगळं आठवू लागतं आणि कॅमेरा हळुहळू तिच्या भूतकाळात घेउन जातो आणि आपल्याला ओळख होते चार मुलांची डॉली, अव्या, भाग्या, आणि चिउ.... 

त्यातली डॉली आपल्याला सगळं सांगू लागते. आणि आपण ते ऐकू लागतो. चार मित्र, एकाच चाळीत राहणारे, एकाच वर्गात शिकणारे, एकत्र खेळणारे, एकत्र अभ्यास करणारे. प्रत्येक समस्येचं आपल्या पद्धतीने उत्तर शोधणारे.. एकदा चाळीत काहीतरी होतं आणि त्यांच्या चाळीत राहणार्‍या त्यांच्या ज्योती ताईने शेण खाल्ल्याची वार्ता त्यांच्या कानावर पडते. आता तिने शेण खाल्लं म्हणजे नक्की काय केलं हे यांना कळत नाही. आणि शेण खाल्ल्यामुळे तिला चाळ का सोडावी लागली ते ही कळत नाही. मग ते सगळे शेण खाणं म्हणजे नक्की काय याचं उत्तर शोधु लागतात. पहिल्यांदा शब्दकोशात सापडत नाही म्हणून मग आई वडीलांना विचारतात,पण आईवडील उत्तरादाखल यांच्या कानाखाली जाळ काढतात. मग त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला एक नवीन मित्र त्यांना सापडतो. विशू! किंवा विश्या! हा खूप पोचलेला असतो. शेण खाणं म्हणजे नक्की काय हे त्याला चांगलचं माहिती असतं. मग तो या चौघांना शेण खाण्याच्या थेअरीजची पुस्तकं वाचायला देतो. म्हणजे अ‍ॅडल्ट्स कंटेन्ट असलेली पुस्तकं वाचायला देतो. पुस्तकं वाचुन झालयावर प्रॅक्टीकल्स म्हणजे हे पुस्तकातलं नक्की कसं घडतं हे पाहायचं किंवा ते आवाज ऐकायचे म्हणून रात्री चाळीत सगळे झोपल्यावर ते झाकणी मारतात. पण हा प्रयोग सफल होत नाही. शेवटी विश्या त्यांना त्यावेळी असलेल्या व्हीसीआरचा पर्याय सुचवतो आणि मग ते व्हीसीआर आणुन अव्याच्या घरात पॉर्न मुव्ही बघतात. पुस्तकातलं सगळं काही त्यांच्या समोर घडत असतं. तीन मुलगे आणि दोन मुली. पचायला थोडं जड जातं पण ते सिनेमात अ‍ॅक्सेप्ट करुया कारण त्यांची मैत्री तशी असते आणि सेक्स म्हणजे नक्की काय यातलं त्यांना काहीच माहीत नसतं. जिज्ञासेपोटी ते हे सगळं करतात. जिज्ञासा पुर्ण होते. पण आता एक वेगळाच बदल झालेला असतो. त्यांची नजर बदललेली असते. त्यात डॉलीला हे सगळं पटत नसतं. आपण हे सगळं फक्त शेण खाणं म्हणजे नक्की काय हे जाणुन घेण्यासाठी केलं होतं आणि आपल्याला आता हे कळलेलं आहे त्यामुळे पुन्हा हे नको असं तिचं मत असतं. पण अव्या, भाग्या यांना ते सगळं पुन्हा हवं असतं. चिउची सुद्धा हरकत नसते. त्यामुळे डॉली वैतागून निघून जाते. पुढे अव्या, भाग्या आणि विशू यांचे हे उद्योग सुरुच असतात. त्यात अव्याला चिउबद्दल जवळीक वाटु लागते आणि भाग्याला तिच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या नेहा ताईबद्दल ( सई ताम्हणकर ). यात ही जवळीक हे प्रेम नसुन फक्त शारिरीक आकर्षण आहे हे रवी जाधवांनी त्यांच्या कुशल डिरेक्शनमधून दाखवून दिलयं. आता भाग्यासाठी ती नेहा ताई नसते. तसंच येणार्‍या जाणार्‍या मुलींकडे बघण्याची त्यांची नजरही बदललेली असते. चिउला कळतं की अव्या फक्त तिच्यावर चान्स मारायचा प्रयत्न करतोय मग ती ही त्याच्यापासुन दूर होते. भाग्या एकदा सगळं बळ एकटवून नेहा ला जाउन "आय लव्ह यू" म्हणतो. या सगळ्यामुळे एक विचित्र प्रसंग निर्माण होतो. नेहा चाळीत राहणार्‍या काकांना ( किशोर कदम ) हे सगळं सांगते. काका हे सगळं त्या मुलांच्या पालकांकडे बोलायचा प्रयत्न करतात पण पालकांची मनस्थिती हे सगळं अ‍ॅक्सेप्ट करण्याची नसते. ते मुलांना समजाउन सांगणारे नसतात. हे सगळं करण्याचं मुलांचं वयच नाही आणि जर त्यांनी असं काही केलं तर त्यांना फोडुन काढु अशी त्यांची धारणा असते. मग काका आपल्या परीने मुलांना समजावयचा प्रयत्न करतात.यात नेहा ही मदत करते. मुलं काकाना प्रामाणिकपणे सांगतात की आम्हाला कळत नव्हतं म्हणून आम्ही हे सगळं केलं. काका त्यांना सांगतात की जर कळत नसेल तर आपल्या आई वडीलांशी बोला. त्यांना विचारा. तेच तुमचे खरे मित्र आहेत. मुलांना आपली चूक कळते आणि ते आईवडीलांशी बोलायचा प्रयत्न करतात. पण जमत नाही. फेस टु फेस बोलायची हिम्म्तच नसते. मग शेवटी ते फोनचा वापर करतात. आणि आई वडीलांना फोन करुन हे सगळं विचारतात असं काहीस दाखवून डॉलीची गोष्ट संपते. 



कॅमेरा परत त्या घरात येतो. तो ज्याने आपल्या मुलाला मारलेलं असतं तो हा डॉलीच्या गोष्टीतला अव्या असतो आणि ती डॉली असते. हे उलगडलं आणि सिनेमा निदान माझ्यासाठी तरी घसरलाच. इतका वेळ जे काही आपण डॉलीच्या गोष्टीत बघत होतो, ऐकत होतो ते सगळं शेवटी घसरतं. या लेखाच्या सुरुवातीला मी जिथे लिहिलयं की "हा सीन नोट करुन ठेवा." कारण या सीनचा शेवट इथे होतो आणि चित्रपटाचाही. अव्या आपल्या मुलाकडे पॉर्न डीव्हीडीज सापडले म्हणून वैतागलेला असतो, फ्रस्ट्रेट असतो. पण या पॉर्नमुळे त्याच्या ही बालपणात त्याने काय केले होते. त्यांना कसल्या कसल्या प्रसंगाना सामोरे जावे लागले होते हे तो सपशेल विसरतो आणि आपल्या मुलावर जाळ काढतो. इथेच सिनेमा सपशेल आपटतो. आपण लहानपनी शेण खाणं या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी काय काय केलं होतं आणि त्यामुळे आपले प्रश्न कसे सुटत गेले किंवा आपण ते सोडवण्यासाठी काय काय केलं हे सगळं तो कसं काय विसरतो?? मग दिग्दर्शकाला नक्की काय संगायचयं या सिनेमातुन तेच कळत नाही. कसलंही प्रबोधन हा सिनेमा करत नाही. फक्त आपण काही झालं तरी लैंगिक शिक्षण किंवा सेक्स बद्दल आपली मानसिकता बदलू शकत नाही हेच अधिक स्पष्ट करतो. 

डिरेक्शन उत्तमच आहे यात वादच नाही. प्रत्येक प्रसंग अगदी उत्तम प्रकारे चित्रीत केला गेलाय. संवाद पण अफलातुन आहेत. मग या चित्रपटाच्या यशाचं गुपित कळतं. का हा चित्रपट इतका तूफान चालतोय ते कळतं. खरं तर आजपर्यंत बीपी हा शब्द चारचौघात उच्चारायचा म्हणजे पाप होतं. बीपी - ब्ल्यू फिल्म्स किंवा आमच्या भाषेत भक्त प्रल्हाद किंवा निला अशी सांकेतिक नावं प्रचलित होती आणि ती फक्त मुलांमध्येच सर्रास वापरली जायची. पण या सिनेमाने बीपी हे नाव घराघरात पोचवलं.लहानांपसुन मोठ्यांपर्यंत बीपी, बीपी ओरडू लागले. हे जरी योग्य झालं तरी हवं ते प्रबोधन या सिनेमातुन झालं नाही. किंबहुना ते होतच नाही. 

काय असतं ना आपल्याकडे जर सेक्स या विषयावर कुठे काही पब्लिकली बोललं गेलं किंवा लिंग, योनी, स्तन, उरोज,बूब्ज, पुस्सी, डीक  असे शब्द उच्चारात आले की सगळ्यांना त्यात इंटरेस्ट वाटु लागतो. मग जो तो आपलं ज्ञान पाजळू लागतो. या सिनेमातले संवाद हे ही असेच जवळीक साधणारे आहेत. जसं की "आपला हात जगन्नाथ." वैगरे संवाद हे मुलांचे किंवा पुरुषांचे एकमेकांशी अशा विषयांवर बोलतानाचे वाक्प्रचार आहेत. ते पब्लिकली सगळ्यांसमोर आल्यामुळे त्यातली भीती चेपली गेली. तशात या सिनेमांत दाखवल्याप्रमाणे दोन मुलीसुद्धा या मुलांसोबत या ब्ल्यू फिल्म्स बघत असतात. त्यामुळे कदाचित थोडासा वेगळा प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. कारण लैंगिक शिक्षण हे फक्त मुलांसाठीच नाही आहे हे त्याला स्पष्ट करायचयं. प्रेक्षक बाहेर पडताना चित्रपटाला दाद देत बाहेर पडतो पण चित्रपटाचा नकी गाभा काय होता हे मला तरी कळलं नाही. प्रत्येक सीनला टाळ्या, शिट्ट्या पडतात, कारण ते प्रसंग तसे खरोखर चित्रीत केले गेले आहेत. त्यांचं पुस्तकं चोरुन वाचणं. ब्ल्यू फिल्मस बघता बघता भाग्या आणि अव्याचं हळूच उशी मांडीवर घेणं. नेहाला सायकल चालवताना बघत असताना भाग्याला तिच्या स्तनांचं अस्पष्ट दर्शन घडतं आणि तो सायकलवरुन पडतो. हा प्रसंग सिनेमा बघणार्‍या प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात घडलेला असतो आणि म्हणून टाळ्या पडतात.. सिनेमा फक्त निखळ मनोरंजन करतो. आणि कदाचित दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला हेच हवं असेल. सिनेमाने समाजात लैंगिक शिक्षणाचं प्रबोधन केलंच पाहिजे हा हट्ट बिलकुल नाहीय. पण जे लोक हा सिनेमा प्रबोधन करतोय म्हणून ओरडत आहेत ते चूक आहे.

रवी जाधवने हाच धागा पकडलाय आणि प्रत्येक पुरुषाच्या आणि मुलीच्या आयुष्यात घडलेल्या या नाजुक प्रसंगांच वर्णन पडद्यावर दाखवलं. पण या सिनेमातुन अपेक्षित असणारं बालक आणि पालक यांचं या विषयाचं नातं, किंवा त्यांनी काय बोध घ्यावा, त्यांनी हे विषय कसे हाताळावे हे सांगत नाही. ते अर्ध्यावरच सोडुन देतो. शेवटी डॉली सांगते की आता या मुलांचं जग फार वेगळं आहे. त्यांना त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी सीडीज, डीव्हीडीज, सेल फोन, इंटरनेट ही अनेक माध्यमं उपलब्ध आहेत पण पालकांनी आपणहुन या विषयात पुढाकार घेतला पाहिजे आणि हे विषय हाताळले पाहिजेत असं ठाम मत कुठेही दिसत नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा अव्या आपल्या मुलाला या विषयामुळे मारतो तेव्हाच माझ्यासाठी तरी हा सिनेमा फ्लॉप ठरतो.

कलाकारांच्या बाबती सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. अव्या, भाग्या, चिउ, डॉली यांनी खरोखरच उत्तम एक्सप्रेशन्स दिलेत. विशूचं कॅरॅक्टर पण जबरदस्त जमवून आणलयं. सई ताम्हणकरला सिनेमा क्षेत्रात नक्की काय करायचयं हे तिचं तिला कळलं म्हणजे झालं. असो. 

याच विषयावर हिंदीत "एक छोटीशी लव्ह स्टोरी" नावाचा सिनेमा आला होता. तो धड चालला नाही. "द रिडर" सारख्या सिनेमात एक कोवळ्या मुलाचे एका ३०-३५ वय असलेल्या बाईशी शारिरीक संबंधाचे चित्रिकरण होते. "मलेन" या सिनेमात हा विषय नाही म्हणणार पण एका वयात येणार्‍या मुलाच्या मनातून शारिरीक आकर्षणाचा ठाव दिग्दर्शकाने घेतला होता. 
बीपी या सिनेमाने काय दिलं? मी तर म्हणेन की सेक्स हा विषय चारचौघात चघळण्याची संधी. आपल्या किशोरवयातल्या त्या नुकत्याच उमलेल्या जाणिवा पडद्यावर कुटुंबासमवेत बघायची मोकळीक. पण या विषयावर आपल्या मुलांशी बोलण्याची हिम्मत, जबाबदारी, बिलकुल नाही. ती जबाबदारी दिग्दर्शक सेल फोन, इंटरनेट या माध्यमांवर सोपवून मोकळा होतो.

मी कुणी एखादा चित्रपट विश्लेषक नाही किंवा सिनेमातलं मला फार अगाध ज्ञान आहे असं ही नाही. पण हॉलीवूडमधले किंवा वर्ल्ड सिनेमामधले काही उत्त्म सिनेमे आणि टी.व्ही. सिरीज बघून माझा हिंदी आणि मराठी चित्रपटांविषयीचा दृष्टीकोन बदलला आहे. आणि म्हणून जेव्हा सामान्य प्रेक्षक ही एखाद्या सिनेमाविषयी खूप बोलू लागतात तेव्हा या सिनेमात कुठे तरी नक्की गडबड आहे असं मला वाटु लागतं. 
 
बीपी बघितलाय??? मग पुन्हा बघा ही गडबड ध्यानात येते का ती......



- दीपक परुळेकर  

Sunday, August 26, 2012

रतनगड आणि "टॉर्च"भूत.....

१७ जुलै २०१० मध्ये खर्‍या अर्थाने ट्रेक लाईफची सुरुवात झाली. आमचे सेनापती, रोहन याने या दिवशी पहिला वहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्या ट्रेकला अवघे सहाच जण होतो. पण तेव्हापासुन ट्रेक आणि भटकंतीची चटक लागली. त्या ट्रेकमध्ये रोहन बरोबर सुहास झेले, सागर नेरकर, अनुजा सावे, भारत असे होतो. मग आमची चांगलीच गट्टी जमली आणि ट्रेक्स सुरु झाले. १७ जुलैच्या विसापूरच्या ट्रेक नंतर ऑगस्टमध्ये आम्ही सुधागड ला गेलो. त्या ट्रेकला पण मोजकेच ५ जण होतो. त्यात मी, सुहास आणि अनुजा असे आणि दोन दुसरे मित्र होते. सुधागडचा ट्रेक झाला आणि मग  १५ ऑगस्टला रायगडस्वारी करुन आलो. रायगडनंतर त्याच महिन्यात २२ तारीखला सफाळ्याचा तांदुळवाडी किल्ला फत्ते केला.इथे देवेंद्र चुरीशी मैत्री झाली. याच ट्रेकला अनुजाने सांगितलं की सप्टें.मध्ये VAC (Vasai Adventure Club)  ने रतनगडचा ट्रेक आयोजित केलाय. मग त्या ट्रेकसाठी मी आणि देव्याने तिला तिथेच कन्फरमेशन दिलं आणि नंतर सुहास पण यायला तयार झाला. झालं! तिने आमच्या सीट्स बुक करुन  ठेवल्या.  ३ सप्टें. ते  ५ सप्टें असा ट्रेक होता. म्हणजे ३ तारखेला रात्री वसईहुन निघायचे, दुसर्‍या दिवशी सकाळी रतनवाडीला पोचायचे, ट्रेक करायचा. ती रात्र तिथेच हॉल्ट आणि मग रविवारी बॅक टू होम. असं प्लॅनिंग होतं. 

ठरल्याप्रमाणे मी शुक्रवारी ऑफिसमधुन संध्याकाळी निघालो. मिटींग पॉईंट होता वसई. पण मग मला स्लिपिंग बॅग हवी होती म्हणून अनुजाच्या मैत्रिणीच्या घरी विरारला जावं लागलं. देव्या मला वसईलाच भेटला. त्याला घेउन मी विरारला ममताच्या घरी गेलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते आणि ती बिचारी बॅग देण्यासाठी जागीच होती. तिच्याकडुन बॅग घेतली आणि आम्ही परत वसईला आलो. तिथे सुहासही भेटला. आमच्या आधीच तिथे वॅकची ट्रेकर्स मंडळी जमली होती. अनुजा लेट आली आणि मग सगळे आम्ही गाडीत आपापली जागा धरुन बसलो. साडे बाराला आमची गाडी सुटली आणि आम्ही इगतपुरीच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रचंड पाउस होता.मी माझा आयपॉड कानाला लटकवला आणि गाणी ऐकतच झोपी गेलो.मध्ये केव्हातरी जाग आली तेव्हा गाडी थांबली होती. आणि पाण्याचा खूप मोठा आवाज येत होता. काय झाले ते कळले नाही. परत गाडी सुरु झाली आणि मी झोपी गेलो. सुझे ने मला जेव्हा उठवल तेव्हा मला कळलं की आम्ही रतनवाडीला पोचलोय.

रतनगडला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिक हायवेने इगतपुरीला पोचल्यावर, इगतपुरीच्या पुढेच १-२ किमीवरला पहिला राईट घेउन घोटीच्या दिशेने वळायचं. घोटीवरुन पुढे शेंडी, भंडारधरा वैगरे करत रतनवाडीला पोचायचं. रतनवाडी हे रतनगडाच्या पायथ्याशी असलेलं गावं आहे. यापूर्वी मी काही मित्रांसोबत रतनवाडीला अमृतेश्वराला जाउन आलो होतो. म्हणजे पिकनिक ला आलो होतो. 

पहाटे सगळे उठले. तिथल्याच एका स्थानिक हाटेलात मस्त पोहे आणि चहाचा नाश्ता झाला. ओळख परेड झाली. या ट्रेक ला सगळे मिळून किमान १५-२० जण तरी होतो.मी पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या ग्रुपबरोबर ट्रेकला आलेलो. त्यात नशीब सोबत सुझे, देचु आणि अनुजा होती त्यामुळे बोर व्हायचा प्रश्न नव्हता. तर ओळख परेड झाली आणि आमचे ट्रेक लिडर श्री. बंधू यांच्यामागुन आम्ही सगळे रतनगडाच्या वाटेने चालु लागलो. सोबत गाईडही होता. प्रवरा नदीच्या काठाने, शेतातुन चालत होतो आणि एका ठीकाणी नदी पार करावी लागली तेव्हा मला सुधागडची आठवण झाली. सुधागडला आम्हाला  दोन वेळा नदी क्रॉस करावी लागली होती. मानाने प्रवरे हे पात्र फार मोठं नव्हतं कारण तिचा उगम इथल्याच कुठल्यातरी डोंगरातुन होत होता. तरीही कंबरभर पाण्यातुन एकमेकांच्या हातात हात गुंफुन आम्ही प्रवरा पार केली आणि चालु लागलो. 

प्रवरेच्या प्रवाहातून
रतनगडला जायचं असेल तर सोबत एखादा तरी गाईड असावाच कारण खूप घनदाट जंगल आहे आणि पावसाळ्यात तर ते अजुनच डेन्स होउन जातं. जागोजागी मार्किंग्ज असल्या तरी वाट चुकायची शक्यता खूप जास्त आहे आणि त्यात नाही म्हटलं तरी दोन - तीन तासांची चढाई आहेच.

आम्ही सगळे गाणी गात,एकमेकांची मस्करी करत चालु लागलो. मी, देव्या आणि सुझे एकत्र गप्पा मारत चाललो होतो. अनुजा त्या बाकीच्याबरोबर कूठे गायबली होती. तशातच भयंकर पाउस सुरु झाला. तासभरात आम्ही एका छोट्या पठारावर आलो तिथे थोडावेळ ब्रेक घेतला. गोळ्या, बिस्किटं वैगरेचं वाटप झालं. अजुन तासाभराची वाट बाकी होती. ब्रेकनंतर पुन्हा चढाई सुरु केली आणि एका ठीकाणी आलो. तिथे मग कुणी तरी माहीती दिली की या वाटेवरुन चालत दुसऱ्याबाजुने  हरिशचंद्रगडावर जाता येतं. ट्रेकच्या जगात माझा नुकताच जन्म झाला असल्याने, हरिश्चंद्रगड, कात्राबाईची खिंड,कोकणकडा वैगरे शब्द मला नविनच होते. मग तिथुन पुन्हा चालु लागलो. 

ब्रेक टाईम
पाउस थोडावेळ थांबला. आणि मग तासाभराने आम्ही रतनगडाच्या पहिल्या शिडीपाशी येउन पोचलो. तेव्हा धो धो पाउस पडत होता. धुकं तर इतकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्या शिडीची हालत तर भयानक होती. प्रचंड वाहणार्‍या  वार्‍याच्य वेगात ती शिडी लटपटत होती. "अजुन अशा ३ शिड्या पार करुन वर जायचयं" हे कुणाला तरी बोलताना ऐकलं आणि माझ्या पोटातच गोळा आला. एक तर मला हाईटचा फोबिया होता. म्हणजे चढताना काही वाटत नाही पण त्याच वाटेवरुन उतरताना मात्र माझी जाम टरकते.  सगळेजण ती शिडी सहज पार करुन जात होते आणि मी मात्र घाबरत होतो. कशीबशी ती शिडी मी पार केली. आणि वर पोचलो. पाउस तर तुफान बरसत होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. थोडं चालुन गेल्यावर अजुन एक शिडी! 

पहीली शिडी
 हे राम!  ही शिडी तर पहिल्या शिडीपेक्षा खतरी होती. आणि वार्‍याने प्रचंड हालत होती. मी कसाबसा चढु लागलो. शिडी पार केली आणि किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी येउन पोचलो. पण दरवाज्यापर्यंत पोचणं माझ्यासाठी तितकसं सोप्पं नव्हतं. शिडी पार केल्यानंतर एक निमुळती वाट होती जी पावसाने आधीच निसरडी झाली होती आणि आताही पाउस पडतच होता. धरायला आजुबाजुला भक्कम आधार नव्हता. वर जे अगोदर पोचले होते त्यांनी एक रोप टाकली होती. ती रोप पकडुन आणि माझं वजन सांभाळत कसाबसा मी चढलो. एक दोन ठीकाणी घसरलोच पण सावरलं. हा ट्रेक जाम थ्रीलिंग होता माझ्यासाठी. मुख्य दरवाज्यातुन कसाबसा आत शिरलो आणि सुटकेचा नि:श्वास टाकला.  


गडाचा मुख्य दरवाजा
तिथुन मग पुढे गडावरल्या मुख्य गुहेत सगळेजण जमलो आणि जे काही पब्लिक खादाडीवर तुटुन पडले की विचारायला नको. ज्याच्याजवळ जे जे होतं ते सगळं बाहेर आलं आणि पुढला २०-२५ मि. आम्ही फक्त खातच होतो.खादाडी संपल्यावर आम्ही गड फिरायला गेलो पण कसंल काय! पाउस इतका प्रचंड होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. 


दुपारचा लंच :)
 गड फिरुन झाला आणि आम्ही परतीच्या वाटेवर. आता मला धडकी भरली कारण त्या वाटेवरुन उतरताना जराशी जरी चूक झाली तर माझा कडेलोटच होता. मी कसाबसा सावरुन,बसुन उतरु लागलो. मुख्य दरवाजा रोपच्या सहाय्याने उतरुन पहिल्या शिडीपाशी आलो. ती शिडी उतरलो आणि त्या निसरड्या वाटेवरुन सावरत दुसर्‍या शिडीपाशी आलो. ती शिडीसुद्धा उतरलो आणि माझा जीव भांड्यात पडला. गडावरुन खाली उतरताना अक्षरशः ढगातुन उतरत असल्याचा भास होत होता. खाली आलो आणि एक दगडावर निवांत बसलो कारण बाकीचे सुद्धा लँड व्ह्यायचे होते. सगळे उतरत होते. आणि जेव्हा अनुजा त्या शिडीवरुन, धुक्यातुन उतरु लागली तेव्हा खाली असलेल्या पोरांनी एका सुरात गायला सुरु केली. "अप्सरा आली"  हे हे हे ! 

 मग सगळे सुखरुप लँड झाले. मला कधी एकदा खाली पोचतो असं झालं होतं. भराभरा उतरायला सुरु केली आणि ४ च्या दरम्यान आम्ही पुन्हा अमृतेश्वराच्या मंदीरापाशी जिथे गाडी पार्क केली होती तिथे आलो. एक रात्र आणि दुसर्‍या दिवशीही अंघोळ न केल्याने मला फारच अस्वस्थ वाटत होतं. दिवसभर ट्रेकमध्ये पावसाने धुवुन काढलं होतं पण तरीही... मग मी सुझे आणि देव्या प्रवरेच्या काठावर जाउन बसलो. प्रवरेचा तो प्रवाह बघुन मला राहवेना. मी मस्त अंघोळ करायला सुरुवात केली ते बघुन सगळेजण मला ह्सायला लागले. ट्रेकला कुणी अंघोळ करतं का? असं चिडवू लागले. पण जेव्हा अंघोळ केली तेव्हा मला फर फ्रेश वाटायला लागला. सगळा शीण निघुन गेला. मग फोटोसेशन करुन आम्ही बसजवळ आलो. बाहेर पाउस असल्याने बसमध्येच टीपी करु लागलो. इतक्यात साडे सहा-सात च्या दरम्यान अनुजा जेवायला बोलवयला आली. सात वाजता जेवायला? मग गावातच जेवणाची ऑर्डर दिली होती तिथे जेवायला गेलो. व्हेज जेवणाचा बेत मस्त होता जेवण झालं आणि आम्ही परत बसकडे परतलो. पहिल्यांदा सगळ्यांनी मंदीराच्या धर्मशाळेत झोपायचं असं ठरलं होतं पण मग आम्ही ७-८ जणांनी बसमध्येच झोपायचं ठरवलं. तसं पण दिवसभारात सगळ्यांची मैत्री झालीच होती मग टगेगिरी करायला म्हणुन आम्ही बसमध्येच झोपायचं ठरवलं. बाहेर पाउस धो धो पडत होता.......  

रात्रीचा डीनर :)
पण इतक्या लवकर झोप कुणाला येणार होती?.. वॅकची सगळी मुलं एकमेकांची जाम खेचत होते. त्यात एकाला बिचार्‍याला टार्गेट केलं होतं. म्हणजे इतकं की त्याने चुकून हुं जरी केलं तरी त्यावर जोक व्ह्यायचे. आणि त्या गाडीत आम्ही मोठमोठ्यान खिदळत ह्सत होतो.

बाहेरचा पाउस, सोसाट्याचा वारा, पिपळाचं झाड, मंदीराची पुष्करणी, प्रवरेचा खळखळणार्‍या प्रवाहाचा आवाज आणि आजुबाजुचं गुढ जंगलं. आमच्या बसमधल्या सगळ्या गप्पा हॉरर गप्पांकडे न वळत्या तर कमालच होती. हळूहळू गप्पा हॉरर विषयाकडे वळत होत्या आणि अचानक कुणाला तरी दूरवर मंदीराच्या दिशेने एक टॉर्च दिसली. आम्ही सगळे ती टॉर्च निरखू लागलो. आमच्या बसपासुन १५-२० मीटरवर ती टॉर्च पुढेपुढे सरगकत होती. कुणी तरी गावकरी असेल म्हणुन आम्ही दुर्लक्ष्य केलं आणि पुन्हा आमच्या गप्पांकडे वळलो. पाउस कधी जोरात पडायचा तर कधी थांबायचा. कधी सोसाट्याचा वारा यायचा त्यामुळे बाहेरच्या पिंपळाची सळसळ तर अजुनच भयानक वाट होती त्यात त्या पोरांच्या गावाकडल्या भुतांच्या गोष्टी! वातावरण काय हॉरर झाले असेल याची कल्पना करा.
 

गप्पा मारता मारता आम्ही थांबलो कारण ती टॉर्च पुन्हा दिसली. एवढ्या रात्री कोण फिरत असेल? काही कळत नव्हतं.त्यात आता ती टॉर्च कधी सुर व्ह्यायची तर कधी बंद व्ह्यायची. मी  बसमध्ये एका खिडकीपाशी बसलो होतो. देव्या माझ्यापुढच्या सीटवर बसला होता. आता आम्ही गप्पा बंद केल्या आणि त्या टॉर्चच्या हालचालींकडे लक्ष्य देउ लागलो. एखादा गावकरी किंवा धर्मशाळेत झोपायला गेलेल्यांपैकी कुणीतरी आम्ही काय करतोय हे बघायला तर आला नसेल अशी शंका आली. पण मग तो इतक्या लांब काय करतो? आणि टॉर्च सारखी चालु-बंद का करतो हेच कळत नव्हते.सगळेजण श्वास रोखुन त्या टॉर्चकडे बघत होतो. टॉर्च बंद झाला आणि अचानक त्या टॉर्चचा झोत सरळ देव्याच्या खिडकीवर पडला आणि आमची तंतरली. देव्या झटकन खाली वाकला आणि सगळेजण परत आपापल्या जागेवर जाउन बसले. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलं पण आमच्यातला कुणीही खाली जायची हिम्मत करत नव्हता. शेवटी आम्ही गप्प झोपायचं ठरवलं. काय असेल कुणास ठाउक? काही वेळाने टॉर्च बन्द झाली आणि आम्ही गप्प बसलो. ५-१० मीनिटांनी कुणाला तरी ती टॉर्च गाडीच्या समोर दिसली. कुणीतरी समोरुन गाडीवर टॉर्चचा प्रकाश फेकला होता. कोण आहे ते दिसत नव्हतं आम्ही सगळे चिडीचूप! फक्त बघत होतो की आता काय होईल. मी शास रोखुन धरले होते. अचानक ती टॉर्च आमच्या  दिशेने  येवू लागली आणि मी घाबरलो. सगळेजण गप्प राहिले. टॉर्च वेगात गाडीच्यासमोरुन आली आणि आमच्याबाजुने खिडकीवर प्रकाश टाकत झर्रकन निघुन पण गेली आम्ही मागेवळून पाहिलं तर ती बंद पण झाली आणि कुठे गायब झाली काय कळलं नाही.. इतकावेळा संथ चालणारी ती टॉर्च आता क्षणात आमच्या गाडीच्या बाजुने कशी काय गेली ते अजुनही कळलं नाही. तो कुणी गावकरी होता की आमच्याच ग्रुपमधला अजुन कुणी हे अजुनही समजलं नाही.. पण जे काही घडलं ते प्रचंड होतं....

बसमधली हॉरर टीम :)
बाहेर सोसाट्याच्या वार्‍याबरोबर पाउस कोसळू लागला आणि आम्ही सगळे झोपी गेलो. रात्री मध्येच ऊठलो तेव्हा आमच्या गाडीचा ड्रायवर मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याला रात्री उंदीर चावला म्हणुन तो ओरडत होता. पहाटे सुझेने उठवलं. मग मी,सुझे आणि देव्या "वाघ मारायला" निघुन गेलो. सगळ आटोपल्यावर परतिच्या प्रवासाला लागलो. वाटे भंडारधर्‍याच्या स्पिलगेटवर गाडी थांबवली तेव्हा समोरचं द्दृश्य अप्रतिम होतं. भंडारधर्‍याच्या जलाशयातुन सगळं पाणी बाहेर रस्त्यावरुन वाहत होतं. पाण्याचा प्रवाह ही जबरी होता. तिथे फोटोसेशन झाल्यावर मग रंधा फॉलच्या दिशेने गेलो. रंधा फॉल झाला आणि मग माळशेजमार्गे मुंबईच्या वाटेला लागलो.

ग्रुप फोटु
ट्रेक भारी झाला होता. पण पावसात गडावर धड काही बघायलाच नाही मिळालं. त्यामुळे पुन्हा हिवाळ्यात हा ट्रेक करायचं असं मी, देव्या आणि सुझेने ठरवून टाकलं. प्रत्येक ट्रेक आणि निसर्ग नेहमीच आपल्याला नविन काही तरी शिकवत असतो. या ट्रेक ने अजुन काही नवीन भटके मित्र दिले. आणि हो ती न विसरता येणारी टॉर्च भूताची रात्रे ही....

- दीप्स
  

Wednesday, August 8, 2012

मृत्युंजय....

        पुस्तक वाचन हा माझा छंद नाही.. पण कधी कधी एखादं अनोळखी, अपरिचित व्यक्तिमत्व जसं आपल्याला एखाद्या अनामिक बंधानं खेचतं तसं काहीसं माझं आणि पुस्तकांचं नातं आहे असं मला वाटत राहातं. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातुन गावीच झालं. त्यावेळी लहान असताना आम्ही वेंगुर्ल्याच्या एस्.टी. स्टँडवर असलेल्या पुस्तकाच्या दुकानातून दोन-दोन रुपड्यांची गोष्टींची पुस्तकं वाचत असू. एकदा मामा वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयातून "ययाति" घेऊन आला. ते जाडजूड पुस्तक, कसल्याशा कादंबरी प्रकारातलं होतं. मामा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते वाचायचा.पण मी कधी त्या पुस्तकाच्या वाटेला जाणार नव्हतो. किंबहुना ते पुस्तक मोठ्यांसाठी असेल अशी माझी धारणा होती. कारण आम्ही लहान मुलं एवढी जाडजुड पुस्तकं कधी वाचत नसू. पण जेव्हा - जेव्हा ते पुस्तक मला घरात दिसे तेव्हा तेव्हा त्या पुस्तकावरला तो शुभ्र घोडा मला त्याच्याकडे खेचायचा प्रयत्न करी. "ययाति" ही तीन अक्षरं मला कोणत्या तरी अनामिक बंधाने स्वःताकडे बोलावित्.शेवटी एकदाचं ते पुस्तक मी हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. आणि असा काही त्या पुस्तकात गुंतलो की मला दुसरं तिसरं काहीच सुचेना. त्यावेळी मी सहावी-सातवीत असेन, पण त्या पुस्तकाने माझ्यावर अशी काही मोहीनी घातली की मी;असो. 
"जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही." हे वाक्य त्यादिवसापासून मी कधीच विसरलो नाही आणि कदापि विसरू  ही शकणार नाही.. 

         आणि त्यादिवसापासून वि.स्.खांडेकरांचा मी भक्त झालो.  मग मामाकरवी मी त्यांची बाकीची पुस्तकं ही वाचून काढली..पण मिळेल ते कोणतेही पुस्तकं मी वाचतं नव्हतो आणि आज ही नाही वाचत याचं सर्वात मोठं कारण माझी आळशी वृत्ती हेच आहे... अशा वृत्तीमुळेच मी अनेक चांगल्या पुस्तकांना मुकलोय.. पण काही पुस्तकं आज ही मला खुणावत राहतात.. विश्वास पाटलांचं "पानिपत" ही मला असंच स्वःताकडे ओढतं होतं..ते वाचून झालं पण पानिपताचा तपशिलवार इतिहास जाणून घेण्यासाठी मग शेजवलकरांचं "पानिपत १७६१" वाचून काढलं तेव्हा कुठे समाधान झालं. काही लोकांच्या केवळ दुराग्रहांमुळे, इतिहासानं ही ज्यांची उपेक्षा केली असे "छत्रपति संभाजी महाराज" यांचं व्यक्तिमत्व ही मला असंच खुणावू लागलं आणि मी त्यांना ही शरण गेलो. अखिल मानवजातिला शांतिचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्धांचं जीवन चरित्र आणि व्यक्तिमत्व मला अगदी लहानपणापासूनच त्यांच्याजवळ खेचत होतं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक "बुद्ध आणि त्याचा धम्म" या बुद्ध धम्माचा धर्मग्रंथाने तर आयुष्यातल्या किती तरी प्रश्नांची उत्तरं मिळाली..

                 पण या सर्वात, महान कर्ण कुठे तरी मला साद घालत होता. दहावित असताना अचानक "मृत्युंजय" माझ्या  हाती लागलं पण अभ्यासाच्या नावापुढे ते मला वाचता नाही आलं आणि तेव्हापासुन माझी आळशी वृत्तीमुळे असेल मला हे पुस्तक वाचण्याचा योग आला नाही. मागल्या महिन्यात आम्ही काही मित्र नाटकासाठी म्हणुन दादरच्या शिवाजी मंदीरला गेलो होतो. नाटक सुरु व्ह्यायला अजुन वेळ होता म्हणून आम्ही शिवाजी मंदिराच्या तळमजल्यावर असलेल्या मॅजेस्टीक ग्रंथ दालनात गेलो. क्षणात माझी नजर तिथे ठेवलेल्या "मृत्युंजय" वर पडली. गेली कित्येक वर्षे मला खुणावणारं हे पुस्तक आज मी घ्यायचं ठरवलं. त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरील तो धनुर्धर, वीर कर्ण जणू मला खुणावत होता. 

                आठवड्यापूर्वी पुस्तक वाचायला घेतलं आणि आज संपवलं ही.आज पुस्तक संपवताना शेवटच्या क्षणी अक्षरशः डोळ्यातून अश्रु पाझरले. घसा सुकला होता. ट्रेनमध्ये बसून डबडबलेल्या डोळ्यांनी मी एका महान वीराचा अंत वाचत होतो आणि तो ही भगवान श्रीकॄष्णाच्या मुखातून. जन्माच्या क्षणापासून नाळही न कापता जी उपेक्षा या महान वीराच्या नशिबात आली ती त्याच्या शेवटच्या काळापर्यंत तशीच राहीली. 

कर्ण!
सूतपुत्र कर्ण!
सुर्यभक्त कर्ण ! 
वीर धनुर्धर कर्ण !
अंगराज कर्ण!
दानवीर कर्ण !  

                  पुस्तकाच्या पहिल्या शब्दापासुन ते शेवटच्या शब्दापर्यंत कर्णाने माझं आयुष्य क्षणात व्यापून टाकलं. फक्त कर्णच नव्हे तर त्या पुस्तकात असलेल्या इतर अनेक व्यक्तिरेखांनी मला असंच भाळून टाकलं. पण शेवटी मनात राहिला तो कर्णच. यापूर्वी मी कर्णावर आधारीत कोणतं ही पुस्तक वाचलं नव्हतं कारण मृत्युंजय म्हणजेच कर्ण असं मी  माझ्या बर्‍याच वाचक मित्रांकडून ऐकत आलो होतो. महाभारतात आणि अनेक चर्चांमध्ये मी कर्णाबद्दल ऐकलं होतं. पण का माहित का जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की काही व्यक्तिमत्वं आपल्याला एका अनोळखी बंधातून आपल्याकडे आकर्षित करत राहतात त्यापैकी भगवान गौतम बुद्ध; छत्रपति शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण यांच्यानंतर कर्णाचं स्थान माझ्या आयुष्यात अढळ आहे.

                 खरं तर महाभारतातली ही अनेक पात्रं म्हणजे मनुष्याच्या प्रवृत्तीचं एक दर्शन आहे. जणु महर्षी व्यासांनी अखिल मानवजातीचं भवितव्यच महाभारतातून लिहून ठेवलं होतं.. प्रत्येक पात्राची एक विशिष्ट वृत्ती, एक विशिष गुण; पण कर्ण हा प्रत्येक संभ्रमित, शापित व्यक्तिचा मूळ पुरुष असावा.पुस्तक वाचताना नकळत आपण कर्णाच्या त्या प्रवासात सामिल होतो. या प्रवासाचा अन्त काय होणार ते आपल्याला ठाउक असतं पण महत्त्वाची गोष्ट महणजे या प्रवासात त्या महान वीरासोबत आपण सुद्धा आपला शोध घ्यायला लागतो. त्याच्या प्रत्येक कृतितून, त्याच्या आदर्शातून, त्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीत आपण आपल्याला कुठेतरी शोधत राहतो.

आपल्या माता-पित्यांची सेवा करणारा कर्ण!
त्याच्या धाकटया भावाचा (शोण) आदर्श असलेला कर्ण! 
आपल्या जन्मजात कुंडलं आणि अभेद्य शरीर कवचाबद्दल नेहमी संभ्रमात असलेला कर्ण! 
एका अनामिक ओढीनं सुर्याची नित्यनेमानं आराधना करणारा कर्ण! 
हस्तिनापूरात गुरु द्रोणानी गुरुत्व नाकारताच त्याक्षणी सुर्याला अखेरपर्यंत गुरु मानणारा कर्ण! 
स्पर्धेत द्रोणांच्या अर्जुनप्रेमामुळं अजिंक्यत्वाचा मान हिरावलेला पण त्याहीपेक्षा पांडवांनी सूतपुत्र म्हणून केलेल्या निर्भत्सनेने मनाने जळून गेलेला कर्ण ! 
दुर्योधनाने त्याक्षणी त्याला अंगदेशाचा राजा म्हणून केलेला राज्याभिषेक आणि त्याच क्षणापासून दुर्योधनाची अखरेपर्यंत साथ देणारा कर्ण! 
वृषालीसारख्या सुंदर सारथीकन्येच्या प्रेमात पडलेला आणि तिच्याशी विवाह करुन तिच्यावर निरंतर प्रेम करणारा कर्ण! 
भर सभेत द्रौपदीने "सूतपुत्र" म्हणून ज्याची अवहेलना केली आणि ती अवहेलना गिळून गप्प बसणारा कर्ण!
संपूर्ण भारतवर्षात दिग्विजय संपादन करणारा पराक्रमी, वीर कर्ण! 

               अशी कर्णाची अनेक रुपं या प्रवासात आपल्या समोर येतिल आणि मग वाचता वाचता त्याच्यासारखीच झालेली आपल्या मनाची घालमेल.कुठे संपणार ? ठाउक नसतं.... 
अनेक भावनिक संघर्षात गुरफटलेला तरीही आपल्या सामर्थ्यावर आणि शब्दावर बद्ध असलेला कर्ण आपल्याला जवळचा वाटू लागतो. 
              "प्रत्येंचेशिवाय धनुष्य नाही आणि भावनेशिवाय मनुष्य नाही" असं सांगणार्‍या कर्णाच्या त्या अभेद्य कवचामागे एक भावसंपन्न, प्रेमळ झरा नेहमी खळाळत असल्याची ग्वाही देत राहतो.कारण माझ्यासारखा प्रत्येक भावनिक आणि संवेदनशील माणूस त्याच्या जीवनात स्वःताचा शोध घेत राहतो. त्याच्या आयुष्यातलया प्रत्येक कटू प्रसंगात स्व:ताचं दु:ख शोधत राहतो. माणसाला त्याच्यासारखाच समदु:खी माणूस भेटला की आनंद होतोच,नाही का? त्याच्या आयुष्यातलया अनेक कोड्यांची उलगड करताना त्याच्या मनाची स्थिती आपल्या मनाचा कुठेतरी ठाव घेतेच..अखेरच्या श्वासापर्यंत सूतपुत्र म्हणून हीणवलेला गेलेला हा वीर अखेरपर्यंत आपल्या शब्दालाच जागला..

            मृत्युंजयकार श्री.शिवाजी सावंतांनी कर्णाच्या आयुष्यावर ही महान कादंबरी लिहून एक प्रकारे त्याचे संभ्रमित आणि गुढ जीवन सुर्यतेजाने झळाळून सोडले. नाहीतर कदाचित आपल्यालाही त्याच्यासारखेच अनेक प्रश्न पडले असते आणि आपण ही त्यावर धड विचार करु शकलो नसतो. सुर्यपुत्र असूनही त्याच्यावर अखेरच्या क्षणापर्यंत अन्याय झाला. हा अन्याय कोणी केला? कुंतीने कौमार्यात जी चूक केली ती तिला महाभारताच्या शेवटच्या युद्धात उमगली. फक्त आपल्या पाच पुत्रांना अभय मिळावं म्हणून ती कर्णाकडे गेली. स्वार्थ हा मनुष्याला सर्व काही विसरायला लावतो. कर्णाला तो तिचाच पुत्र आहे याची जाणिव करुन देताना तिने त्याला हस्तिनापूरचे राज्य, सुंदर द्रौपदी या सर्वांचं आमिष दाखवायचा प्रयत्न केला पण कर्ण बधला नाही. जेव्हा तिचे स्वःताला क्षत्रिय म्हणवून घेणारे पुत्र कर्णाचा सूतपुत्र म्हणून अपमान करत होते तेव्हाही कुंतीने कधी हस्तक्षेप केला नाही. याची कारणं, तिची त्यावेळची मनसिक स्थिती,भविष्य आणि वर्तमानाच्या चक्रात अडकलेल्या कुंतीच्या मनाचं यथार्थ वर्णन सावंतांनी केलं आहे. पण मी तरी या सर्वासाठी फक्त कुन्तिलाच जबाबदार धरेन. ज्या धैर्याने तिने राजा कुंतिभोजाचं राज्य सांभाळलं, ज्या धैर्याने ती हस्तिनापूरची महाराणी झाली, ज्या धैर्याने तिने आपल्या पतीच्या श्रापासाठी आपलं जीवन अरण्यात व्यतित केलं. पतिच्या झालेल्या निधनानंतर ज्या धैर्याने तिने पाचही पुत्रांना घेउन हस्तिनापूरची वाट धरली. त्या कुंतिने थोडं तरी धैर्य कर्णासाठी दाखवायला हवं होतं. सार्‍या जगाला माहित होतं की पांडव हे महाराज पंडूचे पुत्र नसून कुंतिने दुर्वास ऋषींच्या मंत्रातून त्यांना जन्मास घातलं होते. कुंतिला ही याची जाण होती पण तरीही राजकिय दृष्टीकोनातुन असेल; ती कर्णासाठी कधीही पुढे आली नाही..

              या सर्वात मला वृषालीची फार दया येते.अखेरच्या क्षणापर्यंत तिने कर्णावर निरपेक्ष प्रेम केलं.मोठ्या कर्तबगारीने कर्णासारख्या पुरुषाला प्रेमाने सावरलं. ती खर्‍या अर्थानं कर्णाची अर्धांगिनी होती.दुर्योधनाने जरी स्वःताच्या स्वार्थासाठी कर्णाला जवळ केलं होतं आणि कर्ण हे जाणुन होता तरीही कर्णाने त्याची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. जर त्या स्पर्धेच्या दिवशी दुर्योधनाने कर्णाला जवळ केलं नसतं तर कदाचित पुढे कर्णाचं काय झालं असतं काय माहीत? अश्वत्थामासारखा विचारवंत आणि हुशार मित्र कर्णाला लाभला म्हणून काही अंशी का असेना कर्णाने आपल्या आयुष्याचा निर्धार पक्का केला होता. कर्ण जितका कणखर, अजिंक्य धनुर्धर, पराक्रमी, तितकाच भावनिक होता. सुर्य आणि गंगामातेवर असलेली त्याची अनामिक निस्सिम भक्ति त्याच्या आयुष्याचा एक भागच होती. अधिररथ आणि राधामाता हेच आपले खरे आईवडील हे त्याने अखेरपर्यन्त मानले आणि मनोभावे त्यांची सेवा केली. कौंतेय असूनही त्याने स्वःताला 'राधेय' मानण्यातच त्याने धन्यता मानली..

               कादंबरीच्या शेवटच्या भागात श्रीकृष्ण कर्णाबद्दलची आत्मियता व्यक्त करतो. कर्णाच्या जन्माचं आणि कवच कुंडलांचं रहस्य माहिती असलेल्यांपैकी तो एक होता. त्यानेच कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य कथन केलं. तू सूतपुत्र नाहीस तर सुर्यपुत्र आहेस असं याची जाणिव करुन दिली.वेगवेगळी आमिषं दाखवुन कर्णाला पांडवांस मिळण्यास गळ घातली हे जाणुनही की कर्ण ते कधीच मान्य करणार नाही. त्यात श्रीकृष्ण सांगतो की, महाभारताचं युद्ध मी पेटवलं, का?? 
फक्त दुर्योधन, भिष्म, द्रोण, धृतराष्ट्र अशा काही जणांना धडा शिकवण्यासाठी? 
द्रौपदीच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी? 
पदच्युत, पथभ्रष्ट झालेल्या कर्णाला मार्गस्थ करण्यासाठी? 
नाही!!तर माझ्यापुढे प्रश्न होता अखिल मानवजातीचा! प्रश्न होता चिरंतन सत्याचा!

              पण श्रीकृष्णा! तुझ्या या चिरंतन सत्याच्या? यज्ञात कर्णाची आहुति पडायला नको हवी होती.हा जो तू मानवजातीच्या कल्याणासाठी? मांडलेला यज्ञ होता त्याच्या पूर्णत्वासाठी तू कोणाला निवडलं होतंस? पांडवांना???? 

              कसलं सत्य आणि कुणाचं सत्य? जे सत्य जाणण्यासाठी कर्ण आयुष्यभर फक्त सुर्याकडे हताशपणे बघत राहिला त्याचं सत्य ही तू केव्हा सांगितलंस जेव्हा तुला त्याची गरज होती. कर्णाच्या आहुतिने तुझ्या तथाकथित सत्याचा यज्ञ पुर्णत्वास गेला असा जर तुझा समज असेल तर जरा आजच्या या युगात एक नजर फिरवं असे अनेक अभागी कर्ण तुला जागोजागी दिसुन येतिल.....    

- दीप्स

Sunday, August 5, 2012

If You Are Lonely When You Are Alone.....


If you are lonely when you are alone, you are in bad company...
 
एकाकीपणा, Loneliness  हा मनुष्याचा एक सर्वात मोठा शत्रु आहे. हा असा शत्रू आहे की तो कधी कधी स्वःताचाच घात करतो. प्रत्येक मनुष्य कधी ना कधी या एकाकीपणाचा शिकार होतोच. अशावेळी आपल्याल काहीच सुचत नाही. कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. म्युझिक, मुव्हीज आपली आवडती जागा किंबहुना आपली अतिशय आवडती व्यक्तीही ही अशावेळी आपल्याला नकोशी वाटते. मग अशावेळी तुम्ही काय करता? मी काय करायचो हे मला ठाउक नव्हतं पण त्यादिवशी एक चांगला उपाय सापडला..

दोन-चार महिन्यांपूर्वी भोपाळला कंपनीच्या कामानिमित्त गेलो होतो. भोपाळपासुन ८० कि.मी.वर असलेल्या सुजानपूर या एका गावात  एका  क्लायंटकडे जायचं होतं आणि तिकडलं काम झाल्यावर पुढे रतलामला अजुन एक क्लायंट होता. सुजानपूरमधलं काम त्याच दिवशी आटोपलं आणि रतलामला जाण्यासाठी सुजानपूर स्टेशनवर येवून ट्रेनची वाट बघत बसलो होतो. ट्रेनला यायला अजुन ३ तास होते. आता हे ३ तास कसे घालवायचे याच विचारात होतो. त्यात मी माझा लॅपटॉप पण सोबत आणला नव्हता त्यामुळे तर अजुनच कंठाळा येवू लागला. नशीब सोबत ब्लॅकबेरी फोन होता. त्यामुळे फेसबुक आणि ट्वीटरवर थोडा टीपी सुरुच होता. काही तरी लिहावं म्हणून नोटबुक काढलं पण काही केल्या एक शब्द ही सुचेना. उगाच मग एखादं नाव गिरवू लागलो; पण मनासारखं होतं नव्हतं. 

मे चा शेवटचा आठवडा होता. संध्याकाळच्या वेळी आभाळ विविध रंगांनी भरुन गेलं होतं. कुठून तरी काळे ढग पश्चिमेकडे जमा होत होते. आज कदाचित पाउस हजेरी लावेल असं मनोमन वाटत होतं. त्यात वारा ही अगदी सूसाट सुटला होता. पण नेहमीप्रमाणे ही संध्याकाळ मला खायला उठली होती. मी हे सगळं जाणून बुजुन टाळत होतो कारण ती संध्याकाळ पुन्हा एखादी अशीच आठवण उकरुन काढणार होती आणि त्या अनोळखी प्रदेशात तर मला ते नकोच होतं. कसाबसा मी मनाला सावरत होतो आणि इतक्यात ट्रेन आली. सुजानपूर ते रतलाम अजुन ४-५ तासांचा प्रवास होता. सुदैवाने एक विंडोसीट मिळाली आणि मी निर्धास्त झालो. ट्रेन सुटली तरी पश्चिमेकडलं ते आभाळ काही मला सोडत नव्हतं.सुर्य तर केव्हाचा मावळला होता पण ती संध्याकाळ अजुनही क्षितिजावर रेंगाळत होती. 
कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता आणि पुन्हा त्या संध्याकाळच्या क्षितिजावर आठवणींच एक-एक पान उलगडू लागलं. खूप एकाकी वाटू लागलं. मी डोळे मिटून घेतले आणि खिडकीवर डोकं टेकवलं. असं वाटू लागलं की आता या क्षणी कुणीतरी सोबत असावं आणि मी भराभर मनातलं बोलुन दाखवावं. त्यात माझ्या बाजुला एक गुज्जू फेमेली होती आणि त्यांचं अविरत चरणं आणि बोलण्याचा रवंथ सुरुच होता. एक अनामिक असा प्रचंड तणाव मनावर येवू लागला. रतलाम यायला अजुन बराच वेळ होता. मनातल्या आणि आजुबाजूच्या गोंधळामुळे तर झोप येण्याचा ही चान्स नव्हता. म्हणून मग शेवटी वैतागुन फोन घेतला आणि गाणी ऐकू लागलो. त्यात फोनचा मिडीया प्लेयर शफल मोडवर होता आणि तो ही नको ती दु:खी गाणी ऐकवू लागला. 
"कसे सरतिल सये" हे गाणं वाजवायची त्या फोनला काय गरज होती? :डःड असो. 

मी डोळे मिटून गाणी ऐकू लागलो. इंग्रजीत एक म्हण आहे ना कि,"Whenever you have any problem just sing a song, then you will realize that your voice is a lot more worse than your problem.." :D:D:D
 हे आठवून मग मी माझ्या आवाजात कधी काळी रेकॉर्ड केलेली दोन तीन गाणी ऐकली पण तरीही समधान होईना. अस्वस्थता गाण्याच्या रुपानेही सारखी घंघावत होती. आज मला कुणाशी तरी बोलायचं होतं. बरचं काही बोलायचं होतं.जे कधी कुणाला सांगितलं नव्हतं ते आज सांगायचं होतं. केव्हाचं मनात गाडुन ठेवलेलं एक-एक पान आज वाचायचं होतं. पण कुणाशी बोलणार? कुणाला सांगणार? काही व्यथा आपण नाही सांगू शकत कुणाला. काही दु:खं ही आपली आपल्यालाच पचवावी लागतात. अनघा नेहमी म्हणते की, "आपणच आपलं टीकाकार व्हायला हवं आणि त्याचप्रमाणे आपणच आपला स्व:ताचा एक चांगला मित्र ही व्हायला हवं." पण आज मला खरोखर कुणीतरी समोर हवं होतं. ज्याला मनातलं सारं काही सांगून टाकायचं होतं. काय करावं या विचारात असतानाच एक आयडीया सुचली. 

फोनचा म्युझिक प्लेयर बंद केला. 

ब्लॅकबेरीचं नेटवर्क रिमुव्ह केलं त्यामुळे आता कुणाचेही कॉल्स येणार नव्हते आणि मला डीस्टर्ब होणार नव्हता. 
हॅन्ड्स फ्री डीव्हाईस कानाला अडकवलं; ब्लॅकबेरीमधे हल्लीच इन्स्टॉल्ड केलेलं व्हॉईस रेकॉर्डर अ‍ॅप्लिकेशन ऑन केलं आणि बोलायला सुरुवात केली...... 

"हाय! आज मला तुला काही सांगायचं आहे.खूप दिवस तुझ्याशी बोलायचं होतं पण या ना त्या कारणाने राहुनच गेलं. खरं तर मी मुद्दामच तुला ते सांगितलं नाही आणि कदाचित तुला कधी सांगणारच नव्हतो पण आज राहवत नाहीय..." 


अशाप्रकारे बोलत राहिलो. किती तरी वेळ. जणु मी कुणाशी तरी फोनवर बोलतोय या अविर्भावात असल्याने आणि त्यात मी मराठीत तर कधी इंगिशमध्ये बोलत असल्याने आजुबाजूच्या लोकांचा काही त्रास होत नव्ह्ता. 

किती तरी वेळ मी बोलत होतो. बाहेरचा काळोख आता अधिकच गहिरा होत होता. आणि त्या काळोखाबरोबर एक एक आठवण ओठांवर येत होती. क्षणोक्षणी फार हलकं वाटत होतं. आज पहिल्यांदाच मी स्वःताशी इतका वेळ बोलत होतो. आज स्वःताला कुठून तरी शोधून आणलं होतं आणि माझ्यासमोर बसवून स्व:तालाच सगळं काही सांगत होतो. 

कधी त्या मजेशीर, खोडकर आठवणी सांगताना मोठ्याने हासत होतो तर कधी एखाद्या कटु आठ्वणी सांगताना आवाज खोलवर जात होता. 
कधी पाकळीवरल्या दवासारख्या जपलेल्या त्या आठवणी सांगताना शब्द संथ होत होते तर कधी उसळलेल्या लाटांसारखे माझे शब्द काही आठवणींचा मारा करत होते. 

भरभरुन मी स्व:ताशी बोलत होतो आणि नेहमीसारखं बोलताना माझे श्वास फुलत होते. एका विशिष्ट लयीत ट्रेन केव्हाची धावत होती आणि त्या ट्रेनचा आवाज नकळत माझ्या रेकॉर्डींगला बॅकग्राउंड स्कोर देण्याचा काम करत होता. आता बरंच काही मी बोललो होतो. खिडकीतून बाहेर पाहिलं तर दूर कुठे तरी अधुन-मधुन विजा चमकत होत्या.. रतलाम यायला अजुन एक तास बाकी होता. मी बोलणं आवरतं घेत होतो आणि बाहेरुन मृद्गंध दरवळू लागला. माझं मन पावसासाठी अधिर झालं आणि त्या मृद्गंधासरशी अजुन काही आठवणी ओठांवर तरळू लागल्या. पण मी स्वःताला आवरत घेतलं कारण मला ठाउक होतं की आता पावसाच्या सरी येतिल आणि जर पाउस आलाच तर मग त्या पावसाच्या आठवणी मला रोखता आल्या नसत्या. 

"आज खूप बोललो तुझ्याशी. मला ठाउक आहे  की तुला जाम पकायला झालं असेल, नाही...? But really thanks to listen to me..   आज खूप बरं वाटतयं. खूप हलकं वाटतयं.. थँक्स अगेन" 


असं बोलून मी माझं रेकॉर्डींग थांबवलं. तब्बल १ तास ५१ मि. मी बोललो होतो. खूप बरं वाटत होतं. फोनची बॅटरीही ड्रेन व्ह्यायला आली होती. रात्री साडे नउला रतलामला पोहचलो. बराच शोधा-शोध केल्यावर एक चांगलं हॉटेल सापडलं.( मायला ते हॉटेल डीसेंट नाही सापडलं कुठे :डःडः) खूप थकलो होतो आणि भूक ही लागली होती. रुमवर बॅग टाकली आणि बाहेर जेवायला गेलो. जेउन आलो. शॉवर घेतला आणि बेडवर पहुडलो. मघाशी रेकॉर्ड केलेली माझी बडबड ऐकावी म्हणुन फोन ऑन केला आणि ते ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळलंच नाही.
रात्री कसलसं स्वप्न पडलं होतं. पहाटे ते मी आठवू लागलो पण काहीच आठवेना. 


आता मला हल्ली असंच कधी भरुन आलं की मी हा उपाय वापरतो. लिहिण्यापेक्षा हे सोप्पं वाटतं. लिहिताना खूप विचार करावा लागतो.
शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. त्यात काही पर्सनल लिहायला गेलो तर कुणाच्या भावना दु़खावणार तर नाहीत ना याचीही काळजी घ्यावी लागते.त्यापेक्षा हे बरं वाटतं. कधी असं भरुन आलं ना की स्व:ताशीच असं बोलावं. आणि जेव्हा  स्वःताशीही काहीच बोलायला नसेल तेव्हा त्या रेकॉर्डींग्ज पुन्हा पुन्हा ऐकाव्यात. फार बरं वाटतं. माहीतीय??गाण्यापेक्षा आपला आवाज इथे फार सुन्दर लागतो. प्रत्येक सूर भावनेच्या तालावर अगदी चपखल बसतो. आणि हो बोलताना नेहमी जे मनात आहे ते स्पष्ट बोलावं. कसलीही तमा, भीती न बाळगता. 

असं
म्हणतात की स्व:ताशी बडबड करणारे वेडे असतात. पण खरं सांगतो हा वेडेपणा करुन बघा मनावरलं एखादं अनामिक ओझं कमी होतं......

- दीप्स