Friday, June 26, 2015

‘ती’ मैत्रीण...

      त्यादिवशी तिला भेटलो. भेट काही ठरवून नव्हती घेतली. काही योगायोग असतात आणि जुन्या, कित्येक वर्षं अधुऱ्या राहिलेल्या भेटी पूर्ण होतात, तसंच काहीसं. तसा तिला मी अगदी लहानापानापासुंच ओळखतो. दर दिवशी शाळेत जाताना, किंवा त्याबाजूने गेलो की ती दिसायची. इतर मित्र - मैत्रीणीसारखीच ती सुद्धा. पण मला आठवतयं, तिच्याशी कधी मी जास्त बोललोच नाही. जितका इतर मित्रांसोबत वागायचो, बोलायचो, खेळायचो तसा मी तिच्याशी कधी वागलोच नाही. पण एक मात्र खरं की तिचं एक सुप्त असं आकर्षण मला अगदी लहानपणापासुनच होतं आणि आजही आहे. पण मी ते कधी कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का? अगदी स्वत:ला ही मी ते जाणवू दिलं नव्हतं, का कुणास ठाऊक? 

        त्यादिवशी तिला भेटलो तो एक योगायोगच असावा. नेहमीच्याच रस्त्याने जात होतो आणि सहज बाजूला लक्ष्य गेलं. ती दिसली. तशीच, अगदी लहानपणी दिसायची तशीच. तिच्यात जास्त बदल झालाच नव्हता. काहीसं मनात ठरवून मी चालत तिच्यापाशी गेलो. माझ्यासमोरच होती ती. तिला पाहून एक उसनं स्मित द्यायचा प्रयत्न केला, ते बघून ती खुदकन हसली. काय बोलावे ते सुचेनाच. मला तसा बावचळलेला पाहून ती अजूनच हसायला लागली. खूप सारे स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहू लागले. कुठूनशी वाऱ्याची एक मंद झुळूक तिच्या स्मिताबरोबर माझ्या अंगावरून गेली. मी थोडासा शहारलो. काहीच न सुचल्याने मी तिथेच तिच्यासमोर  माडाच्या झाडाला टेकून बसलो. ती समोरच. दोघेही शांत. तिला इतक्या जवळून मी कधीच पाहिलं नव्हतं. ती खरंच अतिशय सुंदर दिसत होती. बाहेर चैत्राचं उन भाजून काढत होतं, पण ती बहरून गेल्यासारखी भासत होती. किती तरी वेळ मी फक्त तिच्याकडे तंद्री लागल्यासारखा पाहताच राहिलो, ते ही अगदी पहील्यांदाच. ती ही पाहत राहिली; बऱ्याच वेळाने मी बोलायला सुरुवात केली,
“कशी आहेस?”
“ठीक आहे. तू कसा आहेस? आणि आज इतक्या दिवसांनी इकडे कुठे वाट चुकलास?” तिने माझ्याकडे पाहत हसत विचारलं.
“काही नाही, सहजच. सुट्टी होती म्हणून गावी आलोय काही दिवसांसाठी.” मी उत्तरलो.
“बरं. बाकी काय? सगळं ठीक ना?”
“हो. सुरु आहे. ठीक चाललयं.”
पुन्हा दोघांत एक शांतता पसरली. एक रानपक्षी हेल देऊन गाऊ लागला. तिथून, तिच्यासामोरून मला उठावसं वाटत नव्हतं. पण अजून काय बोलू ते कळतच नव्हतं.
“इतक्या वर्षात आपण पहिल्यांदाच असं भेटतोय ना?” मी त्या शांततेत एक खडा टाकला; पुन्हा अनेक स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन वाहू लागले.
“हो. म्हणूनच मी विचारलं तुला की आज इकडे कुठे वाट चुकलास म्हणून.” तिच्या चेहऱ्यावर ते स्मित अजूनही विरत होतं. 
“नाही. तसं काही नाही. म्हणजे तुलाही आठवत असेल शाळेत जाताना नेहमी भेटायचो की आपण.” मी चाचरत काही तरी बोललो.
“भेटायचो नाही रे. फक्त एकमेकांना बघायचो. हां, एक दोन वेळा तू इथे मित्रांसोबत अभ्यासाला यायचास ते आठवतयं, पण तेव्हाही तू इथे मित्रांसोबतच असायचास. आपण तसे कधी भेटलो किंवा बोललोच नाही. मग शाळा संपल्यावर तू निघून गेलास.” ती.
“हो. तसंच काहीसं. तेव्हा वाटायचं तुझ्याशी खूप बोलावंस, पण का कुणास ठाऊक हिम्मत नाही व्हायची.” मी.
“आता तरी आहे का हिम्मत बोलायची? की...?” ती पुन्हा हसली.
“अगं, काहीही काय. बोलतोय ना तुझ्याशी आता.” मी हसत म्हणालो.
“काय रे, आपल्या मैत्रीणीशी बोलायला काय घाबरायचं? बोलायचं बिनधास्त.”
“घाबरत नाही गं. तुझ्याकडे येऊन बसून बोलावसं खूपदा वाटायचं पण माहीत नाही का? नाही जमलं कधी. तुझ्याबद्दल लहानपणापासूनच एक आकर्षण होतं मला. पण कधी जमलंच नाही तुझ्यापाशी येऊन तुझ्याशी बोलायला. जेव्हा जेव्हा तू दिसायचीस तेव्हा तेव्हा मनात अगदी समुद्र भरून यायचा. फार सुंदर दिसायचीस तू; म्हणजे आताही, आय मीन, आताही तू तशीच सुंदर दिसतेस. दर पावसाळ्यात मी तुला पाहायचो. चिंब होऊन जायचीस तू. बेभान होऊन नाचायलाच लागायाचीस. सगळे बंध तोडून तू सगळीकडे पसरलेली असायचीस. तेव्हा तुझ्याकडे नुसतं बघत राहावं असं वाटत राही. हिवाळ्यात अगदी उलट. पहाटे जेव्हा आम्ही शाळेला जायचो तेव्हा तू धुक्याची चादर पांघरून असायचीस, तुझ्या श्वासांतून उमटणारी बाष्पाची वलयं तुझ्या चेहऱ्याभोवती दाटून यायची, आठवतयं मला.” 
“बापरे! माय, माय! किती ते वर्णन. आई शप्पथ! इतकं कधी कुणी मला माझ्याबद्दल बोललंय असं आठवत नाही!” ती हसत हसत म्हणाली.
“बघितलंस, माहिती होतं की तू हसणार म्हणून मी कधी तुझ्याशी असं काही बोलायचो नाही.” मी थोडा रागवत म्हणालो.
“काय यार, मस्करी पण नाही का करायची? लगेच कसला रे फुगतोस? खरं सांगू मलाही नेहमी वाटायचं की तू माझ्यापाशी यावसं. आपण खूप साऱ्या गप्पा माराव्यात, या इथे बागडावं, गाणी गावीत. पण ते कधी तुला सांगू नाही शकले. तू इथेच या गावात राहिला असतास तर ते शक्यही झाले असते, कदाचित. पण प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप असतातच नाही का? मला बापडीला काय, मी आहे अशीच. मी ही हे सगळं सोडून कुठे जाणार ना? मग आहे. पण कधी कधी वाटत की तुझ्यासारखा कुणी तरी मित्र असावा. घटकाभर येऊन त्याने भेटावं, बोलावं, सुख - दु:खाच्या चार गोष्टी सांगाव्यात. वाऱ्यावर ताल धरून एक सुंदरसं गाणं गावं. बस्स, अजून काही नाही. आपल्या मैत्रीसाठी एखाद्याने एवढं तरी करावं ना रे? नाहीतरी इथे कोण असतं कुणाचं? ” ती स्तब्ध झाली.

“खरं सांगतो, मलाही कित्येकदा असं वाटलंय. अगदी अस्सच वाटलंय की पुन्हा तुला पावसात बेभान होऊन नाचताना बघावं आणि तुझ्यासोबत आपणही पावसात नाचावं, चिंब होऊन बागडावं. तुझ्या अंगणात पुन्हा येवून खेळावं, तुझ्यासोबत गाणी गावी. कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटेचं तुझं धुक्याने आच्छादून गेलेलं रूपं पाहत बसावं. खूप वाटतं असं. पण तुझ्याबद्दल मला नेहमीच एक आदर आहे. मी इतर मित्रांशी कसाही वागू शकतो, बोलू शकतो. पण तुझ्याशी तसं नाही करू शकत. असं वाटतं की अगदी लहानपणापासूनची आपली ही मैत्री अखेर पर्यंत तशीच राहावी; अभंग. त्या मैत्रीला कुठेही, कसलाही बांध नसावा. हा प्रवाह असाच निरंतर रहावा.” मी. 

“मैत्रीचं काय आहे? ती राहिली तर राहते. टीकवली तर टिकते, नाही तर जाते वाहून. पण कधी कधी उगाच ओढूनताणून टीकवण्यापेक्षा ती वाहीलेलीच बरी असते. मैत्री हे काही नातं नाहीय. त्यात कुणी कुणाला बांधील नसतं आणि नसावंच मुळी. मलाही असंच वाटतं आपल्याबद्दल. कधी कुठे भेटलो तर निदान एकमेकांची ओळख तरी विसरत नाही आपण. ओळखीचं, मैत्रीचं, जाणीवेचं एखादं स्मित पुरेसं आहे आपल्यात, आणि हे असंच असावं नाही का रे?” ती.

 मी पुढे काही बोललो नाही. ती ही शांतच राहिली. थोड्यावेळाने उठून मी तिचा निरोप घेतला.

“येत जा असा अधूनमधून. बरं वाटतं कुणी ओळखीचं भेटलं की.” 
ती पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणाली.
“हो. नक्की.” असं म्हणून मी जायला वळलो. तिच्या चेहऱ्यावरले तरंग पुन्हा विरत गेले. खूप दिवसांनी त्या दूरच्या मैत्रीणीला भेटून, तिच्याशी बोलून फार बरं वाटलं. 



'नदी’ माझी दूरची मैत्रीण.  





        नदीचं एक सुप्त आकर्षण मला कधीपासून तरी आहे. मी तसं कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का अगदी स्वत:लाही मी हे जाणवू दिलं नव्हतं. माझ्या गावात एक नदी आहे. कुठून रानावनातून, दऱ्या-खोऱ्यातून वाहत येते आणि समुद्रात विलीन होते. का कुणास ठाऊक कधी प्रवासात मला एखादी नदी दिसली की मन अगदी भरून जातं. समुद्र जीवाभावाचा मित्र असेल तर नदी ही मैत्रीण. इतके दिवस नव्हतं जाणवलं. ती सुद्धा माझ्याशी तशीच वागते, दूरच्या मैत्रीणीसारखी. काही दूरचे नातेवाईक असतात तशीच ही माझी दूरची मैत्रीण. पण दूरची असूनही अगदी जीवाभावाची. कधी भेटली तर ती जास्त बोलत नाहीत. कधी तरी, क्वचितच एखादं संयत, संथ आणि नितांत सुंदरसं स्मित झळकेल तिच्या चेहऱ्यावर. कधी चालताना, तर कधी प्रवासात बस-ट्रेन मधून ती जोवर दिसेल तोवर आमची सोबत. एखादं स्मित दोघांच्यात. बस्स! नंतर ती तिच्या वाटेला मी माझ्या वाटेला. निरोप असा घेत नाही आम्ही. माहीत असतं पुन्हा भेट होईलच. पण तोवर हुरहूर ही लागलेलीच असते जीवाला.

लहानपणापासून समुद्र माझा मित्र, सखा, सोबती, यार सगळं काही. आमच्या गावात समुद्रही अगदी तसा जवळच. पण समुद्रावर कधी जायला मिळायचं नाही, त्यामुळे कधी प्रवास करताना गाडीतून १-२ मिनिटासाठी दिसणारा समुद्र मी अधाशीपणे प्राशून घ्यायचो. लहानपणापासून समुद्र माझ्या सोबतीलाच. एका सच्च्या दोस्तासारखा. आयुष्यातल्या अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांचा तो जणू एक साक्षीदारच. सगळया सुख दु:खांत तो माझ्यासोबत. नंतर किती तरी वेळा मी त्याच्या किनारी जाऊन त्याच्याशी बोलत बसलोय. कितीतरी वेळा त्याच्या लाटांच्या तालावर गाणी गात बसलोय. कितीदा तरी किनाऱ्यावरल्या उष्ण वाळूत अंग टाकून आकाशातल्या चांदण्या मोजल्यात; पण नदीशी मी असा कधी वागलोच नाही. माझ्या गावात नदीही आहे. नदीच्याच बाजूला गाडीरस्ता. येणाऱ्या - जाणाऱ्यांची नेहमीची वाट. आम्ही देखिल शाळेत जाताना याच नदीच्या बाजूच्या रस्त्याने जायचो यायचो. प्रत्येक मोसमात नदीची वेगवेगळी रूपं दिसायची. पावसाळ्यात दुथडीभरून ती वाहायची. नदीचं पाणी काठ फोडून शेतमळ्यात शिरायचं. सगळा शेतमळा एखाद्या प्रचंड मोठया सरोवारासाराखा भासायचा. पावसाळ्यात नदीचं पाणी पुलावरून गेलं की शाळेला हमखास सुट्टी. श्रावणात एखाद्या माहेरवाशीणीसारखी बेभान होऊन नाचणारी, बागडणारी नदी शिशिरात गारठून जायची. आम्ही पहाटे शाळेत कुडकुडत जायचो तेव्हा पुलावरून दिसायचं; नदी धुक्याची चादर पांघरून शांत वाहायची. जणू पुन्हा सासरी जाणाऱ्या मुलीसारखी आतल्या आतच रडायची.                                    

लहानपणापासून मला पाण्याचा प्रवाह, डोह, समुद्र दिसला की त्यात स्वत:ला झोकून द्यावेसे वाटायचे. पोहायची भयंकर इच्छा असूनही घरच्यांच्या ओरडण्याने साध्या दारातल्या ओहोळातही जायला मनाई होती. नदीचा दुसरा काठ सहज दिसायचा. मला लहानपणी नेहमी वाटायचं की उडी मारली तर सहज पोहून नदीच्या दुसऱ्या काठावर जाईन. त्यावेळी त्या शांत, गूढ नदीच्या रुपाची मला कल्पना नव्हती. मला वाटायचं की असा कसा बुडेन नदी मला तरंगवत दुसऱ्या काठावर घेऊन जाईल. पण हां! असा प्रयत्न कधीच केला नाही. तुम्ही नदीची विविध रूपं लक्ष्य देऊन बघा, ती प्रत्येकवेळी वेगळीच भासते. पण मला सर्वात भावतं ते तिचं गूढ, शांत, रूप. पण तेव्हाची पाण्यात जायची ओढ आता नाही राहिली. हां, फक्त त्या प्रवाहाला, डोहाला, अथांग समुद्राला दुरून बघत राहतो. समुद्राची ओढ असली तरी नदीचं वेगळंच असं आकर्षण मनाला लागून आहे.                   

खरंच जितका मुक्तपणे मी समुद्राशी वावरतो, बोलतो तितका नदीशी कधीच नाही. मला आठवत नाही की, मी कधी तासनतास नदीच्या किनारी बसलोय. तिच्याशी भरभरून बोललोय. तिच्या काठावर बसून, वाऱ्याच्या आणि रानपक्ष्यांच्या साथीवर कधी गाणी गायलीत. तिच्यासाठी कधी ३-४ ओळी खरडल्या. नाही, कधीच नाही. ही अशी अबोल मैत्री गेली कित्येक वर्षे आमच्यात आहे. तिच्याविषयी नेहमीच एक आदर वाटत राहतो मला. त्यामुळेच असेल की, मी तिच्याशी तितक्या सलगीने नाही वागत. कधी जाऊन तिला मनातलं नाही सांगत. तिच्या काठावर तासन तास, तिला न्याहळत नाही बसत. पण वाटतं हेच ठीक आहे. 

प्रत्येकासमोर आपल्या आयुष्याचं पुस्तकं उघडून वाचण्यात काय अर्थ आहे? 
बसावं कधी निवांत एकमेकांसमोर, नुसतंच. 
काहीही न बोलता, उलगडावे मनातले बोल आपोआप. 
सुख-दु:खांच्या पलीकडे ही असावं काहीतरी बोलण्यासारखं. 
नसावी कोणतीच भावना हसवणारी, रडवणारी, मोहवणारी. 
असावी फक्त एक निरपेक्ष जाणीव. 
एकमेकांच्या अस्तित्वाची. एकामेकांच्या असण्याची. 



Wednesday, April 15, 2015

बालपणीचा ‘खेळ’ सुखाचा !

                                                        देऊळ


     आमच्या वाडीतलं श्री देव दांडेकराचे देऊळ म्हणजे आमचं हक्काचं खेळायचं छोटसं स्टेडियमच होतं. सकाळी तोंडावर शिरा मारल्यापासून ते संध्याकाळी अभ्यासाला बसेपर्यंत आमचा अक्खा दिवस त्या देवळात जायचा. रविवारच्या सकाळी मोगली, चंद्रकांता, शक्तिमान वैगरे बघून झालं की आमची टोळी दांडेकराच्या देवळात. मग तिथे बसून आज काय खेळायचं याची चर्चा व्हायची. दिवसभर नुसता गोंगाट त्या देवळात असायचा. क्रिकेट, धप्पा, खांबोळ्या, गोट्या, डोंगर का पाणी, चोर-पोलीस, आबाधुबी, लंगडी, कबड्डी, असे कितीतरी खेळ आम्ही दिवसभर त्या देवळात खेळत राहायचो. आमचं सगळं बालपण त्या देवळात खेळ खेळण्यातच गेलं. उना-पावसात आम्ही त्या देवळात पडलेले असायचो. मला आठवतं, जेव्हा मला आई मी मस्ती केल्यावर धपाटे द्यायची तेव्हा-तेव्हा मी देवळात पळायचो कारण देवळात बायकांना प्रवेश नव्हता. अगदी लहान मुली येऊ शकत पण मोठ्या मुली आणि बायकांना प्रवेश नव्हता. त्यामुळे आईच्या मारापासून बचावाचा एक बंकर म्हणू देवळाचा उपयोग होई.

देऊळ अगदी लहानच, १२-१३ चिऱ्याच्या खांबावर उभं असलेलं. सगळीकडून उघडं असलेलं, त्यामुळे नेहमीच खेळती हवा असायची. गाभारा वैगरे असा काही नाहीच. १०-१२ दगडांचे देव जमिनीत रुतून ठेवलेले. मुख्य देव श्री दांडेकर, मध्यभागी; इतर देवांपेक्षा थोडा मोठा आणि त्रिकोणी. काही देव जमिनीत अगदी घट्ट रुतलेले तर काही असेच ठेवलेले. खांबांना लागून देवळाच्या आतला बाजूला बसायला कठडे. देवांची जागा सोडून बाकीचं देऊळ मोकळं. देवळाच्या खालच्या अंगाला व्हाळ (छोटा नाला) होता. दर पावसाळ्यात हा व्हाळ खळखळून वाहायचा. आम्ही तिथे मासे पकडायला जायचो. व्हाळाच्या थोड्या खाली आमचं अंडर-आर्म क्रिकेटचं छोटं मैदान होतं. गणपती विसर्जनाच्यावेळी देवळासमोर लोकांचे गणपती येत. तिथे आरती व्हायची आणि मग तुडुंब भरून वाहणाऱ्या व्हाळात श्रींचं विसर्जन वाजतगाजत व्हायचं. मोठे लोक आम्हाला उतरू देत नसत. देवळाच्या दुसऱ्या बाजूला खाली, वाडीची सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीला लागून एक मोठ्ठं ओवळाच्या (बकुळ) फुलांचं झाड आहे. दर सकाळी आम्ही विहीरवर ओवळं वेचायला जायचो. विहिरीच्या मागल्याबाजूला गावातल्या लोकांची शेतजमीन. उन्हाळ्यात ही शेतजमीन, मळे आम्हाला क्रिकेट खेळायला मोकळे असायचे. मिरगाचा पाउस पडला की मी आणि मामा रात्री पेट्रोमॅक्सचा कंदिल घेऊन व्हाळापासून ते विहीर आणि या मळ्यात कुर्ल्या (खेकडे) पकडायला जायचो.

वाडीतल्या मोठ्या लोकांच्या मासिक सभा आणि देवाकडे गाऱ्हाणी घेऊन येणारे लोक यांच्याव्यतिरिक्त ते देऊळ फक्त आमच्या ताब्यात असायचं. पण आम्ही फक्त खेळायला म्हणून त्या देवळात जमायचो नाही. कधी गोष्टींची पुस्तकं वाचायला, कधी दुपारची डुलकी काढायला, कधी देवळाच्या मोकळ्या खांबावर चित्रकला करायला, तर कधी मारामारीला आम्ही त्या देवळात पडीक असायचो. दर पंधरावडयाला आम्ही ते देऊळ धुवून काढायचो, देवांना अंघोळ घालायचो, घाड्यांच्या गोठ्यातले शेण आणून देऊळ सारावायचो आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून देवळात धिंगाणा घालायचो. सणावाराला वाडीतला पुजारी ते देऊळ स्वच्छ करायचा. देवांची पूजा करून मग त्यांना नैवेद्य दाखवायचा. हा नैवेद्य म्हणजे खीर किंवा शीरा असायचा त्याला ‘ऊपार’ पण म्हणायचे. पूजा झाल्यावर फणसाच्या पानांवर देवांना नैवेद्य दाखवायचा. देवांना नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्हाला पण मिळायचा, पण एकदा का पुजारी गेला की आम्ही त्या देवांच्या समोर ठेवलेल्या नैवेद्यावर तुटून पडायचो. गावातले बरेचजण आडप्रसंगाला देवाकडे गाऱ्हाणी घेऊन येत. मग संध्याकाळी वाडीतला पुजारी देवळात येत असे. देवासमोर आसन घालुन शांतपणे बसे. काही वेळातच त्याच्या अंगात देव येई आणि तो बसल्या जागी कुदायाला लागे. त्यावेळात ज्याचं गाऱ्हाणं असे तो आपली विपदा देवाला सांगे आणि मग देव त्याला योग्य तो सल्ला / मार्ग सांगे. कुदता-कुदता देव त्याला चिमुटभर अंगारा देई. मोठ्या श्रद्धेने गाऱ्हाणं घेऊन येणारी माणसे तो अंगारा आणि देवाने सांगीतालेल्या गोष्टी करायचे. मला आठवतं मी लहानपणी आजारी पडल्यावर कित्येकदा आज्जीने देवाला गाऱ्हाणी घातली होती. कित्येकदा मी देवाचा अंगारा पाण्यातून प्रसाद म्हणून घेतला होता. 



        क्रिकेट खेळताना काही देवांचा स्टंप्स म्हणून उपयोग व्हायचा. काही देव जे हलवता येत असत ते खेळताना टाईमप्लीज देवून बाजूला करायचो पुन्हा खेळून झाल्यावर त्यांना त्यांच्या मूळ जागेवर आणून ठेवायचो. गोटया खेळतानाही सेम, गलीत गोटी जाण्यासाठी देवांना बाजूला करून ठेवायचो. काही ठराविक देवांना बॉल लागल्यास एक्स्ट्रा रन्स मिळायचे. देवळाच्या डायरेक्ट बाहेर गेल्यास आउट. समोरच्या कठड्याला फोर, डायरेक्ट लागल्यास सिक्स. खांबोळ्या आणि डोंगर का पानी खेळताना एखाद्याला पिदवायला ज्याम धम्माल यायची. पण सगळ्यात धम्माल यायची धप्पा (लपाछुपी) खेळताना. ज्याच्यावर राज्य असायचं त्याला एका वेळी १०-१५ जणांना शोधून देवळाच्या एका खांबाला धप्पा द्यायचा असे, पण जर लपलेल्यापैकी कुणी अगोदर येवून त्या खांबाला धप्पा दिला की त्याच्यावर पुन्हा राज्य. एकदा खेळताना ज्याच्यावर राज्य होतं त्याने सगळ्यांना शोधून काढलं, फक्त एक जण काही केल्या सापडत नव्हता. खरं तर तो कुठे लपलाय हे आम्हाला देखिल ठाऊक नव्हतं. कधी कधी जो शेवटचा राहिलेला असायचा तो कुठून तरी लपत छपत यायचा आणि धप्पा द्यायचा. मग आम्ही सुटायचो. एखाद्याला जर जास्तच पिदवायचे असेल तर मग आम्ही सगळेजण धावत त्याच्यासमोर यायचो आणि तो सगळ्यांना धप्पा द्यायच्या आत आम्ही त्यालाच धप्पा द्यायचो. तर हा जो शेवटचा होता त्याने काही वेळाने कुठून तरी धप्पा दिला पण आम्हाला धप्प असा आवाज आला. पाहिलं तर तो जमिनीवर पडला होता, हा आला कुठून? मग लक्ष्यात आलं की ज्या खांबावर धप्पा द्यायचा त्याच खांबाच्या वरच्या छपराच्या फटीत हा लपला होता पण अडकल्यामुळे त्याला बाहेर पडता येईना आणि धप्पा द्यायचा असल्यामुळे तो ओरडू ही शकत नव्हता. कसाबसा फटीतून बाहेर पडताना धप्पा द्यायच्या नादात हा देवळात धप्पकन पडला.

        कधी कधी मूड असला की देवळात आमचा ऑर्केस्ट्रा जमायचा. इंगा नावाचा मुलगा तोंडाने बुलबुल (बेंजो) वाजवल्याचा आवाज काढायचा आणि त्याच्या तालावर आम्ही काठ्यांनी देवळाचे कठडे बडवायचो. चित्रकलेचा मूड झाला की मग पाटीवरल्या पेन्सिलने देवळाच्या कठड्यांवर वेगवेगळी चित्रं उमटायची मग त्यात रंग भरण्यासाठी मातीतल्या जांभ्या दगडांचा वापर व्ह्यायचा. आठवड्याच्या बाजारातून कुणाच्या घरात चणे, फुटाणे, भजी असं काही येई,  मग ते सगळं देवळात येई आणि सोबत बसून खाणं होई. कधी प्रत्येकी चार-आठ आणे जमवून गुरु भटाच्या दुकानातून फरसाण आणि आईस्फ़्रोट आणून जंगी पार्टी पण होई. इतकं सगळं जे काही आम्ही गडबड - गोंगाट, जो उच्छाद देवळात घालायचो तो काही मोठयांना आवडत असे असं नाही. आमच्या या गोंधळाचा त्रास त्याना नेहमीच व्ह्यायचा. कोणताही खेळ असो तो शांतपणे कसा खेळला जाईल? बॅट-बॉल, गोटया, खांबोळ्या, डोंगर का पानी हे काय गप्प राहून खेळायचे खेळ आहेत का? 
माझी बॅटींग - तुझी बॅटींग, 
कोणार राज्य? 
बॉल हळू मार रे!, 
बॉल हरावलो तर भरचूक - नो भरचूक, 
कोयबा, तुझ्या आवशीचो घोव, 
बरोबर फिल्डींग कर मरे!, धाव – धाव, नेम धरून ठोक! अरे पडलो रे पडलो! 
या अश्या वाक्यांपासून ते शिवीगाळ मारामारीपर्यंत सगळं काही देवळात सुरु असायचं. या गोंगाटाचा त्रास मोठ्या लोकांना होताच असे. त्यात ते देऊळ अगदी माझ्या घराला लागुनच त्यामुळे मलाच जास्त मार बसे. पण तरीही पुन्हा देवळातच खेळायला जमायचो.


            मागल्यावेळी गावी गेलो तेव्हा सहजच मंदिरात गेलो. एकेकाळी आमच्या गोंगाटाने  थरारणारं ते देऊळ आज अगदी शांत होतं. सगळे देव स्थितप्रज्ञ अवस्थेत बसले होते. आमच्या खेळात फिल्डर्स, स्टंप्स, म्हणून असणारे देव आज रिटायरमेंट घेतल्यासारखे निपचित पडले होते. आताशा ते देऊळ कुणी सारवतं की नाही कुणास ठाऊक. सगळया देवांवर एक कारुणीक छटा उमटली होती. चारी बाजूनी उघडं असलेल्या त्या देवळात एरव्ही वाराही आमच्यासोबत खेळायचा तिथे आज जीव गुदमरू लागला. देवळातले खांब शापित असल्यासारखे, धुळीने माखून गुपचूप उभे. सगळया देवळाला जणू अवकळाच आलेली. आमच्यासारखं बालपण आताच्या मुलांच्या नशिबी नव्हतं. दुर्दैवाने काही नालायक लोकांनी वाडीची वाट लावलीय. घराघरांत, कुटुंबात गटबाजी – राजकारणांना उत आल्याने आता पूर्वी सारखे लोक जमत नाहीत. बोलत नाहीत. जसे मोठे वागतात तसेच ते आपल्या मुलांनाही वागायला शिकवतात. त्यामुळे मुलेसुद्धा गटागटांनी राहतात. आमच्यावेळीपण हे सगळं नव्हतं अश्यातला भाग नाही, पण आम्ही आमच्यात कधी फूट पडू दिली नव्हती. खेळ, मस्ती, अभ्यास या सगळ्यात आम्ही एकत्र बांधले गेलो होतो. ते सगळं आठवून खिन्न मनाने काहीवेळ देवळातल्या कठड्यावर टेकलो. कुठून तरी शीळ घालत वारा देवळात शिरला आणि अंगावरून अलगद वाहू लागला. एक – दोन रानपक्षी, चिमण्या देवळाच्या वाश्यांवर येवून किलबिलू लागल्या. मी शांतपणे डोळे मिटून घेतले आणि पुन्हा बालपणात शिरलो....