Thursday, January 12, 2012

सायंकाळी एके वेळी...

गजबजलेला दिवस सरताना आणि निद्रेची रात्र पांघरताना, या दोन्ही वेळेंना जोडणारी एक प्रसन्न संध्याकाळ मला नेहमीच हवी हवीशी वाटते. आज बर्‍याच दिवसांनी अशी एक संध्याकाळ आली. बरं, आली तर ती एकटी थोडीच येणार होती. मागल्या सार्‍या संध्याकाळच्या आठवणी सोबत घेउन आली. घराच्या बाजुला असलेल्या रेल्वे ट्रॅकवरुन एक ट्रेन मोठ्याने हॉर्न देत धडधडत निघून गेली. वेगळं काही नाही. या ट्रॅकवरुन अशा अनेक ट्रेन्स दिवस रात्र धडधडत ये-जा करत असतात. पण आजच्या या संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर ही ट्रेनही माझ्या आठवणी धडधडत घेउन आल्यागत वाटतेयं. समोरच्याच झाडावर दाटीवाटीने जमलेले पक्षी. स्थलांतर करुन आलेले. दिवसभरच्या प्रवासाने थकलेले, दमलेले. त्यांच्या त्या किलबिल आवाजातही माझ्या अशाच दडलेल्या आठवणी. आणि पश्चिमेकडे मावळणारे ते सोनेरी आकाश. अक्षरशः सोनेरी! जाताना सूर्याने दिवसभर गोळा केलेले सोने सायंकाळी क्षितिजावर फेकून गेलाय.. लूटा! ज्यांच्या नशिबात आहे त्यांनी ते लूटा! पण मला फक्त लूटायच्या आहेत त्या सोनेरी आठवणी.

आयुष्यातली महत्त्वाची स्थित्यंतरे या अशा संध्यासमयीच माझ्या मनाच्या क्षितिजावर दाटीवाटीने जमा होतात. मग सुरु होतो आठवणीचा पाठ्शिवणीचा खेळ. त्या सोनेरी क्षितिजाच्या रेषेवर उलगडत जातं एक एक पान. शक्य नसतं, सगळ्या आठवणी एका संध्येला वाहून देणं आणि अशी संध्याकाळ पुन्हा पुन्हा येणं हे ही आजच्या गजबजत्या आयुष्यात कठीण होउन राहयलयं. मग जश्या आठवणी त्या संधीप्रकाशात उजळत जातिल तश्या त्या चेहर्‍यावर खुलत जातिल. कधी किंचीत स्मित, कधी गालांवर स्वार झालेले ओठ, कधी खोल गेलेले डोळे, तर कधी हसणारे डोळे तर कधी ओलावलेल्या पापण्या.... 
आठवणी चेहर्‍याच्या तर्‍हाच बदलून टाकतात नै! आणि संध्याकाळ ही ती केवढी? अगदीच लहान.. जेमतेम डोळ्यांत भरुन वाहुन जाईल इतकीच... 

संध्याकाळ जीवघेणी असते. उजेड आणि काळोख यांचा मध्य साधणारी ही संध्याकाळ ह्रद्यात खोलवर रुतत जाते. मग कधी अश्याच जेवाघेण्या संध्यासमयी फराझच्या डोळ्यातुन हे शब्द पाझरले असतिल...

हुई है शाम तो आँखों में बस गया फिर तू
कहाँ गया है मेरे शहर के मुसाफ़िर तू .....
  

शब्दांची माळ गुंफत, असेच शायर, कवी या उद्विग्न संध्याकाळी निरंतर फिरत असतात...
मी सुद्धा असाच मग या संध्येच्या प्रवासाचा एक यात्रिक होउ पाहतो. माझ्या जोडीला असते माझी उध्वस्त कविता आणि संध्येला वाहीलेले डोळे. मी ही शोध घेत राह्तो त्या हरवलेल्या नजरेचा. माझ्या उध्वस्त कवितेला कधी तुझ्या अस्तित्वाची छाया जरी मिळाली तरी मग ती कविता फूलु लागेल. विखुरलेल्या शब्दांना एक लिरीकल आयाम मिळू लागेल. तुझ्या डोळ्यातून पाझरणारे संध्येचे शब्द माझ्या ओठांनी टीपून घेईन, तुझा एखादा असाच कधीचा चोरटा स्पर्श माझ्या अंगावरुन शहारुन जाईल आणि मग माझी ही एक कविता अशीच तयार होईल...  

अशीच एक संध्याकाळ
माझ्या मनात साचलेली.
तुझ्या स्पर्शाची आठवण
पापणीआड दाटलेली...

तुझ्या या अशा चोरट्या स्पर्शाच्या आठवणीत मला लोटुन माहीत नाही ही संध्याकाळ आता मला कुठे घेउन जाईल. माझ्या क्षितिजावरली संध्याकाळ तुझ्या क्षितिजावर ही उमटेल का? कधी पुन्हा जर अशीच एखादी संध्याकाळ जर मिळाली ना तर मग मी तुला साद देईन, मनात सारे आकाश भरुन माझ्या क्षितिजाच्या रेषेवर निघून ये. उरात असलेले सारे कोंडलेले, गुदमरलेले श्वास माझ्या मिठीत रिते कर...निघून ये डोळ्यांत भरुन सार्‍या दु:खांचा पाउस आणि करुन टाक चिंब मला... ये घेउन तुझं ते घायाळ ह्रद्य !!

खायला उठलेल्या जगापासून, सर्वकाही सोडून एक कोकरु हळूच, धडधडते, कोवळे ह्रद्य एका सिंहाच्या हवाली करते,ते ही अशाच संधीप्रकाशात! आणि तो सिंह ही त्या कोकराच्या किलकिलत्या डोळ्यांत पाहुन अस्पष्टपणे उच्चारतो,
"And, so the Lion fell in love with Lamb..!"
आणि या त्याच्या वक्तव्यावर ते कोकरु स्वःताच्या वेडेपणावर हासत बोलते, 
"What a stupid Lamb!"
आणि मग त्या संधीप्रकाशात दोघेही विलिन होउन जातात. प्रेमाचा हा वेडेपणाही अशाच एका संध्येला भरात येतो.  त्याच्या आठवणीत उद्विग्न, झालेलं कोकरु मग त्या सांजगारव्यात गाउ लागतं...
   

I'hv died everyday waiting for you,
Darling don't be afraid I've loved you,
For a thousand years,
I'll love you for a thousand more years...
 

Saturday, December 31, 2011

असंच... काहीसं...

यावर्षातली ही शेवटची पोस्ट माझ्या आवडत्या जागी म्हणजेच सीसीडीमध्ये, माझी आवडती एसप्रेसो घेत  लिहितोय. माहित नाही पुर्ण करेन की नाही. हे लिहिण्याचं व्यसन सुरु ठेवलंच पाहिजे, कॉफीचं कमी केलं पाहिजे -;)

काही तरी लिहावं ही खूप दिवसापासूनची इच्छा.. बरेच दिवस ब्लॉगवर काहीच लिहिलं नाही., काही सुचतच नव्हतं. शब्द जसे दूर मला एकट्याला कुठेतरी सोडून गेल्यासारखे. परके झालेले. अनेकदा लिहायचा प्रयत्न केला,पण कधी अपूर्ण तर कधी खोडून टाकलं. हे नेहमी असंच होत राहीलं. पारिजात, नक्षत्र, कॉफी, पाउस, वारा, ढग, फुलपाखरं, हे माझे नेहमीचे शब्दही मला सोडून गेल्यासारखे, इतके दूर की एक ओळ ही सुचत नाही. माणसं सोडून गेल्याच्या दु:खापेक्षा माणसं तोडल्याचं शल्य नेहमी मनात रुतत गेलं. 
"दर्द का हद से गुजरना है , दवा हो जाना" हे गालिबचे शब्द अगदी माझ्या आत्म्यात भिनलेले. मग कधी कधी हा ही विचार मनात की; "तू ने भी तो तोडे है दिल अपनोंके, दर्द सिर्फ तेरा ही हमराज नहीं"

हे असं झालं ना की मन पिळवटून निघतं. चांगलं -वाईट, चूक - बरोबर, आयुष्यातले हे आलेख कधी व्यवस्थित बसतच नाहीत. हे सगळं एकदा व्यवस्थित केलं पाहिजे. हा सगळा अट्टाहास फक्त अस्तित्त्वाचा नाही तर अस्मितेचा आहे. पण स्व:ताची अस्मिता जपताना दुसर्‍याच्या अस्मितेला आणि अस्तित्त्वाला जराही धक्का लागता कामा नये याची खबरदारी मला घेतलीच पाहिजे.

जहाजे येतात जहाजे जातात
किनारा नेहमी स्तब्ध असतो
प्रत्येक भरकटलेल्या जहाजाला
आशेचा तो एक शब्द असतो...

कधीतरी या चार ओळी लिहिल्या होत्या, आणि आता त्या जाणवू लागल्या. मग मी जहाज की किनारा या संभ्रमात हेलकावे खात. पण मग जाणवू लागलं की हे दोन्ही रोल मला पार पाडायचेत. कधी स्तब्ध, शांत किनारा होउन भरकटलेल्या जहाजाला मला आश्रय द्यायचाय, तर कधी एखाद्या जहाजासारखं महासागरात हरवलेल्या दिशा शोधत भरकटायचयं. किनारा आणि जहाज यांचा निकटचा संबध. दोघेही एकमेकांना आसुसलेले. पण जहाजाच जन्मच मुळी महासागरात विहार करण्यासाठी झालेला, किनारा त्या जहाजाला थांबवू शकत नाही. हे किनार्‍याला समजायला हवं... मग काय ?काही नाही...

व्हावं कधी जहाज आणि धुंडाळाव्या नव्या दिशा.. तसंच
होउन कधी निश्चल किनारा द्यावी  जहाजास आशा....

माझ्या सर्व ब्लॉगवाचकांना आणि ब्लॉगर्स मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या खूप सार्‍या
शुभेच्छा....

आपलाच
दीपक, दीप्स, दिप्या .... :)


Thursday, October 6, 2011

स्वप्नफुले !




अशी त्या पठारावर रंगीत चादर पसरलेली असते. मैलो न मैल, इवल्याश्या,अगणित फुलांची चादर! पिवळी, पांढरी, जांभळी, गुलाबी आणि ना ना तर्‍हेची फुलं.कधी स्वप्नातही अशी फुले पाहिली नसतिल. जेमतेम फुट्भर गवताच्या काडीच्या शेंड्यावर अगदी तोर्‍यात, वार्‍यावर डोलणारी ती फुले! अगदी स्वप्नवत! म्हणून स्वप्नफुले ! 



वर निळेगार आकाश आणि जिथे क्षितिजापर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार कॅनव्हासवर वेगवेगळ्या रंगाचे शिंतोडे उडवावेत तशी ती फुलं. सुर्य जरी तळपत असला, तरी त्याच्या उन्हाचे चटके भासत नाहीत. वार्‍याची गार झुळूक कुठून तरी अलगद शरीरावरुन वाहत जाते. देहभान, भूक तहान सारं काही विसरायला लावतात ती फुलं. विसरू देत नाहीत फक्त तुझा चेहरा! त्या माळरानावर त्या फुलांच्या प्रदेशात तू सोबत असाविस असं वाटत राहतं.पठारावरल्या मळक्या पायवाटेवर पावलं पडू लागतात.  हळूहळू फुलांना जपत पावलं एका अनामिक ओढीने खेचली जातात. कुठुन बरं हे सौंदर्य इथे फुललं असेल हा प्रश्न पावलो पावली पडत राहतो. मग राहवत नाही. एका ठिकाणी काही फुलं अशी दाटीवाटीने उभी असलेली दिसतात. पावलं थबकतात. मन अलगद झुकतं.पहिल्यांदा त्या फुलांना डोळ्यात भरुन घेतो. डोळे आणि मन दोन्ही भरत नाहीत.


मग कॅमेरा आपोआप समोर येतो. फ्रेम मध्ये त्या फुलांचं सौंदर्य मावत नाही. फुलं ही कशी एखाद्या सुंदर मॉडेलसारखी पोझमध्ये असतात. हासरी-लाजरी फुलं. वारा ही त्यांच्यावरुन अलगद वाहून त्यांना शहारुन   सोडतो.फ्रेम सेट असते. सारे प्राण डोळ्यात आणून ते सौंदर्य टीपून घेण्याचा प्रयत्न!




आता फक्त क्लिक करायचं असतं. हात थरथरु लागतो. पण अचानक ती फ्रेम अपूर्ण वाटते. काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागतं. मी कॅम चेक करतो आणि पुन्हा डोळ्यासमोर धरतो. छे ! नाही ! खरंच ही फ्रेम अपूर्ण आहे. त्या फुलांचं सौंदर्य किती ही मोहक असेल पण माझ्या उत्फुल्ल पारिजातकाची सर त्यांना येत नाहीच ! मनात चटकन तुझा विचार येतो. वाटतं आता या क्षणी तू समोर असतिस तर! 





आता तर फ्रेम मधली ती फुलं मला डिवचाताहेत असं वाटू लागतं. माझ्या मनात काय चाललंय हे त्यांना कळलं बहूतेक. माझं ना नेहमी असंच होतं. किती ठरवलं की काही बोलायचं नाही तरी डोळे मनातलं सगळं काही बोलुन जातात. 


असो. मी पुन्हा कॅमेरा समोर धरतो. पण आता ती फ्रेममधली फुलं थोडी अल्लड झालीत. देवयानीसमोर शर्मिष्ठेच्या सौंदर्याची तारीफ केल्यावर जे भाव देवयानीच्या चेहर्‍यावर आले असतिल तेच भाव मला त्या फुलांच्या नाजूक पाकळ्यांवर उमटलेले दिसताहेत. आता मला त्या फुलांची समजूत काढायची आहे. मी कॅम पुन्हा सरसावून त्या सगळ्यां रंगीत फुलांना टीपून घेउ लागतो. पटापट! वेगवेगळ्या कोनातून. अगदी त्या फुलांच्या पाकळ्यांना स्पर्शून मी त्या फुलांना टीपत राहतो आणि दूर कुठे तरी माझी साधीभोळी शर्मिष्ठा मनात पारिजात भरुन  गालातल्या गालत हासत,  माझ्या मनाची होणारी तारांबळ पाहत माझ्या मनाच्या क्षितिजावर पहुडलेली असते.......



Thursday, July 21, 2011

जिंदगी ना मिलेगी दोबारा ! ( Zindagi na Milegi Dobara )




It is all about your LIFE ! 

It is what about your friends, your dreams, and about those things which you always wanted to do but you couldn’t do just because you couldn’t spare a time from your busy life.

It’s all about UNDERSTANDING relationships. It’s about; you wanted to say sorry to your loved one but you are going to be forgiven if and only if that SORRY comes straight from your heart.

It’s all about PLANNING of your life!
What do you think that at what age you are going to get retired from your work?
at the age of 40? 50???
Who knows my friend whether that number is going to come in your life or not! 
So just live this moment which you are having  right now and live it at fullest. 
Come out from the box and feel the sky. A man should be in the box only after his death!  



It’s all about FINDING the answers of some bitter questions of your life which are hidden deep under the sea and you have to dive into the deep sea to find it.

It’s all about FEELING love which is in the air!
You have to jump from the plane from the height of 15000 feet! 
Some of us are crazy about it.
some of us are careful about it and some of us are damn scared about it. 
But to feel it you have to jump mate! And once you are floating there in the sky, just close your eyes, feel it, live it, enjoy it and land with the pride that you have just touched the sky. :)

It’s all about LIVING each moment of your life like it’s a last moment of your life.  
The death is chasing you in the form of number of deadly bulls. You are in the narrow lane, bulls are running behind you. If they catch you they will crush you. You have to run faster than them to live. And not just to live but to do the things which you wanted to do if you are going to be alive!
Don’t think what you’ll be missing if you’ll be dead but just have a faith on yourself, run faster and live the life to do those things more beautifully!  

It’s all about REALIZATION!
Realizing damn LIFE my friend! cause you are  never going to get it again! :) 


Saturday, June 11, 2011

सख्ख्या मैत्रीणीचं पत्र

प्रिय दीपक.,
तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! -:)
आज पहिल्यांदाच तुला पत्र लिहितेय. तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडुन ही एक भेटच समज ना. तसं पण माझ्याकडे आहे काय द्यायला तुला?
वाटलं तुझा वाढदिवस आहे तर जरा वेगळ्या पद्धतिने तुला विश करुया, सही ना?

बरेच दिवस मनात ठरवलं होतं की तुझ्यशी बोलायचं पण तू आजकाल इतका व्यस्त असतोस की..मग म्हटलं जाउ दे तुला पत्रच लिहुया..
त्यात आपण गेले कित्येक दिवस मनमोकळेपणाने बोललोच नाही..म्हणजे फक्त तू बोलत असतोस, माझं काम फक्त ऐकणं...
आज तुझा वाढदिवस ! मग व्हेअर इज द पार्टी मॅन! आज काय प्लॅन आहे? काही असो तू नंतर सांगशीलच म्हणा..

आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणजे तुझ्याबद्दलच बोलायचं आहे. किती वर्षे झाली रे आपण एकमेकांना ओळखतोय? लक्ष्यात नाहीए आता.
आठवतं ज्यादिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो किती भराभरा बोलत होतास तू! सगळं काही एका दमात सांगून संपवायची तुझी घाई.
लहानपणाच्या तुझ्या खोडी, घरातल्यांचा मार, शाळेतल्या गमतिजमति. शाळेतली ती तुझी मैत्रीण जिला सायकलवरुन तिच्या घरी सोडलं होतं. किशोरवयातलं पहिलं - वहिलं प्रेम!
मग ती दिवसातुन एकदा तरी दिसावी म्हणून तिच्या घरासमोरुन दिवसभर सायकलवरुन मारलेल्या चकरा.सहलीच्यावेळी तिला दिलेलं गुलाब... सारं काही भराभरा सांगत होतास आणि
मी शांतपणे ऐकत होते.
एक गोष्ट नोट केलिय का? बोलताना तुझे डोळे विलक्षण चमकतात. श्वास नेहमी फुलतात. प्रचंड अधिरता असते तुला एखादी गोष्ट सांगून संपवेपर्यंत.
कधी गमति जमति सांगताना तुझं ते खळाळून हसणं तर कधी आयुष्यातले कटु आठवणी सांगताना खोल गेलेला तुझा आवाज आणि निस्तेज डोळे!  सारं काही मी साठवून ठेवलयं, बंद करुन ठेवलयं कुठेतरी!

कॉलेजमध्ये असताना, तिने तुझ्या वाढदिवसादिवशी तुझ्यासाठी माँजिनीजमधून एक केक आणला होता, गिफ्ट म्हणून एक सुंदर  ग्रीटींग कार्ड आणि एक छोट्या बाहुलिचा स्टॅच्यु, तिचं रूप म्हणून ! किती खूश झाला होतास ना तू त्यादिवशी. तू सांगितलंस मला, "It was a first time in my life I cut a cake and got a gift on my birthday! Seems it is my first birthday ! Rather than a card she is the most beautiful gift i ever had!"
त्यावेळचे तुझ्या डोळ्यातले ते थेंब मला अजुनही आठवतात.. तुझ्या आयुष्यातले ते सगळ्यात हॅपनिंग डेज! जेव्हा तिच्याबरोबर तू आकाशाला गवसणी घालू पाहत होतास. तिच्या प्रत्येक भेटीनंतर मला सगळं काही सांगणं. या ना त्या
कारणाने ह्जारदा तिचं नावं कोरुन कोरुन सांगणं. मला ते सगळं आवडायचं. एखाद्या गोष्टीत  मनापासुन  गुंतुन जाणं मी खुपदा अनुभवलयं तुझ्याकडून आणि तुझं गुंतणं ही तसचं सहजा सहजी न सुटणारं! आजही तू तसाच आहेस! 
असो!

बरेच दिवस झाले आपण समुद्रावर गेलो नाही. वाळूत लोळलो नाही, किनार्‍यावर निजून मावळणारा सुर्य पाहिला नाही, संधीप्रकाशातली तुझी गाणी ऐकली नाहीत, अंधार पडल्यावर गार वारा अंगावर झेलत आकाशातले तारे मोजले नाहीत. बरंच काही मिस्ड करतोय ना आपण. 
परत जाउया एकदा. पुन्हा ते हरवलेलं विश्व शोधायला. मावळणारा सुर्य समुद्रात बुडेपर्यंत डोळे भरुन पाहताना मला तुला पाहायचयं आणि त्या खार्‍या वार्‍यासोबतची तुझी गाणी ऐकायची आहेत.

गेले काही दिवस तू शांत होतास. तू शांत असलास की मला फार भीती वाटते. तुझ्या आयुष्यातली बरीच वादळं अशीच शांतपणे तुला उध्वस्त करून गेल्याचं मी पाहिलयं, म्हणून रे! आणखि काही नाही. त्यात माझ्याशिवाय तू दुसर्‍या कुणाला काही सांगत नाहीस. नेहमी सगळं स्वःतामध्ये गाडून ठेवण्याची तुझी वृत्ती! गेली काही वर्षे तर तू चक्क माझ्याशीही अबोला धरुन होतास. तू फक्त मला समोर ठेवून बघत राहायचास. काही बोलायचा नाहीस. तुझ्या डोळ्यांतून ते सारं दिसायचं . तुझं गप्प राहणं मला नेहमी टोचायचं. तुला असं शांत पाहिलं ना की मला कसं तरीच व्हायचं. समुद्र नेहमी उधाणलेलाच छान दिसतो. तुझी अस्वस्थता मला ठावुक आहे. तुझ्या कविता, तुझे शब्दच बोलतात सारं काही. 

तुझ्या मनाचा ठावं घेणं कधी
जमणार नाही मला. नेहमीच चंचल! हसवता हसवता कधी रडवून जाशील ते नाही सांगता येणार. तसं पण हसवण्यापेक्षा रडवणं चांगलचं जमतं तुला. कितीही वादळातून उध्वस्त झालास तरी पुन्हा पुन्हा नव्या वादळात एकट्याने जाण्याची तुझी नशा! किनारे तुटले तरी पुन्हा ते बांधून काढण्याचा तुझा हव्यास!  हे सगळं कुणाच्या प्राक्तनातून सुटलं नाही रे! तू एकटाच याला अपवाद नाहीस; प्रत्येकाला अशा  प्रसंगातून जावंच लागतं. जे तुला स्विकारतिल जे तुला नाकारतिल ते ही सगळे  एकाच नावेतिल प्रवासी. मग त्यांच्याबाबत तू इतका कठोर का होतोस? तुझी कठोरता मला ठाउक आहे. एकवेळ  पाषाणाला पाझर फुटेल पण तुझ्या कठोरतेला नाही. पण ही कठोरता तुझ्या आयुष्यात कुठुन आणि कशी आली? तू नव्हतास असा, अ‍ॅक्च्युअली तू नाहीस असा. या कठोरतेचं कारण मला ठाउक आहे. ते घाव तूच सोसले होतेस आणि ज्यांनी ते दिले ते दुसरे कोणी नव्हते तुझे जवळचेच, तुला आपलं म्हणणारे, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारे, तुझे मित्र, तुझे नातेवाईक या सगळ्यांनिच तुला इतकं कठोर केलयं.
पण मला वाटतं जे झालं ते झालं, हे सगळं विसरुन जा. या कठोरतेचा नाश कर आणि पुढे चालू लाग. मला
माहित आहे तुझ्याबाबत ते इतक्यात शक्य नाही. पण प्रयत्न कर मी आहे तुझ्यासोबत.

तुझ्या आयुष्यात आजवर अनेक माणसं आली आणि गेली. काहींना तू तोडून गेलास तर काहींना तुला तोडलं. हे सुरुच राहणार. हे होतचं असतं त्याशिवाय माणसं कळत नाही आणि आपल्याला ही जीवन जगण्याचा अनुभव येतो, आपणही स्वःताला ओळखू लागतो. आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. माणसं येत राहतिल आणि जात राहतिल. प्रत्येकवेळी जगण्याचा तुला ते एक वेगळा अनुभव देत राहतिल. अपण कुठे चुकलो हे शोधणं फार गरजेचं आहे, नाही का? तू सुद्धा चूकलास! अनेकदा. ठीक आहे! आयुष्य आहे हे  आणि माणसं चूकणारचं! पण काही मित्र खूप स्पेशल असतात रे ! त्यांना जपून ठेव. काही माणसं पुन्हा मिळत नाहीत. ते तुला हर्ट करतिल, तुला काही बोलतिल पण ते सगळे आपले मित्र आहेत आणि ते नाही बोलणार तर अजुन कोण?
उगाच मनाला लावून घेउ नको. माणसं
जोडणं सोप्पं आहे, त्यांना तोडणं तर त्याहुन ही सोप्पं आहे पण सगळ्यात कठीण आहे ते त्यांना जपून ठेवणं.जे तुला अजुन शिकायचं आहे. तुला माणसं टीकवता येत नाहीत. तुझा ईगो तुला थोडा जपायला हवा. असो. हे तुला मी संगणार नव्हते पण आज नाही राहवलं.

आठवतं त्या दिवशी नीशा काय बोलली, " D, you are just like a Teddy Bear ! Everyone around you likes you but nobody loves you! "
तिचं ते वाक्य तू किती दिवस तरी मनात ठेवून होतास. का माहित का मलाही  तिचं ते वाक्य काहिसं पटलं. नंतर तू बरचं काही बोललास माझ्याशी स्वःतबद्दल आणि तिच्या त्या वाक्याचे निकष तुझ्या आयुष्यातल्या प्रसंगावर कसे खरे उतरत होते हे मला पटवून देउ लागलास.पण तुझं तिला ते प्रत्युत्तर मला आवडलं, " So what Neesha, At least everyone likes me !"  
जाउ दे ! इतकं काही मनाला लावून घेण्यासारखं नाही बोलली ती. सोड ना यार काय फरक पडतो! It's damn life dude !

चल! मला वाटतं पत्र फारचं लांबलयं.  मी का तुला  उगाच लेक्चर देतेय! आज तुझा वाढदिवस ( मी का पुन्हा पुन्हा तुला हे सांगतेय!) जस्ट  एंजॉय इट ! बरेच दिवस तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून
हा पत्रप्रपंच आणि काही नाही!

तसं पण पुन्हा तुला वेळ नाही मिळणार तू तुझ्या नेहमीच्या आयुष्यात बिझी होणार. तुला आज काल वेळच नसतो माझ्यासाठी. तू तुझा तो पकाव लॅपटॉप आणि तुझा आय पॉड ! असो. पण मला माहित आहे की तू मला तुझ्यापासून कधी दुर नाही करणार. 

चल आता आवरतं घेते. तुझ्याबद्दल बोलायचं तर हा कागद कमी पडतोय( अ‍ॅक्चुअली माझे हात दुखले रे लिहून ;) ) पुन्हा बोलु कधीतरी निवांतपणे समुद्राच्या किनार्‍यावर, वाळूत निजून,
गाणी
गात आकाशातल्या चांदण्या मोजत.

तुला तुझ्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा! आणखि काय बोलू? आणि हो आता लग्नाचा विषय जरा सिरिअसली घे !

You know something, love sucks mate ! And 28 years are enough to understand that love sucks badly !
Get a nice girl, get married and have a best life !!


तुझी सख्खी मैत्रीण,
तुझी डायरी. :)