Monday, December 30, 2013

कोकणातलो धयकालो (जत्रा)

                   धयकालो म्हंजे सिंधुदुर्गातल्या लोकांचो जीव की परान. दिवाळी सोपली काय एका महिन्यात सिंधुदुर्गातल्या बर्‍याच गावांत ग्रामदेवतेची सालाबाद जत्रा असता आणि ह्या जत्रेची जी काय मजा असता ना गाववाल्यानु ती अशी सांगान नाय समजाची तुमका, काय कळला? त्यासाठी एकदा तरी सिंधुदुर्गातल्या गावात जावन ही जत्रा बघुक व्हयी. जत्रेत काय तर, मालवणी खाज्याच्या दुकानापासुन, भज्याची दुकाना, न्हान पोरां-टोरांसाठी खेळण्याची दुकाना, फुगेवाले, पेपारेवाले, सोरट्वाले, लोकांची गजबज, नटान थटान इलेली बालमानसा (स्त्रीया),आरड हुएल घालणारी पोरा, भज्यांचो सुटलेलो वास आणि कुडकुडणार्‍या थंडीत चादर घेउन रात्रभर बघूचो दशवताराचो खेळ! एक दोन दिस चलणारी ही जत्रा म्हंजे कोकणातल्या लोकांचो वार्षिक सण! बाकी कोकणात जितकी मजा चतुर्थीच्या सणाक तितकीच ह्या धयकाल्याक! 

काय? येतास जत्रेक? चला तर मग देखवतय तुमका आमच्या गावची जत्रा... 

              खरा सांगाचा तर आता जत्रेक पयल्यासारखी मजा नाय रवली.आता गावाक सगळ्यांकडे टीव्ही, मोबायल झाले. तेवा आताच्या पोरांकासुध्दा या जत्रेविषयी इतको इंट्रेस्ट नसता.जुने जाणते देवाचा काम समजान अजुन पर्यत आपले करतत. तर असो. जत्रेच्या दिवशी दुपारपासुनच देवळाच्या आजुबाजुक दुकाना लागाक सुरवात होतत.लाउडस्पिकरावर सकाळपासुन देवाची गाणी लागलेली असतत. देवळाक मस्त लायटींग केलेली असता. संध्याकाळ झाली की हळूहळू देवळाकडे लोका जमाक सुरु होतत.तर आम्ही सुद्धा जेवन खावन देवळाकडे जावच्या तयारीक लागलो. या दिवसात गावाकडे मरनाची थंडी असता तेव्हा अपली स्वेटर आणि शाल घेउन आम्ही देवळाकडे जावक भायर पडलो. आमच्या गावात दोन देवळा आसत. त्यामुळे लागोपाठ दोन दिवस जत्रा असता. पयली जत्रा श्री खाजणादेवीची आणि दुसरे दिस श्री भुमिकादेवीची. आम्ही देवळाकडे पोचलो. आधी सांगलय तशी देवळाकडे दुकाना लागली होती. पेट्रोमॅक्सच्या दिव्यात दुकाना झगमगान गेली होती. रात्रीच्या येळाक लायटींग केलेला देउळ मस्तच वाटत होता. 




                 पन पयल्यासारखी गर्दीच नाय. लोका आपली येत आणि देवीची ओटी भरुन, वायच हडे-थडे फिरान, चाय भजी खावन आणि खाजा, लाडु असा इकत घेवन घराकडे जात होती. आम्ही सुद्धा देवळात जावन देवीची ओटी भरली आणि जत्रेत फिराक सुरवात केली. फिरता फिरता माका माझ्या न्हानपणीची जत्रा आठवत होती. माझा न्हानपण गावात गेल्यामुळे माका या जत्रेचा लय याड. न्हान असताना जत्रेच्या दिवशी आम्ही सगळी पोरा खूप मजा करुचो. त्यादिवशी नवीन कपडे घालुन आम्ही जत्रेक जावन वायच आकडाक गावता म्हणुन मिरवायचो. वगीच खेळण्याच्या दुकानावर गर्दी करुचो. घरातल्यानी दिलेल्या पैशांचो एखादो फुगो, ट्रक, गाडी, पिरलुक (शिट्टी),पेपारी (पिपाणी) घेवन वाजवत फिरायचो. पन सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्ही सगळेजण जमून असलेल्या पैशांतून खेळण्याच्या दुकानातुन ३-४ रबरी लाल बॉल घ्यायचो. आमका क्रिकेट खेळाक कधी धड बॉल नसायचे आणि वेंगुर्ल्याक जावन आमका बॉल आणुन देणारे कोन नाय होते. मग जत्रेक आम्ही पैशे जमवुन बॉल घ्यायचो आणि मग १-२ महिने आमका खेळाक गावायचा.

     मगे कोणीतरी येवन आमका चाय भजी खावक घेवन जायत. जत्रेत गावणार्‍या भज्यांचो स्वाद कधीच खयच्या भज्यांका येवचो नाय. आजुन ती चव जिभेर रेन्गाळली काय तोंडाक पानी सुटता. तर मग आम्ही हडे-थडे फिरान, शाळेतल्या मुलींसमोर ( ती सुद्धा नवीन कपडे घालुन आकडान दाखयत ) व्हायच शायनींग मारुन आम्ही दशावताराचो खेळ बघुनक देवळात जावन बसायचो, तेवा खुप दमाक झालेला असायचा आणि दशावतारी देवीची पालखी निघाल्यावर म्हण्जे बारा - एक वाजता खेळ करुन उभे रवत, तवसर आमची मध्यान रात झालेली असायची. त्यामुळे माका ह्या दशावतारी नाटक कधी पूर्णपणे बघुकच गावला नाय. पण या वेळी बर्‍याच वर्सानी माका जत्रेक येवक गावला होता आणि माका दशावताराचो खेळ बघुचोच होतो. तर जत्रेत फिरान झाल्यावर घरातल्यानी खाजा-बिजा घेतल्यानी आणि चाय भजी खावन झाली तवसर ११ वाजले. मगे मामा-मामी, माझी आई आणि बहिण घराकडे गेली मी आणि सचिन देवळाकडे रव्हलो. सचिन खास जत्रा बघुक माझ्याबरोबर माझ्या गावाक इलो होतो.

               दशावतारी उभे रवाक अजुन खूप येळ बाकी होतो. अजुन देवीची पालखी सुद्धा निघाक नाय होती. तवसर मी कोन जुने मित्र दिसतत काय म्हणुन बघत फिरत होतयं. काही वेळान देवीची पालखी निघाली. पालखी देवळाभोवती फिरवन झाली, देवीची आरती आणि गार्‍हाणी घालून झाली हुनासर बारा वाजत इले. आता लोका देवळात जमाक सुरुवात झाली कारण दशावतार सुरु होनार होतो. ह्या नाटक करुक दशावतारांची पार्टी बोलवली जाता. आमच्या देवळात सालाबादप्रमाणे चेन्दवणकरांची पार्टी येता. तशी सिंधुदुर्गात नउ दशावतार पार्टी आसत. पार्सेकर, वालावलकर, चेन्दवणकर, नाईक-मोचेमाडकर वैगरे.दशावताराचा नाटक ह्या देवळातच केला जाता. थोड्याशा जागेत एक बाकडो टाकतत. ह्योच तेंच स्टेज आणि ह्याच त्यांचा सिंवासन. दशावतार्‍यांका रंगाच्यासाठी ( मेक अप) एक खोली असता. तिथुनच ते रंगांन येतत आणि आपलो प्रवेश सादर करतत. ह्येंका स्वतःचो मेकअप स्वत:च करुचो लागता. 



            



          
             नाटकाक संगित म्हणजे एक पेटीवालो, पखवाजवालो, आणि एक झांजवालो इतकेच. ह्या संगित आणि ही कला वर्षानुवर्षे कोकणातल्या लोकांची आवडती कला आसा. तर पयलो प्रवेश असता गणपती आणि रिद्धी सिद्धीचो. पखवाजलो गायन सुरु करता आणि गणपती रिद्धी सिद्धीवांगडा प्रवेश घेवन येता आणि तेंचो नाच सुरु होता.

पतीया तुझे नाम स्मरणे हो गण
पतीया तुझे नाम स्मरणे हो गण
गणपतीया तुझे नाम हे जित्मां ता थया था..... 


           नाच सोपल्यावर मग एक भटजी येता आणि गणपतीची पुजा करुक सुरुवात करता. खरा तर ह्यो भटजी पुजा करताना मालवणी भाषेत लय कॉमेडी करता पन लोकांच्या गोंगाटात काय धड आयकाक येना नाय. यावेळी भटजी आणि नाईक ( सुत्रधार पखवाजवाला) हेंचो संवाद रंगता. कित्येक वर्सा झाली हे संवाद आजुन बदलाक नाय पण त्यावेळी ते मजेशीर वाटतत. भटजी सांगता, नाईक, गणपतीची पुजा करायची आहे पण साहित्य नाही. साहित्य नाही तर मग चालीवर घ्या. मगे भटजी गणपतीक न्हावक घालताना बुडुबुडू चुळूचुळू असो आवाज काढुन न्हावक घालता. पूजाअर्चा झाली आता नैवेद्य?? तो पन समजून घेवा असा सांगान येळ मारुन न्हेता. मगे भटजी गनपतीची आरती गावक सुरुवात करता. मालवणीतील हे आरती लय कॉमेडी वाटता, बघा तुमका समाजता काय ती..

हेची आवस खिलोरी,बापूस खट्याळो I
काय नाय हेका, भाव शेंड्याळो II
फडफड्या कानाचो, एक दिसता सुळो I
खाजीच्या कामास भारी हुळहुळो II
थयथय थयथय नाचता,
पोरगो शिवल्याचो I
बसाक दिलो ह्येका राजा उंदराचो II
जयदेवा जयदेवा जय कानसुर देवा I
भक्तिभावान करतय मी तुझी सेवा II
चार हात एक स्वांड, आठ तुझे बायलो I
तुया दिसतयं बरो,
पण वायट तुझो खायलो II

                त्यांनर, देवासमोर फुगडी घालतत, उन्दराची आरती होता आणि मगे पुन्हा नाचान गणपती, रिद्धी सिद्धी आणि भट्जी एझ्जिट मारतत. त्यांनतर पखवाजवालो पुन्हा गळो फाडुन सरस्वतीचा स्मरण करता आणि मोरावर बसुन सरस्वती येता. ती मोरावर बसान कशी येता ह्या तुमका ह्या फोटुत दिसता ना? तर सरस्वती येता आणि नाचान परत जाता. 



   दशावतारात अजुनसुध्दा स्त्रीपात्र पुरुषच करतत. रिद्धी सिद्धी आणि सरस्वतीचा काम करणारो नट एकच असता. त्यांचा काम संपला काय मग ते एक थाळी (आरती) घेउन जत्रेत लोकांकडुन पैसे जमा करुक फिरतत. त्येंका "बिलीमारो" म्हणतत. या बिलिमारो या शब्दाचो अर्थ नेमको काय तो मात्र माका ठावक नाय. पण गावांत एखाद्या चेडमानूस किंवा एखादो पोर उगाच तोंडाक पावडर फासुन आणि मेक अप करुन शयनिंग मारत फिराक लागले काय लोक त्यांका बिलिमारो म्हणून चिडवतत. 


         त्याच्यानंतर शंखासुराचो प्रवेश असता. गणपती, भटजी, सरस्वति आणि शंखासूर हे प्रवेश ठरलेले असतत. आणि प्रत्येक नाटकात सगळा सेमच असता. शंखासुराचो प्रवेश मजेशीर असता. दैत्याचो गेटअप करुन शंखासुर आरडत येता. संकासुराचे कपडे काळे असतत. तोंडावर काळी टोपी कशी असता. डोळ्यांच्या जागी दोन भोका पाडलेली असतत तेका दिसाक व्हया म्हणुन नायतर खयतरी आपटान पडात. लाल रंगाची जीभ भायर लोंबत असता. असो तो दैत्य आरडत प्रवेश घेता. आता संकासुर आणि नाईक यांच्यात संवाद रंगता. बाकड्यावर ब्रम्हदेव समाधी लावन बसलेलो असता. संकासुर शंकराचो भक्त असल्याने पहिल्यांदा न्हावन घेता आणि शंकराची पुजा करता. संकासुर बाकड्यार बसलेल्या ब्रम्हदेवाची मालवणी भाषेत टिंगल करता आणि त्याचे वेद चोरुन घेवन जाता. मगे विष्णू येता. ब्रम्हदेव तेका सन्कासुरान वेद चोरुन नेल्याचा सांगता. विष्णु ब्रम्हदेवाक सांगता काळजी करु नको, नी ते वेद घेवन येतो आणि सगळ्यांची एग्झिट होता. पुन्हा पखवाजवालो आराडता आणि संकासुर तलवार घेवन येता. तेव्हाच विष्णू पण थयसर येता. त्यांच्यात लडाई होता आणि विष्णू संकासुराचो वध करता आणि शंखाशिवाय विष्णुची पुजा अपूर्ण राहिल असो वर तेका देवन जाता. खरा तर संकासुर आणि विष्णुची लडाई लय मजेशीर असता पण अशी सांगान नाय समजाची ती. असो.










            आता खर्‍या दशावतारी नाटकाक सुरुवात व्होवची असता. संकासुराच्या प्रवेशानंतर पेटीवालो येता. पेटईवर सुर धरता आणि पखवाजवाल्याच्या तालावर झांजवालो वाजवक सुरुवात करता. पेटीवालो गायन सुरु करता आणि त्याच्या गायनावर पयलो राजा प्रवेश करता. द्शावतारी नाटक ह्या सगळा लिहीलेला नसता. पुराणातली एखादी कथा घेवुन त्याच्यावर ह्या नाटक सादर केला जाता. सगळे संवाद आपसुक, सीनप्रमाणे असतत. तर पयलो राजा येता आणि त्याच्या भाषणातुन त्याच्या राज्याची, दरबाराची दृश्या लोकांसमोर सादर करता. तेंचे हे स्वगत असलेले संवाद खूप भारी असतत. 



              प्रत्येक नाटकात नारदमुनीची भुमिका ही असताच. नारायण SSS नारायण SSSअसो आरडत नारद येता आणि कळी लावन जाता. राजा, राणी, त्यांची कन्या, नारद, दरोडेखोर, क्रिष्णा, शंकर वैगरे असली पात्रा कॉमन असतत. दरोडेखोराच्या तावडीतुन दुसर्‍या देशाचो राजा जो शिकारीसाठी इलेलो असता तो राजकन्येक सोडवता आणि मग त्यांच्यात प्रेम वैगरे होता. खरा सांगायचा तर माका सगळ्यात आवडता ती या नाटकातली लडाई. ही लडाई साधी सुधी नसता. लडाईच्या आधी राजा किंवा दैत्य ज्यांच्यात लडाई व्होवची असता त्यांच्यातलो एकजण गायन करता. गायन करता करता जो नाच असता तो बघुक माका भारी मज्जा येता. पखवाजच्या ठेक्यावर दोघेजण मस्त तालात नाचतात आणि मग लडाई सुरु होता. ( खाली दिलेला लढाईपूर्वीचा नाचाचा व्हिडीयो बघा ) 



 या लढाईत दैत्य मारलो जाता. रात्री एक दिड वाजता सुरु झालेला ह्या नाटक सकाळन्याक पाच-सहाच्या दरम्यान संपता आणि लोका आपआपल्या घराकडे जावक निघतत. 




















          आम्ही जे नाटक पाहिलं त्याचं कथानक थोडक्यात सांगतो. असुर राजा सुरेंद्र हा पहिला राजा म्हणुन प्रवेश करतो आणि स्वगतामध्ये राज्याविषयी, प्रजेविषयी आणि देवानी पुन्हा कसं फसवलं याचे वर्णन करुन काळजी व्यक्त करतो. हे सगळे स्वगत पाठांतर नसतं. जे सुचेल ते तो कथन करतो. राजा सुरेंद्रला देवांचा राग असतो.इतक्यात त्याची एकुलती एक राजकन्या येते. हे स्त्रीपात्र पुरुषच सादर करतो. ती राजकन्या एक स्तुतिस्तवन गाउन राजाला खुश करते आणि वनविहारासाठी जायची परवानगी मागते. राजा ती नाकारतो कारण त्याल तिची कळजी असते. तरीही राजकन्या आपल्या चंदा, मंदा, कुंदा या मैत्रीणींसोबत जात असल्याचे सांगुन कशीबशी परवानगी मिळवते. त्यानंतर पृथ्वीवरल्या उज्जेन नरेश श्रीकांतचा प्रवेश होतो. तो ही स्वगतामध्ये बरंच काही सांगतो. एखादं गायन करतो. इतक्यात त्याच्या दरबारात एक ब्राम्हण येतो आणि राजा श्रीकांतला सांगतो की जंगलात एका दरोडेखोराचा उत्पात माजला आहे. त्याने मला लुटलं, आणि मरेपर्यंत मारलं. तु त्याच्या बंदोबस्त कर. राजा श्रीकांत ताबडतोब निघतो. इकडे राजकन्या वनविहारासाठीए आलेली असताना कूठेतरी चुकते आणि त्या दरोडेखोराच्या तावडीत सापडते, तितक्यात राजा श्रीकान्त तेथे येतो आणि दरोडेखोराला युद्धासाठी आवाहन करतो. त्यांच्यात लढाई होते. दरोडेखोर मरतो आणि राजकन्या राजा श्रीकांतच्या प्रेमात पडते. पण राजा श्रीकांत उगाच भाव खातो आणि राजकन्येला लटकवत राहतो. तो तिला सांगतो, एकवेळ मी पाण्याने बहरलेल्या तलावात पडेन पण प्रेमात पडणार नाही; कारण पाण्यात पडल्यावर पोहुन बाहेर पडता येईल पण प्रेमात पडल्यावर बुडायलाच होणार. ( मला हा डायलॉग जाम अवडला ) पण नन्तर राजकन्या त्याला गाणे गाउन प्रपोझ करते आणि तो मान्य करतो. मग राजकन्या त्याला घेउन तिच्या राज्यात राजा सुरेंद्राला भेटवण्यास घेउन येते. ती राजाला सगळा प्रकार सांगते आणि राजा श्रीकांतशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते. राजा सुरेंद्रपण तयार होतो पण त्याची एक अट असते की राजा श्रीकांतने ल्क्ष्मीमातेची भक्ति करणे सोडुन द्यावे. पण रजा श्रीकांत ही अट मानायला तयार होत नाही. राजा सुरेंद्र दोघांना खूप मारतो अणि तीन दिवसांची मुदत देउन तुरुंगात बंद करतो. तिकडे नारद जाउन लक्ष्मी मातेला सांगतो की तिचा भक्त राजा श्रीकांतवर कसं संकट आलयं ते. मग लक्ष्मी माता त्याच्या रक्षणार्थ धाउन येते. राजा सुरेंद्रचा वध करुन श्रीकांत आणि राजकन्येला मंगल आशिर्वाद देते आणि नाटक संपतं...








8 comments:

  1. _ /|\ _ _ /|\ _ _ /|\ _

    भारीच...पुढल्यावर्षी नक्की जायचं रे :) :)

    ReplyDelete
    Replies

    1. नक्की रे जाउया पुढल्या वर्षी :)

      Delete
  2. एकदम आडस पोस्ट रे!!!

    BTW, जाखडी नृत्य असता काय रे तुमच्या गावात. माका जाखडी शूट करायचा असा...

    ReplyDelete
    Replies
    1. नाय रे ता जाखडी आमच्यागेर नसता..

      Delete
  3. @Siddharth जाखडी मालवणाक नाइरॆ...चिपळूण गुहागारात गणपतीचे टायमाक... आता डीसेम्बरात परुलेकरान मांडलान तसो दशावतार आणि जत्रा...
    वाचून एकदम थंडीची कुडकुडी आणि भजीचो वास इलो मरे परुळेकर!!!
    आनंदाचो धयकालोच हयसर मांडलय रे...
    मस्त !

    ReplyDelete
  4. _ /|\ _ _ /|\ _ _ /|\ _

    भारीच...दादा पुढल्यावर्षी नक्की जायचं रे :) :)

    ReplyDelete
  5. पुढल्या वर्षी जाउक व्हायाच आता...//

    ReplyDelete