Tuesday, December 17, 2013

कोंकणसफारी - किल्ले विजयदुर्ग


गावच्या जत्रेला जायचा योग यावर्षी तब्बल १७ वर्षांनी जुळून आला होता. मी आणि आई दोघेही; मी नववीत असताना जत्रेला गेलो होतो त्यानंतर कधी जमलंच नाही. मुंबईला आल्यावर जत्रेला जायची खूप इच्छा असायची पण कधी अभ्यासामुळे तर नंतर कधी कामामुळे जमत नव्हतं. यावेळी जमलं. जत्रा विकांताला होती. मग विचार केला की गावी जातोयच तर जरा व्यवस्थित फिरुन पण घेउ. गावी दहा वर्षे होतो पण त्यावेळी शाळेमुळे कुठे धड फिरायला मिळाले नव्हते. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वेंगुर्ला बंदरावर कधी गेलो नव्हतो. नेहमी एस.टी.तुन प्रवास करताना बस वेंगुर्ल्याच्या डोंगरावर आली की बसमधुन वेंगुर्ला बंदराचे विहंगम दृश्य दिसायचं फक्त १०-१२ सेकंदासाठीच. पण ते बघयालाही मी तेव्हा जाम धडपडायचो. यावेळी विचार केला की कोकणातलं जे काही फिरायचं, बघायचं राहुन गेलयं ते यावेळी बघून घ्यायचं. को़कणात फिरण्यासारख्या जागा म्हणजे नितांत सुंदर समुद्र किनारे. लखलखत्या वाळूचे, चमचत्या हिरव्यागार पाण्याचे, खार्‍या वार्‍यावर डोलणार्‍या माडांचे. समुद्र म्हणजे जीवसखा. पण यावेळी ओढ होती ती समुद्रावर आसणार्‍या ऐतिहासिक किल्ल्यांची. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. किल्ले निवती, यशवंतगड वैगरे लिस्टवर होते. मग ठरवलं आणि निघालो. सोबतिला सचिन पाटील हा माझा मित्र होता. बुधवारी ४ डिसेंबरला पनवेलहुन जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चेक इन केलं. गावी जायला ही ट्रेन मी नेहमी प्रेफर करतो. फक्त ६ तासांत मुंबईहुन कुडाळ. सकाळी पावणे सातला पनवेलहुन ट्रेन पकडली आणि १२:४५ ला कुडाळला हजर. कुडाळला माझा मावशी राहते. तिला अगोदरच सांगुन ठेवलं होतं त्याप्रमाणे तिने मच्छी कढी करुन ठेवली होती. :)

दुपारी तिथे मस्त जेवून पुढच्या प्रवासाला म्हणजे वेंगुर्ल्याला जायला निघालो. त्यादिवशी कुडाळचा बाजार होता त्यामुळे एसटीला गर्दी असणं साहजिक होतं. पण इतकीही गर्दी नव्हती. कोकणात बराच विकास झालेला दिसतो. बहुतांश लोकांकडे आता स्वत:ची वाहनं झालीत. कुडाळहुन वेंगुर्ला एसटी स्टँडवर उतरलो. एके काळी हा एसटी स्टँड नेहमी गजबजलेला असायाचा. आता तिथे कुत्रंही  नव्हतं. असो. 


वेंगुर्ल्याहुन मग पालला पोचलो तेव्हा सुर्य केव्हाचा बुडाला होता. जेउन लवकर झोपी जायचं होतं कारण दुसर्‍या दिवशी प्लॅनप्रमाणे उठुन विजयदुर्ग गाठायचा होता. पहिल्या दिवशी विजयदुर्ग, कुणकेश्वर आणि जमल्यास देवगडचा किल्ला असा प्लॅन होता. प्रवास एसटीनेच करायचा होता त्यामुळे एका दिवसात एवढं सगळं अशक्य होतं, कारण विजयदुर्ग वेंगुर्ल्यापासुन ११८ किमी आहे. आणि इतक्या लांब बाईक मारणं जमलं नसतं म्हणून आम्ही एसटीनेच जायचं ठरवलं. रुट थोडा कन्फ्युझिंग होता कारण कुणालच धड माहित नव्हतं की तिथे कसं जायचं ते. जिल्ह्याच्या एका टोकाला असल्याने आमच्या घरातल्यापैकी कुणाचाच जास्त संबंध नव्ह्ता. त्यात वेंगुर्ल्याहुन पहिली बस साडे सहाची होती जी गाठणं अशक्य होतं.

गुरुवारी ५ डिसें. ला सकाळी शक्य तितक्या लवकर उठलो. मामा आम्हाला वेंगुर्ला एसटी स्टँडवर सोडायला आला. वेंगुर्ल्याहुन कुडाळपर्यंत एसटी मिळाली. कुडाळला साडे नउला पोचलो. कुडाळहुन ताबडतोब देवगडला जाणारी एसटी मिळाली. विजयदुर्ग देवगडपासुन जवळच आहे. मला तीच एसटी कन्टीन्यु करायला हवी होती. पण विजयदुर्गाला जाण्यासाठी कुठे उतरु अशी विचारणा कंडक्टरला करायची दुर्बुद्धी मला झाली आणि पुढे सगळा घोळ झाला. घोळ इतका भयंकर की जिथे त्याच एसटीने आम्ही २-३ तासांत विजयदुर्गला पोचलो असतो तिथे आम्हाला तब्बल साडेपाच तास लागले. मी कंडक्टरला विचारल्यावर त्याने असा चेहरा केला की जणु मी त्याला दिल्लीच्या निवडणुकीच्या रिझल्टबद्दल त्याला काय वाटतं असं विचारलं असं वाटलं. त्याने सल्ला दिल्ला की तुम्ही कणकवलीला उतरा. तिथे चौकशी करा की विजयदुर्गला बस आहे का ते. मग आम्ही कणकवलीची तिकिट्स घेतल्या आणि तासाभरात कणकवलीला उतरलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की विजसयदुर्गासाठी पुढली बस दीड वाजता आहे. आणि कणकवलीहुन विजयदुर्ग तब्बल ७४ किमी. आहे. मग पुन्हा मी त्या कंडक्टरकडे आलो आणि त्याने आम्हाला दुसरा सल्ला दिला. तुम्ही इथुन दुसरी बस पकडा आणि तरेळेला उतरा तिथुन विजयदुर्गसाठी चांगली फ्रिक्वेन्सी आहे. त्याला अजुन दोघा तिघांनी दुजोरा दिला. 


कणकवलीहुन वैभववाडीला जाणारी एसटी पकडली आणि पुढल्या अर्ध्या तासात तरेळेला पोचलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की विजयदुर्गसाठीची एसटी बाराला होती. तोवर हलकं फुलकं खाउन घेतलं. उन चांगलच माथ्यावर आलं होतं. कधी एकदा विजयदुर्गला पोचतो असं झालं होतं. कारण आतापर्यंतचा वेळ लक्ष्यात घेता घरीसुद्धा परतायचं होतं. बाराला विजयदुर्गला जाणारी एसटी आली आणि आम्हाला हायसे वाटले. तरेळेहुन विजयदुर्ग ५२ किमी आहे. मी अंदाज बांधला किमान एक दिड तासांत आम्ही विजयदुर्गाला पोहचु. पण 'गाव तिथे एसटी' असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाला ते मान्य नव्हतं. 

एसटी सुरु झाली आणि आम्ही विजयदुर्गचं तिकिट घेउन मार्गस्थ झालो. कोकणातल्या नागमोडी वळणावरुन एसटी धाउ लागली. एकएक गाव घेत नंतर एसटी कापावर आली आणि भरधाव धाउ लागली. माझे डोळे नुसते पश्चिमेकडे लागले होते की कधी एकदा समुद्राचे दर्शन होते. पण बराच वेळ एसटी नुसती कापावरुन धावत होती. नंतर ती एका घाटातुन खाली उतरत होती. घाटवळणातुन खाली उतरत असताना खाली पायथ्याला एक सुंदर नदी नागमोडी वळणं घेत आमच्यासोबत लपाछपी खेळत होती. एसटी जसजशी त्या नदीच्या जवळ येत होती तसतशी ती नदी अधिकच सुंदर दिसत होती. त्या नदीचं सौंदर्यात मुग्ध होउन आम्ही इतका वेळचा प्रवासाचा शीण विसरलो होतो. एसटी मणचे या गावी जाउन थांबली ती अगदी नदीच्या किनारीच.  तिथुन एसटी निघाली. वाटलं आता थेट विजयदुर्गला जाउ पण वाटेत अजुन एक गाव होतं आणि एसटीला तिथेही जाणं भाग होतं. मणचेतुन एसटी मुटाट या गावी थांबली. तिथे काही शाळेची मुलं चढली. आता मला कंटाळा यायला लागला होता. तरेळे-मणचे-मुटाट-पडेल तिठा असं मजल दरमजल करत जेव्हा एसटी विजयदुर्गाला पोचली तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. विजयदुर्ग जेट्टीच्या बाजुने एसटी उतरत असताना समोर वाघोटन खाडी विसावली होती आणि डाव्याबाजुला असलेली घरे, दुकाने दुपारच्यावेळी निपचीत पडली होती. 




आम्ही स्टँडवर पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. इथुन परतीच्या गाड्या साडे तीन आणि शेवटची देवगडला जाणारी एसटी साडे चारला होती. जराही वेळ न दवडता आम्ही किल्ल्याच्या दिशेने चालु लागलो. सकाळपासुन आराम करणारा कॅम मी बाहेर काढला आणि खाडीच्या किनार्‍यावरल्या तटबंदीकडुन चालत किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोचलो. मुख्य दरवाज्याला असलेले उत्तुंग बुरुज आकाशाला भिडत होते. 

    विजयदुर्ग किल्ला :-


     तटबंदी





ट्रेक क्षितिजच्या कृपेने किल्ल्याच्या नकाशाची कॉपी होती. त्याप्रमाणे किल्ला बघायला सुरुवात केली. दरवाज्यातुन प्रवेश करताच खाली दिलेल्या नकाशाप्रमाणे पूर्वेच्या दरवाज्यातुन शिरुन उत्तरेकडल्या तटबन्दीवरुन चालायला सुरुवात केली. विजयदुर्गाचं मुख्य आकर्षण म्हणजे समुद्राच्या पोटात असलेली ती संरक्षक भिंत. एनीवेज ती भिंत काही दिसणार नव्हती पण या भिंतीबद्दल बरचं काही वाचलं होतं. श्री निनाद बेडेकर यांचं  "विजयदुर्गाचं रहस्य" नावाचं एक पुस्तक आहे. त्यात त्या अद्वितिय संरक्षक भिंतीबद्दल आणि विजयदुर्गाच्या इतिहासाबद्दल बरीचशी माहिती आहे. महाराजांच्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून विजयदुर्ग प्रसिद्ध आहे. किल्ल्यापासुन दोन किमी अंतरावर गिर्रेवाडीत ३५० वर्षांपूर्वीचा जहाजे बनवण्याचा कारखाना म्हणजे गोदी आहे.

विजयदुर्ग नकाशा :- साभार http://trekshitiz.com/







 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल देवगड तालुक्यात 'विजयदुर्ग' हा अतिशय बळकट किल्ला उभा आहे. तिन्ही बाजुनी पाणी आणि एका बाजुला खुष्कीचा मार्ग, अशी भौगोलिक रचना असल्याने हा किल्ला नैसर्गिकरित्या बेलाग झालेला आहे. विजयदुर्गाची बांधणीही रेखीव आहे. एका पाठोपाठ एक अशी तिहेरी तटबंदी किल्ल्याला अधिकाधिक मजबूत जरत आहे. यातिल काही बुरुज तर चक्क तिन मजली आहेत. विजयदुर्गाला छुपे दरवाजे आहेत. त्यातलाच एक आहे जिभीचा दरवाजा. जिभी म्हणजे लाकडी दरवाज्यापुढे रचलेली दगडांची तटबंदी.ह्याला हस्तीनख असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी म्हाराजांनी विजय संवत्सरात 'गिर्ये' गावानजिकचा हा दुर्ग जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण केलं, 'विजयदुर्ग'. गिर्याचा किल्ला म्हणून ह्या दुर्गाला 'घेरिया' असेही म्हणतात.

शिवाजीमहाराजांनंतरच्या कालखंडात कान्होजी आंग्रे ह्यांच्याकडे मराठी आरमाराचे अधिपत्य आले. विजयदुर्गही आंग्र्यांच्या ताब्यात आला. आंग्र्यांचं आरमार दर्यावर आपला वचक ठेवून होतं. ते बुडविण्यासाठी डच आणि विशेषतः इंग्रजांनी अथक परिश्रम केले; ते आंग्र्यांनी हाणून पाडले.

आमच्याकडे वेळ कमी होता. आमहाला काही करुन साडे तीनची एसटी पकडायची होती. पण किल्ल्याचं सौंदर्यच असं काहीसं होतं की पावलोपावली तटबंदीवरुन चालताना फोटो घेत होतो. 







गणेश बुरुजावरुन दुपारच्या उन्हात विजदुर्गाचा किनारा शांत पहुडला होता आणि समुद्राच्या लाटा एका संथ लयीत त्याला थोपटवत होत्या. 


   वाघोटन खाडी आणि विजयदुर्ग जेट्टी :-


पुछे चालत चालत दर्या बुरुजापर्यंत आलो तेव्हा तिथे तटबंदीला खिंडार पडलं होतं आणि त्याच्या डागडुज्जीचं काम सुरु होतं. 










पुढे शाह बुरुजावर चढुन पुन्हा दक्षिणेच्या तटबंदीवरुन चालत चालत निघालो. इथुन तो विशाल समुद्र दुपारच्या उन्हात अतिशय तेजस्वी दिसत होता. कितीतरी वेळ फक्त त्याला पाहत राहीलो. 




एव्हाना तीन वाजत आले होते. गड पाहुन झाला होता. वेळेअभावी खूपच धावती भेट झाली होती पण नाकाशाप्रमाणे सगळा किल्ला बघुन घेतला. पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी आलो तेव्हा तिथे हे तोफेचे गोळे ओळीत ठेवले होते. 


किल्ला पाहुन आम्ही पुन्हा एसटी स्टँडवर आलो. बस यायला अजुन अवकाश होता. आणि मला किल्ल्याचे बाहेरुन म्हणजे जेट्टीवरुअन काही फोटो घ्यायचे होते. 




फोटो घेउन झाल्यावर काहीतरी खायला म्हणुन आम्ही शेजारच्या हाटेलात शिरलो. तितक्यात बस आली. आम्ही ऑर्डर कॅन्सल करणार होतो इतक्यात हॉटेलच्या मलकवजा असलेल्या युवकाने आम्हाला माहिती पुरवली की शेवटची बस साडेचार वाजता आहे आणि ही साडे तीनची बस दुनियादारी करत तरेळेला पोचणार होती. तरेळेचं नाव ऐकताच अंगावर पुन्हा काटा उभा राहिला. तो अडीच तीन तासांचा प्रवास पुन्हा नको होता आम्हाला त्यापेक्षा देवगडला जाउन तिथुन कणकवली किंवा कुडाळ पर्यन्त तरी पोचता आले असते. आम्ही पहिल्यांदा तिथे मिसळ आणि डोनट्स आणि चहा खाउन घेतलं आणि बाहेर पडलो. 



देवगड एसटीला अजुन अवकाश होता म्हणुन मग अजुन फोटोज घेतले. मग कंठाळा आला म्हणुन चालत चालतवर विजयदुर्ग डेपोला येऊन बसलो. 







साडेचारची एसटी सव्वापाचला आली. या एसटीने थेट देवगड न गाठता जामसंडे या गावी उतरुन तिथुन पुन्हा नांदगाव तिठ्यापर्यंत पोचा, नांदगाव हे मुंबई - गोवा महामार्गावर असल्याने तिथुन कुडाळ-सावंतवाडीकडे जाणार्‍या गाड्या मिळतिल असा मोलाचा आणि अचूक सल्ला विजयदुर्गातलया एला देवमाणसाने दिला. 







त्याप्रमाणे आम्ही सहाच्या सुमारास जामसंडेला उतरलो. विजयदुर्ग ते जामसंडे २०-२५ किमी. तिथुन लागलीच देवगडहुन पुण्याला जाणारी एशियाड मिळाली. जामसंडे ते नांदगाव ३५ किमी. नांदगावला पोचलो तेव्हा सात सव्वासात झाले होते. तिथेच एका दुकानात कोकम सरबत मारला. आणि दुकानदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे कणकवलीला जाणार्‍या एसटीची वाट बघत उभे राहिलो. काही वेळाने एक एसटी आली. तीत बसलो आणि आठवाजता कणकवलीला उतरलो. नांदगाव ते कणकवली १६ किमी. आता आम्ही हुशार झालो होतो. कणकवलीतुन कसंही वेंगुर्ल्यापर्यन्त पोचलो असतो. नाहीच तर कुडाळपर्यंत तरी नक्की पोचलो असतो. आणि उशीर झालच असता तर कुडाळला मावशीकडे राहिलो असतो. पण तसं काही झलं नाही. कणकवली एसटी स्टँडवर चौकशी केली तेव्हा कळलं की पुणे - वेंगुर्ला ८ ची गाडी अजुन आली नव्हती. डायरेक्ट वेंगुर्ल्यापर्यन्त बस असल्याने काळजीच मिटली. 


परतीच्या प्रवासात आम्ही विचार करत होतो की जर सकाळची ती देवगड एसटीच कंटिन्यु केली असती तर किती तरी वेळ वाचला असता आणि निदान कुणकेश्वराचं दर्शन तरी झालं असतं. पण प्रवासादरम्यान मणचे गावात  त्या नदीच्या रूपाने का होईना फार बरं वाटलं होतं. पण एक मात्र आहे की विजयदुर्ग आणि आसपासच्या परिसरात भटकण्यासाठी स्वत:चं वाहन असणं फार आवश्यक आहे. 

सव्वा आठला पुणे-वेंगुर्ला एसटी कणकवलीहुन पकडली आणि दिवसभराच्या थकव्यामुळे विंडो सीटला डोके टेकउन डोळे मिटुन घेतले. पावणे दहाच्या सुमरास बस वेंगुर्ला पावर हाउस पाशी थांबली. इथुन रिक्शा करुन घरी पालला जायचं म्हणुन रिक्षाला विचारायला गेलो तर त्याने सहा किमी साठी दिडशे रुपडे सांगितले. शेवटी मामाला फोन केला तो बाईक घेउन आम्हाला घ्यायला आला. घरी पोचलो तेव्हा साडे दहा - अकरा वाजले असतिल. दिवसभरच्या प्रवासाची गंम्मत सांगत, जेउन आम्ही झोपी गेलो कारण दुसर्‍या दिवशी सिंधुदुर्ग, राजेकोट, सर्जेकोट, किल्ले निवती असा प्लॅन होता....

12 comments:

  1. सुंदर... अप्रतिम... भारीच !!

    एकूण शब्दांकन भन्नाट आणि त्यात फोटोची खमंग मेजवानी. मज्जा आली भावा... :) :)

    ReplyDelete
  2. जले पे नमक ! ;) :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. देश का नमक :p
      तुला खूप मिस्ड केले यार तिथे :)

      Delete
  3. दादा मस्तच रे.
    कोकण एक अतृप्त स्वप्न आहे, कधी पूर्ण होत माहित नाही.
    पण लिखाण मस्त झालाय. आणि फोटोहि भन्नाट आलेत.. :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्स सागर.
      अरे जाउया की पुन्हा. कोकण आपलाच आसा :)

      Delete
  4. अहा वर्णन... मस्त फ्रेश फ्रेश फोटोज ....
    :)

    ReplyDelete
    Replies
    1. सखी गं....
      आभार आभार :) :)

      Delete
  5. अगली बार पुरी पिल्याणिंग के साथ जाने का रे भाऊ... टायम खोटी नही कर ने का ;-)

    ReplyDelete
    Replies
    1. हां रे भई! बहुत टायम बैंगनमें गया.. अगली बार पुरी पिलॅनिंगके साथ जाते रे !

      Delete
  6. जबरदस्त! फोटो सुंदरच! छ्या.. काश मलाही यायला मिळाले असते या टूरवर.... ह्म्म्म.!

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासुन आभार श्रीताई.
      हो यार सगळे असते तर खूप मज्जा आली असती. आम्ही खूप मिस्ड केले तुम्हा सगळ्यांना

      Delete