Sunday, March 11, 2012

किनारा....

एक अंधारलेली, काळी, कभिन्न रात्र!
आकाशात एका तार्‍याचाही प्रकाश नव्हता. डोळ्यांना आंधळा करणारा काळोख. 
अशा त्या काळोख्या रात्री एक नाव अथांग महासागरातुन पाणी कापित पुढे जात होती.
दिशाहीन, भरकटलेली, तुटलेली, अस्मितेला तडे गेलेली पण तरीही स्वःताचे अस्तित्व न हरवलेली.
स्व:ताच्या अस्तित्वावर ठाम राहुन ती नाव तशीच पुढे पुढे जात होती.

आत्ताच काही वेळापूर्वी एका प्रचंड वादळाच्या तडाख्यातुन ती बाहेर पडली होती. हे वादळ तसं तिला नवखं नव्हतं. अशा कित्येक वादळांना ती मोठ्या धैर्याने सामोरी गेली होती. त्या सार्‍या वादळांनी त्या नावेचं सारं विश्वच हिरावून घेतलं होतं. त्या वादळाने तिच्या अस्मितेला तडाखा दिला होता. तिच्या अस्तित्वावर आघात करुन तिला त्या महासागरात भरकटवून दिलं होतं. पण कोणतंही वादळ तिचं अस्तित्व हिरावून घेउ शकलं नव्हतं. तसाही तिचा आता कुणावरही विश्वास उरला नव्हता. ज्या वार्‍याचा रुपावर भाळून आणि त्याच्या वेगावर लुब्ध होउन ती नाव आपलं घर सोडून त्याच्यासोबत वाहत गेली होती, त्याच वार्‍याने अचानक वादळाचं रुप घेउन तिच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. सोडुन दिलं होतं तिला त्या महासागरात दिशाहीन!
बिचारीला ठाउक नव्हतं तो वारा कसा बहीरुपी होता ते!

ती तिच्या घरी, नदीच्या किनारी जेव्हा पाण्यावर तरंगत असे तेव्हा हा वारा एक झुळूक होउन तिच्या भोवती फिरायचा. तिच्या सर्वांगावरुन वाहायचा. तिला महासागराच्या विशाल रुपाची स्वप्ने दाखवायचा....
तिलाही त्या नदीच्या छोट्याश्या पात्रातून बाहेर पडायचं होतं. समुद्रात मुक्त विहार करायचा होता. मोठीमोठी जहाजं, गलबतं पाहायची होती. पण काही केल्या तिचं मन धजत नव्हतं. आईला सोडुन जाण्याची कल्पनाही तिला सहन होत नव्हती.
पण शेवटी, एके रात्री हळूच आईच्या कुशीतुन, तिचा वेढलेला हात बाजुला करुन त्या वार्‍याबरोबर ती महासागराच्या दिशेने निघाली....

डोक्यावरलं निराकार आभाळ आणि तो अथांग महासागर या व्यतिरिक्त तिला आपलं असं कुणीच नव्हतं. कित्येक दिवस-रात्र ती अशीच पाण्यावर तरंगत जात होती.कुठल्याही दिशेचा तिला अंदाज नव्हता.आपण कुठे जातोय? आपला काय शेवट होईल याची तिला बिलकुल कल्पनाही नव्हती. किंबहुना ती या सगळ्या गोष्टींचा विचारही करत नव्हती. फक्त अथकपणे पुढे पुढे जात होती. इथे ही त्या वार्‍याने तिची पाठ सोडली नव्हती. तो प्रत्येकवेळी तिला भरकटवत होता.पण आता तिचा त्याच्यावर बिलकुल विशवास उरला नव्हता. 

असे कित्येक महिने तिचा प्रवास सुरुच होता. प्रत्येकवेळी तिला तिच्या आईची म्हणजेच नदीची आठवण येई. दिवसा ती निमुटपणे आपला प्रवास करत असे पण अंधार पडला की तिच्या डोळ्यांना पूर येई. आईच्या आठवणीने ती व्याकुळ होई, एकही हुंदका न देता मुक्यानेच रडत राही. तिचे अश्रु त्या महासागरात विरघळून जात आणि तिला तसं रडताना बघुन, तिच्या प्रत्येक अश्रुने त्या विशाल महासागरालाही भरती येत असे. आकाशही तिच्या मुक्या आसवांनी बरसणं विसरुन जाई.

अश्याच एका रात्री प्रवास करुन थकलेली, आसवे गाळून कोरडी झालेली ती नाव आकाशातल्या तार्‍यांची चादर घेउन निद्रीस्त झाली. पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिचा स्व:ताच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
एका सुंदर किनार्‍यावर ती विसावली होती.
किनार्‍यावरला शुभ्र वाळूत ती पहुडली होती. किनारा फारच सुन्दर होता. हिरवळीने नटला होता. स्वच्छ सुर्यप्रकाशात ती वाळू चमकत होती. वाळुच्या पुढेच काही अंतरावर खूप प्रकारची झाडे आणि फुलझाडे होती. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या झाडांवर तालासुरात गात होते. रंगीबेरंगी फुलपाखरे वेलींवरुन आणि फुलझाडांवरुन बागडत होती. आणि या सर्वांत तो शांत किनारा फराच उठुन दिसत होता. एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखा तो किनारा तिला भासत होता. निश्चलपणे तो किनारा कधी त्या नावेकडे तर कधी त्या महासागराकडे बघत होता. किनारा आपल्याकडेच बघतोय. हे जाणुन ती नाव थोडीशी बावरली पण त्वरीत सावरली. अनेक दिवसांच्या प्रवासाने ती मनाने पार थकुन गेली होती. तिला ग्लानी आली आणि तश्यातच ती नाव पुन्हा त्या किनार्‍यावर विसावून गेली. किनार्‍यावर अंग टेकताच ती निद्रेत विलीन झाली......


क्रमशः