Wednesday, December 18, 2013

कोंकणसफारी - सिंधुदुर्ग, राजेकोट, सर्जेकोट आणि किल्ले निवती

दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार ६ डिसें. आजचा पल्ला जास्त लांब नव्हता, जाउन येउन शे-दिडशे किमी. वेंगुर्ला - मालवण- किल्लेनिवती-वेंगुर्ला. आज जरा जास्त टप्पे गाठायचे असल्याने ५ रु./किमी या रेटने आम्ही बाईक घेतली. बाईक जरा महागच पडणार होती. पण त्यामुळे आमचा बराच वेळ वाचणार होता. सकाळी नउ - साडेनउच्या दरम्यान आम्ही गावातुन निघालो. वेंगुर्ल्याहुन मालवण नविन झालेल्या सागरी महामार्गाने ४५ किमी. आहे. वाटेत माझं गाव परुळे लागणार होतं. वेंगुर्ल्याहुन दाभोली-केळूस-म्हापण-पाट-परुळे-चिपी-मालवण असा रुट आहे. वेंगुर्ल्याहुन निघुन दाभोलीच्या सड्यावर पोचलो तेव्हा दहा वाजले होते. कोकणातला हा सडा मला जाम आवडतो. नजर जाईल तिथवर पठार आणि भिरभिरणारा वारा. या दिवसांत कापावर सोनेरी गवत उगवलं होतं. दूरवर पसरलेलं ते सोनेरी पठार आणि मधुनच डोकं वर काढणारा एखादा 'मांगर'. पावसाळ्यात या सड्याचे रुप काय ते वर्णावे. पावसाळ्यात संपूर्ण गवत  नाहीसं झालेलं असतं आणि सड्यांच पूर्वीचं रुप म्हणजे तो काळा कातळ. पावसाळ्यात भिरभिरणार्‍या वार्‍यासोबत अंगावर पावसाच्या सरी झेलत या सड्यावरुन फिरण्याची मजा काही औरच! एका ठिकाणी थांबून या सड्यावर काही फोटो घेतले. वाहन असलं की एक बरं असतं एखादी फ्रेम लोकेट झाली की गाडी थांबवून लगेच ती शूट करायची. 








सडा संपला आणि खाली वळणावळणाच्या घाटउतारातुन आम्ही केळुसला पोचलो. केळुसच्या पुढे अजुन एक घाट. तो संपवून आम्ही म्हापण मार्गे पाट या गावी आलो. पाटावरुन डावीकडला रस्ता परुळे - निवती - भोगवे - मालवण आणि पुढे आचारा, देवगड असा जातो. हाच नवीन सागरी महामार्ग. पाटला सस्त्याच्या डावीकडे माउलीचं सुंदर मन्दीर आही आणि उजव्या बाजुला एक तळं आहे. हे तळं सदानकदा लाल आणि सफेद कमळांनी फुललेलं असतं. सगळीकडे नुसती कमळंच. फारच सुंदर !

त्यानंतर वाटेत माझ्या गावच्या प्रसिद्ध वेतोबाच्या मंदीरापाशी थांबलो. आईने तिथे देवाला नारळ वाहायला सांगितला होता. देवदर्शन झाले आणि पुढे काही वेळातच आम्ही माझ्या गावी परुळे इथे पोचलो. शुक्रवार असल्याने आज गावचा बाजार होता. पण पहिल्यासारखा बाजार भरलेला अजिबात वाटत नव्हता. मला आठवतं लहानपणी मी आजीबरोबर बाजाराला यायचो. धम्माल असायची. आज्जी आईस्फ्रुट, भजी, फरसाणं, अजुन काय काय असं बरंच काही खायला घेउन देत असे. बाजार भरगच्च भरलेला असायचा. आता फक्त नावालाच उरला होता. 


श्री देव वेतोबा :- परुळे



  मंदिराच्या आवारात एक छान मुर्ती होती.:-


    परुळे बाजार :-

परुळ्यात जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे निघालो कारण परुळ्यात पोहचेपर्यन्त सव्वा अकरा वाजले होते. तिथुन एका छोटा घाट चढलो आणि पुन्हा एका सड्यावर आलो. इथे सध्या चिपी एअर पोर्टचं काम सुरु असल्याने मालवणकडे जाणारा मार्ग डायव्हर्ट केला होता. त्यामुळे आम्हाला सहा किमीचा अतिरिक्त फेरा पडला. एअरपोर्टचं काम अतिशय जोरात सुरु आहे. आम्ही गेलो तेव्हा रनवेचं काम सुरु होतं.

चिपीहुन मग आम्ही मालवणच्या दिशेने निघालो आणि इथे एका अतिशय सुंदर जागी येउन पोचलो.  मालवण आणि चिपी ( परुळे ) या दोन गावांच्या मधुन कर्ली नदी वाहते. हल्ली काही वर्षांपूर्वीच या नदीवर एक ब्रीज बांधलाय. तत्पूर्वी मला आठवतं, मालवणला जायला आम्हाला परुळ्याहून चिपीच्या पुढे कोरजाई गावी जावं लागे. इथे कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते. कोरजाईहुन होडीने आम्ही मालवणला जायचो. पण आता या ब्रीजमुळे मलावणला लवकर पोचता येतं. त्या ब्रीजवर जेव्हा पोचलो तेव्हा समोरचं दृश्य वेडावून टाकणारं होतं. प्रचंड मोठी अशी ती कर्ली नदी संथ वाहत होती. त्या विशाल पात्राच्या दोन्ही बाजुच्या किनार्‍यावर माड डोलत उभे होते. दूरवर पसरलेलं ते नीळेशार पाणी अगदी डोळ्यात साठवून घेतले होते. या नदीवरला हा ब्रीज माझी अत्यंत आवडती जागा आहे. काही वर्षांपूर्वी मी या ब्रीजवरुन गेलो होता तेव्हाच अगदी हा ब्रीज आणि ते लोकेशन माझ्या मनात भरलं होतं पण त्यावेळी माझ्याकडे कॅम नव्हता. अशाचप्रकारचं पालघरला असलेल्या केळव्यातल्या दांडा खाडीवरलं ब्रीज मला भयंकर आवडतं. म्हणजे ते लोकेशन इतकं रोमँटीक आहे ना ! तसंच कर्ली नदीवरलं हे लोकेशन तर कळसच होतं. तिथुन पाय उचलवत नव्हता पण जमेल तितके फोटो घेउन आम्ही आता नॉनस्टॉप मालवणकडे निघालो. 


माडांतुन वाहणारी कर्ली नदी :- 








मालवण बाजारपेठेतुन वाट काढीत आम्ही जेट्टीवर पोचलो तेव्हा बारा वाजले होते. दुपारच्या उन्हात सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात उभा होता. आम्ही पटकन किल्ल्याची तिकीटे घेतली आणि होडीतुन किल्ल्याच्या दिशेने निघालो. जस जसा किल्ला जवळ येत होता तसं तसं अभिमानाने छाती भरुन येत होती. आज पहिल्यांदाच मी या किल्ल्यावर जात होतो. होडीतुन मुख्य दरवाज्यापाशी उतरल्यावर होडीवाल्याने एका तासांत किल्ला बघुन यायला सांगितलं. महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे मुख्य द्वारही 'गोमुखी' आहे. 

                 
मालवणचा किनारा :)






किल्ल्यावर बरीच वर्दळ होती. मुख्य दरवाज्यातुन शिरताना दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घेतलं. नेहमीप्रमाणे ट्रेकक्षितिजच्या कृपेने नकाशा सोबत होता. नकाशा सोबत असल्याने किल्ला फिरताना आणि बघताना चुकायला होत नाही आणि किल्लाही लवकर बघून होतो. किल्ल्यात दर्शवल्याप्रमाणे सर्व प्रथम आम्ही महाराजांच्या हाताचे ठसे असणारी जागा शोधायला लागलो. नकाशात दाखवल्याप्रमाणे नगारखान्याच्या वरच ती जागा सापडली. महाराजांच्या हाताचे ठसा असलेली त्या जागेला एक छोटा दरवाजा केलाय आणि त्याला कुलूप लावले आहे. पण दरवाजा जाळीदार असल्याने ठसा दिसतो. मला वाटतं त्या ठश्याला चुन्याचा हात मारला आहे. तिथे नतमस्तक होउन आम्ही नकाशात दाखवल्यापप्रमाणे तटबंदीवरुन चालायला सुरुवात केली. इथुन समुद्र मस्तच दिसत होता. किल्ल्याच्या बुरुजावर लाटा अलगद आदळत होत्या. पाणी अगदी हिरवंगार होतं. उन मी म्हणत होतं पण वार्‍यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. आम्ही ज्या बाजुने फिरत होतो त्याबाजुला काहीच नव्हतं. त्या भागात दलदल माजली होती. 










मग बरंच चालल्यावर एका बाजुने शिवराजेश्वर मंदीराच्या मागच्या बाजुला खाली उतरलो. मंदीरात जाणार इतक्यात दुसर्‍या होडीतुन आलेली माणसं आत शिरली. गर्दीत नको म्हणुन मग आम्ही पुढे गेलो. तिथुन मग महादेव मन्दीरापाशी गेलो. महादेवाचे दर्शन घेतले. मंदिरात एक अतिशय लहान म्हणजे ३ बाय २ फुट आकाराची आयताकृती विहीर कशी होती. स्थानिकांच्या मते ते एक भुयार आहे. जे थेट मलवण शहराच्या उत्तरेकडे असलेल्या ओझर या गावी एक मठ आहे तिथे उघडते. 
महादेवाच्या मंदीरापासुन थोड्याच अंतरावर दूध बांव, दही बांव आणि साखर बांव अशा गोड पाण्याच्या विहीरी आहेत. ( बांव = विहीर ). हा किल्ला समुद्रात उभा असुनही आतमध्ये असलेल्या या गोड पाण्याच्या विहीरी महणजे आश्चर्यच मानले जाते. किल्ल्यावर असलेल्या रहिवाशी हेच पाणी वापरतात. पुढे काही अंतरावर भगवती देवीचं मंदीर आहे. तिथुन मग पुढे पायर्‍या.ववरुन चढुन आम्ही पुन्हा तटबंदीवर आलो. किल्ला बघुन संपला होता पण मघाशी राहिलेल्या शिवराजेश्वर मंदिरात जायचं राहुन गेलं होतं. मुख्य दरवाज्याच्या तटबंदीवरुन उतरुन मंदीरात गेलो. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते.सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज इ.स. १८१२ पर्यंत फडकत होता. इ.स. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली. 

भगवती मंदिर 


 श्री शिवराजेश्वर मंदिर




आता किल्ल्याविषयी थोडी ऐतिहासिक माहिती: ( साभार विकी आणि ट्रेक क्षितिज )

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :

'चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।

मालवणच्या समुद्रात असलेल्या ''कुरटे'' बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना आज्ञा केली; " या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौर्यांंशी बंदरी ऐशी जागा नाही"! दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्या वरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकाची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला.
असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.''फोर्ट ऑगस्टस'' कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.


 गडफेरी आटपून आम्ही आमच्या ३३ नंबरच्या बोटीत येउन बसलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. एव्हाना २ वाजले होते आणि पोटात कावळे ओरडत होते. थोडावेळ फिरल्यावर बाजारात 'चैतन्य' हे ओळखीचे नाव दिसले आणि तिथेच जेवायला बसलो. जेवण तर अप्रतिम होते. पण या चैतन्यवाल्यांचे एक रेस्टॉरंट प्रभादेवीला सिद्धिविनायकाशेजारी आहे. पहिल्यांदा तिथे सुद्धा फार चांगलं जेवण मिळायचं पण आता त्या जेवणला चवच नसते. असो. इथे मालवणात आम्हे भरपेट मासे खाउन पुढे राजेकोट आणि सर्जेकोटसाठी निघालो. 

जेवणाची वाट बघतोय. :) 




मलवण जेट्टीवरुन उत्तरेकडे राजकोट आहे. सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी महाराजांनी पद्मगड, राजेकोट आणि सर्जेकोट हे किल्ले देखिल बांधले. आता या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास काहीच नाहीए. स्थानिक मोकळ्या जागेचा उपयोग मच्छी सुकवण्यासाठी करतात. पण इथुन सिंधुदुर्ग किल्ला फार छान दिसतो. बाजुलाच खडकांमध्ये एक छोटे चर्च अगदी उठुन दिसते. 

राजेकोटवरून मालवण बंदर :) 

     राजेकोट




 राजेकोटवरुन सिंधुदुर्ग किल्ला 









राजकोटावरुन मग आम्ही बाईक सर्जेकोटाकडे वळवली. मालवण - आचरा - देवगड सागरी महामार्गावर मालवणपासुन ४-५ किमी वर कोळंब खाडीवरलं ब्रीज पार केल्यावर डावीकडे एक वाट जाते त्या वाटेने सरळ जावे. सर्जेकोटावर काही नाही. प्रवेशद्वार छोटेसे पण कमानदार आहे. आत मध्ये बरीच झाडी माजली होती. तटबंदीचे अवशेष अधुन मधुन डोके वर काढत होते. बाहेर असलेल्या मंदीरच्या बाजुने गेल्यास खाडीच्या बाजुची तटबंदी आणि बुरुज अजुनही शाबूत आहेत. बाकी फक्त जंगल आणि झाडी. 

 सर्जेकोट प्रवेशद्वार आणि तटबंदि :- 



सर्जेकोट संपवून मग आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने निघालो. किल्ले निवतीला जाण्यासाठी आम्हाला परुळ्यातुन जायचे होते. नुसार आम्ही पुन्हा मालवण - चिपी - परुळे अशा प्रवासाला लागलो.  या वाटेवर कुठेतरी माझ्या निकॉन कॅमची लेन्स कॅप पडली ती माझ्या चिपीला आल्यावर लक्ष्यात आलं. असो. इथे कापावर एक सुंदर फ्रेम मिळाली. पण त्य टेंपो ट्रॅव्हलरच्या जागी एसटी असली असती तर ती फ्रेम अजुन खुलली असती. 


आम्ही परुळ्याला पोचलो तेव्हा साडेचार वाजले असतिल. तिथल्याच एका हाटेलात मस्त चहा मारला. इतक्यात समोरुन कुडाळ - किल्लेनिवती बस निवतीच्या दिशेने गेली. चहा संपल्यावर आम्ही पण निघालो. परुळे हा माझा गाव. पण शाळेसाठी मी माझ्या मामाच्या गावी असायचो आणि सुट्टी पडली की इथे यायचो. पण माझं मन इथे कधी लागायचं नाही. परुळे हा अतिशय निसर्ग संपन्न गाव. कर्ली नदी, भोगवे बीच, देवबाग, तारकर्ली यामुळे अजुनच खुलून दिसणारा. पण लहानपणी म्हणजे दहावी होईपर्यंत मल ह्या जागा फक्त ऐकून माहीत होत्या. आणि आज मी तिथे मनसोक्त उंद्डत होतो. परुळ्यातुन एक छोटा घाट चढुन आम्ही सड्यावर आलो. काहीवेळाने दोन रस्ते दिसतात. किल्लेनिवतीसाठी डावी मारायची आणि भोगवेसाठी उजवीकडे. आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने वळलो. काही वेळाने मघाशी बाजारातुन किल्ले निवतीला जाणारी बस इथे आम्हाला दिसली. तिच्यामागोमाग आम्ही किल्लेनिवतीला पोचलो तेव्हा पाच वाजले होते. तिथुनच किल्ल्याकडे जाणारा कच्चा गाडी रस्ता आहे. बाईक रेमटावत आम्ही किल्ल्यावर पोचलो आणि डाव्याबाजुला असलेल्या विहंगम निवती किनार्‍याचे दर्शन होताच हरखुन गेलो. अतिशय सुंदर असा हा किनारा इथुन किती सुंदर दिसत होता म्हणुन सांगू. 


यावेळी नकाशा नव्हता मग थोडं चढुन गेल्यावर झाडीतुन डोकावणारी तटबंदी दिसली. तितून आत शिरलो तर फक्त झाडीच झाडी पुढे काही दिसेना. त्या झाडीतुन वाट काढत उजवीकडे गेलो आणि एका मोकळ्या पठारावर आलो. बाजुला एक जंग्या बुरुज दिसला. तिथुन पुढे चालत आलो आणि समोरचं दृश्य पाहुन थबकूनच गेलो. समोर भोगवेचा किनारा शांतपणे पसरला होता. आम्ही बसलो ती जागा किती तरी शान्त होती. आवाज फक्त वार्‍याचा होता. कितीतरी वेळ आम्ही तिथे बसलो होतो. समोरच्या किनार्‍यावरुन नजर हटतच नव्हती. दुरवर अस्पष्टसा सिंधुदुर्ग दिसत होता. 







तिथुन उठावसं वाटत नव्हतं पण पुढे ४० किमी परतीचा प्रवास बाईकवरुन काळोखात होता. म्हणुन जरा घाई करुन निघालो. सुर्य एव्हाना पश्चिमेकडे कलला होता. सुर्यास्त टीपायचा होता पण घाई करुन घरी पोचणं गरजेचं होतं. तिथुन उठलो आणि पुन्हा त्या मोकळ्या पठारावर आलो आणि तिथे अजुन एक बुरुज दिसला. नकाशा नसल्याने किल्ला समजत नव्हता. मग त्या बुरुजाच्या मार्गाने गेलो. तिथे एक छोटंसं टाकं दिसलं जे झाडीने व्यापले होते. तिथुन एका आतमध्ये शिरलो आणि कळलं की खरं किल्ल्याचं वैभव इथे होतं. आम्ही त्या डावीकडल्याच बुरुजावरुन निघणार होतो. इथे किल्ल्याचे बरेचसे अवशेष आहेत. हा बालेकिल्ला असावा. इथुन पुढे टोकावर गेल्यावर फक्त समुद्रच समुद्र दिसतो.  बालेकिल्यावर अजुनही तटबंदी, प्रवेशद्वार, देवड्या आहेत. इथुन खाली समुद्रकिनार्‍यावर काही नारिंगी रंगांचे खडक दिसतात. समोर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे समुद्रात असलेले दीपगृहही दिसते. इथे सुर्यास्त टीपून आम्ही परतीच्या मार्गाने निघालो. 

बालेकिल्ला 

सुर्यास्त :) 



काळोख पडलाच होता. पुन्हा त्या मार्गाने सड्यावरुन जाताना आता थंडी जाणवत होती. परुळ्यात उतरुन पुढे कुठेही जास्त वेळ न थांबता वेंगुर्ला बंदरावर जाउन बसलो तेव्हा साडे आठ वाजले होते. बंदरावर ताजे मासे घेउन कोळणी विकायला बसल्या होत्या. तिथे थोडावेळ बसुन मग घरी पोचलो. जाउन -येवुन १५० किमीचा प्रवास झाला होता. ५ रु./किमी या रेटने ७५०/-  रु. झाले होते. मध्येच आम्ही २००/- रु. पेट्रोल भरलं होतं त्याचे वजा करुन पाचशे रु. आम्ही बाईकवाल्याला दिले. आणि घरी परतलो. आजचा दिवस मस्तच झाला होता. एकुण चार किल्ले बघुन झाले होते खर्चही आटोपशीर होता. दुसर्‍या दिवशी गावच्या एका देवीची श्री खाजणादेवीची जत्रा होती. पण आमच्या प्लॅनप्रमाणे रेडीचा गणपती, यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला, सावंतवाडी असा प्लॅन होता....


8 comments:

  1. खरच खूप मस्त प्रवास वर्णन केल आहेसं

    ReplyDelete
  2. भारीच ..... इनो घेतल्या गेले आहे :) :)

    ReplyDelete
  3. जबरी... भोगवे किनार्‍याचा फोटो एकदम भारी आणि म्हावर्‍याचा ताट म्हणजे बोलायचेच काम नाही... फक्त हाणायचे... ;-)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्स सिद्धु :)
      अरे त्या म्हावर्‍याच्या ताटाचे फोटु फक्त दाखवायपुरते रे !

      Delete
  4. दीपक, फारच छान रे! फोटो आणि वर्णन खूप आवडले. कृष्णधवल फोटो मस्त! :) :)

    ReplyDelete