Saturday, December 4, 2010

आत्मा!

त्या धगधगत्या चितेवर तो शांतपणे जळत होता.
आज पहिल्यांदाच असेल की त्याच्या शरीराला आगीच्या त्या ज्वाळा हिमवर्षावाप्रमाणे भासत होत्या. तसा जन्मापासुन आयुष्याच्या आगीत तो होरपळून निघाला होता. क्षणोक्षणी, पावलोपावली नाती, भावना,प्रेम,माणसांच्या या आगीत तो पोळुन निघाला होता! आज कित्येक वर्षानी तो त्या चितेच्या शय्येवर शांतपणे निजला होता. कसलीही पर्वा,काळजी, चिंता त्याची ती चिरनिद्रा हिरावून घेउ शकत नव्हती. त्याचे त्यालाच कळत नव्हते की असं का होतयं? आज त्याला कसालाही हिशेब करायचा किंवा द्यायचा नव्हता. आज त्याला उद्याची चिंता खात नव्हती. सगळी अकांउट्स आज सेटल्ड झाली होती. 
तरी, काही तरी उरलं, राहिलं तर नाही ना? अशी शंका त्याला वाटु लागली आणि हि शंका त्याला त्या चितेवर अस्वस्थ करु लागली.

इतक्यात कूणाचं तरी छद्मी हास्य त्याला ऐकु आलं!

" अं? कोण आहे?" त्याने विचारलं. 
प्रत्युत्तर आलं नाही. ते हास्य थोड्यावेळापुरत बंद झालं!
तो पुन्हा विचार करु लागला आणि पुन्हा ते हास्य! छद्मी हास्य! 
आता न राहवून त्याने पुन्हा विचारलं, " कोण आहे तिकडे? कोण हसतयं मला?" 
 समोरुन तुच्छपणे उत्तर आलं," हं! हे विचारणारा तु कोण?"
" मी कोण? मी माणुस!"
" हो ते कळलं मला! म्हणुनच मेल्यावरही हिशेब मांडतोयस!"
" म्हणजे?"
" अरे, मुर्खा आज सारं काही संपलं, आता शांतपणे या अंतराळात विरुन जायचं तरहिशेब कसले मांडतोय? मेल्यावर काही उरतं का? उरतो तो फक्त विहार! मुक्त झाल्याचा!" 
" पण मला हे तत्त्वज्ञान समजावणारा तु कोण?"
परत काही वेळापुरती शांतता. 
त्याने परत विचारले," कोण? आहेस कोण तु?" 
समोरुन उत्तर आलं, " मी?? मी तुझा आत्मा!" 
आणि तो पुन्हा शांतपणे जळु लागला!

3 comments:

  1. सही दीपक...
    खरय आपला आयुष्य हिशोब मांडण्यातच जात रे :(

    ReplyDelete
  2. आणि ते हिशेब मेल्यावरही सुटत नाहीत रे !

    ReplyDelete
  3. खरंच रे... हे हिशोब मरणानंतरही संपत नसतील..

    ReplyDelete